'अंतर्नाद' च्या यादीतील पुस्तकांच्या निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहेतः
१. दोन साहित्यकृती साधारण एकाच पातळीवरच्या असतील तर अलीकडील  साहित्यकृतीला झुकते माप द्यावे. म्हणून 'पाणकळा' किंवा 'सराई' पेक्षा 'बारोमास' पहिल्या यादीत घेतली होती.
२. साहित्यकृतीबरोबर त्या साहित्यकृतीचे एकूण साहित्यविश्वावरील परिणाम व तिचे आगळेपणही विचारात घ्यावे. म्हणून काही समीक्षकांचे मूल्यमापन वेगळे असले तरी 'शामची आई' हे पुस्तक या यादीत घेतले होते.
३. यादीत जास्तीत जास्त लेखकांचा समावेश करता यावा म्हणून एका लेखकाचे एकच पुस्तक घेतले होते. उदाहरणार्थ 'विशाखा' घ्यायचे म्हटल्यावर 'नटसम्राट' घेतले नव्हते. किंवा 'व्यक्ती आणि वल्ली' घेतल्यावर 'बटाट्याची चाळ' वगळले होते.
४. धार्मिक स्वरूपाची पुस्तके महत्त्वाची व लोकप्रिय असली तरी विचारात घेतलेली नव्हती. उदाहरणार्थ विनोबांचे 'गीताप्रवचने' हे पुस्तक.
५. रहस्यकथा, पोलीसतपासकथा, बालसाहित्य व अनुवाद यांचा वाचनसंस्कृती रुजवण्यामध्ये असलेला महत्त्वाचा वाटा मान्य करूनही त्यांचा या यादीत विचार केलेला नव्हता. म्हणून बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर किंवा भा.रा.भागवत किंवा श्रीपाद जोशी यांच्यासारखी नावे यादीत समाविष्ट केलेली नव्हती.

या निकषांनुसार शंभराहून अधिक वाचकांनी पहिल्या टप्प्यात १००, नंतर ५० व अखेरच्या टप्प्यात २० पुस्तकांची निवड केली होती. अखेरच्या टप्प्यात ह. ना. आपटे यांचे 'वज्राघात', ना. सी. फडके यांचे 'दौलत' , सदानंद देशमुख यांचे 'बारोमास' आणि दासू वैद्य यांचे 'तूर्तास...' ही पुस्तके मागे पडली.