मला वाटते साठोत्तरी कवितेला वगळून कुठलीच यादी पूर्ण होणार नाही. 'अंतर्नाद'कारांवर २० पुस्तकांचे बंधन आहे हे मान्य; परंतु चित्रे, कोलटकर, डहाके, ढसाळ, ग्रेस,आरती प्रभु, महानोर यांपैकी एकालाही स्थान मिळू नये याचे थोडे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. केशवसुत आणि मर्ढेकरांनंतर मराठी कवितेत जे प्रवाह निर्माण झाले त्याचा येथे मागमूसही नाही.

अनिल अवचटांचे शेवटाचे पुस्तक प्रसिद्ध होऊन पंचवीस वर्षें होऊन गेली. गेल्या २५ वर्षातील एकही पुस्तक 'अंतर्नाद'कारांनाच काय, पण तुमच्या-आमच्यापैकी कुणालाच समाविष्ट करणे शक्य होणार नाही ही बाब एकूण साहित्य-व्यवहाराच्या जवळजवळ संपूर्णपणे दिवाळे निघालेले असल्याचेच द्योतक मानायला हवी. म्हणजे अर्थातच गेल्या २५ वर्षांत पुस्तके - चांगली पुस्तके लिहिली गेलीच नाहीत असे नाही; परंतु युगप्रवर्तक असे काम झाले नाही असे म्हणायला हवें.