काश्मीर कुणाकडे असावे यात प्रत्येकाचे वेगवेगळे हितसंबंध गुंतले आहेत हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. भारत जेव्हा म्हणतो कि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे तेव्हा  भारतीय नागरीक या नात्याने मला ही त्याचे समर्थन करणे अपरिहार्य आहे. जे मी करतो देखील. 

पण त्याचा अर्थ असा नव्हे हे निव्वळ प्रेमाखातर आहे त्याची कारणे पुढील प्रमाणे असू शकतील.

भारताच्या दृष्टीने :

१. काश्मीर मधील शांतता व सुव्यवस्थता भारताच्या सुरक्ष्येला महत्वाची आहे.

२. स्वतंत्र काश्मीर स्वावलंबी व सुनियंत्रित राहण्याच्या शक्यतेला पाकिस्तान कडून असलेला धोका.

३. सध्याची भारतील लोकशाहीची परिस्थिती ही पाकिस्तानच्या तुलनेत (आठवा मुहाजीरांना पाकिस्तानने दिलेली वागणूक) उजवी असल्याने मूळ प्रवाहात सामील झाल्यास काश्मिरी जनतेचा होऊ शकणारा लाभ. पर्यायाने भारताला लाभणारे स्थैर्य.

४. काश्मीर विषयीचे प्रेम (शेवटी देशप्रेम ही गोष्ट जनसामान्यांच्या पचनी पडायला सोपी आहे व कुटनीती ही प्रत्येकाला समजावयाची गरज नाही). शेवटी प्रत्येक कुटनीतीज्ञाचे दाखवायचे व खायचे दात निराळे मग भलेही हेतू शुद्ध का असेना.

इथे भारताला भगवा रंग द्यावा पण कारणे नक्किच भगवी नाहीत.

पाकिस्तानच्या दृष्टीने :

१. भारतपासूनच्या पराभवांचा बदला.

२. पाकिस्तान्च्या अंतर्गत समस्यांपासून जनतेचे लक्ष्य हटवणे. (शेवटी धर्म ही गोष्ट लोकांच्या पचनी पडायला सोपी आहे)

काश्मीरी जनतेच्या दृष्टीने :

(ही कोण बरे? यांचा विचार करण्याची गरज ती काय??? असे तर वाटून गेले नाही ना?)

१. शांतता व आर्थिक विकास ही परम उद्दिष्टे.

२. भारताने दिलेली विशेष अधिकारंची वचने (जे पाळणे नैतिकतेच्या  दृष्टीने बंधनकारक आहे) पाळणे. (काश्मीरला दिलेले विशेष अधिकार हे विशिष्ट परिस्थितीत दिलेले आहेत हे इतर राज्यांनी समजावून घेणे. (जरी आज ते काश्मीरच्या प्रगतीला बाधक ठरले तरी))

३. पाकिस्तानच्या आश्वासनांना भुलून किंवा तसे दाखवून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न. अर्थात हे तिथल्या भावी राज्यकर्त्यांचे उद्दिष्य.

अमेरिकेच्या दृष्टीने :

(आता ह्यात अमेरिका कुठून आली ? अहो असतील शिते तर जमतील भुते)

१. चीन व भारतावर नजर ठेवण्यासाठी व स्वत:चे आर्थिक व सैनिक हितसंबंध जोपासण्यासाठी आशिया खंडात आणखि एका सैन्यतळाची गरज.

२. भातर व पाक बेजबाबदार अण्वस्त्रधारी आहेत हे जगाला पटवून काश्मीर त्रयस्थ राष्ट्र बनवून अणूयुद्ध टळण्यासाठी तेथे तळ ठोकणे.

३. किंवा हा वाद असाच लांबवत ठेवून दोन्ही राष्ट्रांना शस्त्रपुरवठा करत राहणे. तसेच या वादाच्या भारताच्या आर्थिक स्थैर्यावर्‍या होणार्‍या परिणामांचा लाभ घेत राहणे.

वरील दृष्टीकोन हे माझ्या कुवतीनुसार मला जसे समजतात तसे आहेत. त्यांच्याशी सदर सरकारे सहमत असतीलच असे नाहीत किंवा असल्यास मान्य करतीलच असे नाही. शेवटी सत्य हे देखील सापेक्ष्य आहे. मूळ सत्यापर्यंत पोहोचता येतेच असे नाही.

वाइट इतकेच कि या सार्‍या हितसंबंधांच्या जाळ्यात काश्मिरी जनता व आपले सैन्य (हो त्यांनाही बरेच सहावे लागते हे आपण विसरू शकत नाही, घरांपासून दूर असह्य तापमानात ते आपल्याच हितांचे रक्षण करत आहेत!) गुरफटले आहे.

दुर्दैवाने बळी तो कान पिळी हा नियम असल्यने हा सत्तासंघर्ष चालणार इतकेच!

मी आशुतोष