प्रमुख पाहुण्याबद्दल किंवा एकंदरीतच दुसऱ्या माणसाबद्दल आदर व्यक्त करणे हा औचित्याचा भाग आहे. ते संस्काराने येते, रूढ चालीरीती सांभाळण्यासाठी ते केले जाते. कांही लाभ होण्याच्या दृष्टीने ते धोरण बाळगले जाते, अनेक वेळा जुलमाचा राम राम केला जातो आणि  अडला नारायण गाढवाचे पाय सुद्धा धरतो.  कोणी कोणत्या प्रसंगी कसे आचरण करावे याबद्दल लिहिण्याचा माझा मुख्य उद्देश नव्हता.

मुळांत बक्षिस समारंभ एखाद्या मान्यवर व्यक्तीच्या हस्ते कां केला जातो? ज्याने बक्षिस ठेवले आहे त्याने स्वतःच ते दिले तर ते मिळणाऱ्याला होणारा आनंद ते बक्षिस एखाद्या आदरणीय  व्यक्तीच्या हस्ते मिळाल्यास द्विगुणित होतो असे मला वाटते. या दृष्टीने संबंधित क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींना अनेक वेळा अशा प्रसंगी बोलावले जाते. कधी कधी असे होत नाही याविषयी मी लिहिले आहे.