चित्तोपंत,
(१) भाषा, वेगवेगळ्या प्रांतांमधल्या बोलीभाषेसह जिवंत राहिली पाहिजे हे मान्य... उदा. मराठीही मालवणी, वऱ्हाडी, खानदेशी अशा बोलींमधे आहेच, किंवा कोल्हापूरच्या मराठीला एक गोड असा कानडी हेल आहे... हे सगळं ऐकायला/वाचायलाही गोडच वाटतं; अगदी पुण्यातही 'पाहिजे आहे' किंवा 'पाहिजेल आहे' ऐकायला मिळतं / 'म्हटला'/'म्हणला'/'म्हणाला' ही तिन्ही रूपं ऐकायला मिळतात. मालवणीचीही अनेक रूपं आहेत. उदा. 'शिरा' हा पदार्थ काही ठिकाणी 'शिरो' असा म्हटला जातो तर काही ठिकाणी 'रवो'.
(२) शिवाय, मला वाटतं बहुतेक बोली भाषांमधे शब्द / शब्दांची रूपं, क्रियापदाची रूपं बदलतात; पण ती बोली रूपं असल्यामुळे, त्यांच्या लेखी रूपांमधले ऱ्हस्व/दीर्घ मूळ भाषेतल्या सारखेच असू द्यावेत. उदा. 'वडील' हा शब्द मालवणीत 'वडिल' असा होणार नाही. मराठी नियमाप्रमाणे 'वडील'चं रूप 'ना प्रत्यय लावला तर 'वडिलांना' असं होतं, ते मालवणीत 'वडिलांक' किंवा 'वडलांक' होईल. तिथे 'वडीलांक' असा दीर्घ 'डी' करायचं कारण नाही.
(३) कुठल्याही बोलीतल्या लिखाणात एकाच नियमाचं पालन व्हावं. एका वाक्यात 'जिवंत' आणि दुसऱ्या वाक्यात 'जीवंत' - असं नको.
(असंही वाटतं की तुम्ही दिलेल्या उदाहरणात 'जीवंत' ही मराठीत शुद्धलेखनाची चूक आहे. 'ह्या' आणि 'या' असे शब्द ठीक आहेत; पण.... बाकी नकोच).
(४) अलीकडेच प्रकाश नारायण संतांचं 'शारदा संगीत' वाचलं. त्यात, किंवा शंकर पाटील यांच्या लिखाणातही अनेक बोली भाषेतले संवाद आहेत (काही दिवसांपूर्वी विसोबांनी केलेल्या चर्चेतही मी लिहिलं होतं...)
उदा. 'हर्ण्याचा पाय जमिनीवर ठरेना झाला'. हे 'ठरेनासा झाला'चं बोली रूप आहे; ते मान्य व्हावं; पण याच उदाहरणात-
दुसऱ्या कुठल्यातरी बोलीत 'जम्नीवर' किंवा 'जिमिनीवर' किंवा 'जिम्नीवर' असंही होईल; पण यातल्या 'जमिनीवर' किंवा 'जिमिनीवर' मधे मि दीर्घ किंवा नी ऱ्हस्व कशाला करायचा? तो मूळ भाषेप्रमाणेच असू द्यावा!
- कुमार