प्रिय मुक्तसुनित आणि संजोप-राव,

आपल्या मतांबद्दल पूर्ण आदर; पण माझ्या स्वतःच्या वाचनावरून आधारलेल्या मताप्रमाणे (जे तुमच्या मतांपेक्षा वेगळं असू शकतं):
१)  शब्द-प्रतिभा आणि ओजस्वी लिखाण हे कुसुमाग्रजांच्या कवितांमधे वादातीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी 'अहि-नकुल' सारख्या स्वातंत्र्य-आंदोलनाला प्रेरणा देणाऱ्या कविता लिहिल्या. त्यांनी अतिशय तरल आणि तरीही त्या विषयाला एक उत्कटता / उंची देणाऱ्या अशाही (उदा. 'पृथ्वीचं प्रेमगीत') कविता तितक्याच सुंदरपणे हाताळल्या.

२) केशवसुतांनीही 'तुतारी', 'स्फूर्ती' अशा प्रेरणादायी आणि 'झपूर्झा' सारख्या वेगळ्या, नवीन कविता लिहिल्या. त्यांनी आशावादी आणि निराशावादी अशा दोन्ही प्रकारच्या कविता लिहिल्या. 'ब्राह्मण नाही, हिंदुहि नाही, न मी एक पंथाचा' किंवा 'पूर्वज वदले त्यां गमले ते' असे विचार सुमारे १०० वर्षांपूर्वी लिहिले.  त्यांना (नवीन) मराठीचे आद्यकवी म्हटलं जातं आणि ते मला तरी योग्यच वाटतं.

या दोघांची निवड मला वादातीत वाटली; तिसऱ्या कवीऐवजी दुसऱ्या प्रकारचं पुस्तक घ्यावं असं वाटलं आणि त्यामानानं मर्ढेकर मला, मी जेवढं वाचलंय त्यावरून, कमी आवडतात. 

अजून एक मुद्दा म्हणजे पु. ल., कुसुमाग्रज, केशवसुत, हरिभाऊ आपटे यांच्या लिखाणात अगदी छोटीशीही खटकणारी गोष्ट, मला तरी, आढळत नाही. या उलट मर्ढेकरांच्या काही कविता 'पिपात ओल्या मेले उंदीर' किंवा 'कितीतरी दिवसात' या कविता मला एवढ्या आवडत नाहीत. (हे व्यक्तिसापेक्ष आहेच, त्यामुळे माझं मत म्हणूनच याचा कृपया विचार व्हावा.)

- कुमार