हिंदीची फोडणी त्या मराठीला गोड करते. सहमत आहे. पुण्यातली मराठी, इथली बोली धसमुसळी आणि तुसडी वाटू शकते. विशेषतः टोन उद्धट वाटू शकतो.
कोणतीही भाषा मुळात धसमुसळी असेल असे वाटत नाही. भाषेचे उच्चारण हा वेगळा विषय आहे. हिंदी -उर्दू एक वेगळी भाषा म्हणून कितीही गोड असली - नव्हे ती तशी आहेच - तिची मराठीला दिलेली फोडणी ही फोडणी न वाटता भेसळ वाटते. भाषेच्या पावित्र्याविषयी जागरूक असणाऱ्यांनी अशा भेसळीला कधीही स्वीकारले नाही. उदा. भरत दाभोळकरांची 'हिंग्लीश' नाटके मुंबईत चालतात, पण पुण्यात नाही!
उर्दू- हिंदीचा एक वेगळा बाज आहे. तसा तो प्रत्येक भाषेचा असतो. तो न समजण्यामागे बहुदा अज्ञानच असते. दक्षिण भारतीय भाषांना 'यंडुगुंडू' या संतापजनक नावाने हिणवणाऱ्यांनी कानडीचे खानदानी सौंदर्य पाहिलेले नसते. पत्नीने पतीला कानडीत 'री...' म्हणून बोलावणे 'अहो...' पेक्षा कितीतरी गोड आहे. 'रांडी..' चा मराठीत अर्थ काहीही असो, तेलगूत त्याचा अर्थ 'पधारिये' इतका टोपपदरी आहे. स्वतःच्या सिनेमांविषयी बोलताना राजकपूर ' मां जीवन दी सत, करम न देती वंट' असं पंजाबीत बोलतो तेंव्हा ते माडगूळकरांच्या 'कायतरी करून, बाईकडं बगून, कोलापुरी जाऊन, गुजरीत बसून, सोन्याचा डाग तुमी घडवा' इतकं 'ग्वाड' वाटतं!
भाषेची उत्क्रांती फुलाचे फळ व्हावे इतकी नैसर्गिक असावी. इतकी टक्के मराठी अधिक इतकी टक्के उर्दू अशी गणिती समिकरणे भाषेचे सौंदर्य वाढवत नाहीत, उलट कमी करतात, असे मला वाटते.