हिंदीची फोडणी त्या मराठीला गोड करते. सहमत आहे. पुण्यातली मराठी, इथली बोली धसमुसळी आणि तुसडी वाटू शकते. विशेषतः टोन उद्धट वाटू शकतो.

ही वाक्ये कृपया वाचावी.
पहिला मुद्दा:
'वाटू शकणे' आणि 'असणे' ह्यात फरक आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या वाटण्यात फरक असू शकतो. शक्यता कमी असली तरी, मला प्रिंटी झिंटा सुंदर वाटू शकते; तुम्हाला ती बेढब वाटू शकते.  मला बाबूराव अर्नाळकरांचे लिखाण ऍगथा ख्रिस्तीसारखी वाटू शकते; तुम्हाला त्यांचे लिखाण आर्थर कॉनन डॉयलच्या तोडीचे.

दुसरा मुद्दा:
थोडक्यात,  कुणाला काय वाटावे ह्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. मला मराठीत थोडी हिंदी मिसळलेली आवडते. म्हणजे इतरांनाही ती 'भेसळ' आवडावी असे माझे म्हणणे नसते किंवा 'शुद्ध' मराठी मला आवडत नाही असेदेखील नसते. तसेच 'भेसळ' कुठली आणि 'फोडणी' कुठली हे कोण ठरवणार आणि कसे ठरवणार?

कोणतीही भाषा किंवा बोली मुळात धसमुसळी नसतेच, हे मान्य. मुळात जे लोक ती भाषा, बोली बोलत नाहीत त्यांना ती गोड 'वाटली' नाही तर ती बोली बोलणाऱ्यांना वाईट वाटायला नको.

भाषेच्या पावित्र्याविषयी जागरूक असणाऱ्यांनी अशा भेसळीला कधीही स्वीकारले नाही. उदा. भरत दाभोळकरांची 'हिंग्लीश' नाटके मुंबईत चालतात, पण पुण्यात नाही!

भाषेच्या पावित्र्याबद्दल जागरूक असणारे किती असतात. म्हणजे टक्केवारी? केवळ ह्या लोकांमुळचे भाषा तगते आणि समृद्ध होते काय? हे सगळे लोक आवर्जून, हमखास नाटकं बघतात काय?

दुसरे म्हणजे, भरत दाभोळकरांची नाटके मुंबई सोडून कुठे चालतात? मुंबई आणि पुणे सोडून महाराष्ट्रात माणसं राहत नाहीत काय? पुणे म्हणजे प्रमाण आहे काय? तसेच प्रमाण भाषा म्हणजे खरी मराठी भाषा काय?

उर्दू- हिंदीचा एक वेगळा बाज आहे. तसा तो प्रत्येक भाषेचा असतो. तो न समजण्यामागे बहुदा अज्ञानच असते. दक्षिण भारतीय भाषांना 'यंडुगुंडू' या संतापजनक नावाने हिणवणाऱ्यांनी कानडीचे खानदानी सौंदर्य पाहिलेले नसते. पत्नीने पतीला कानडीत  'री...' म्हणून बोलावणे 'अहो...' पेक्षा कितीतरी गोड आहे. 'रांडी..' चा मराठीत अर्थ काहीही असो, तेलगूत त्याचा अर्थ 'पधारिये' इतका टोपपदरी आहे. स्वतःच्या सिनेमांविषयी बोलताना राजकपूर ' मां जीवन दी सत, करम न देती वंट' असं पंजाबीत बोलतो तेंव्हा ते माडगूळकरांच्या 'कायतरी करून, बाईकडं बगून, कोलापुरी जाऊन, गुजरीत बसून, सोन्याचा डाग तुमी घडवा' इतकं 'ग्वाड' वाटतं!

ह्यात न पटण्यासारखं काहीच नाही.

भाषेची उत्क्रांती फुलाचे फळ व्हावे इतकी नैसर्गिक असावी. इतकी टक्के मराठी अधिक इतकी टक्के उर्दू अशी गणिती समिकरणे भाषेचे सौंदर्य वाढवत नाहीत, उलट कमी करतात, असे मला वाटते. 

नैसर्गिक उत्क्रांतीबद्दल दुमत नाही. भाषेवर बदल लादले, शब्दांचे, शब्दप्रयोगांचे कृत्रिमरोपण केले तरी ती भाषा बोलणारे ते बदल स्वीकारतीलच असे नाही.

इतकी टक्के मराठी अधिक इतकी टक्के उर्दू अशी गणिती समीकरणे कुणी मांडली आहेत? थोडी हिंदी म्हणजे १० टक्के हिंदी की ०.३ टक्के? किती टक्के तुम्हाला सांगता येईल काय?

तूर्तास एवढेच

चित्तरंजन