सर्वप्रथम देवयानी खोब्रागडे यांचे वक्तव्य आवडले. इस्लामाबादाची रचना, बांधणी चित्रांत पाहिलेली आहे त्यामुळे हे शहर आवडण्यासारखेच असावे. कराची-लाहोरला राहून असेच वक्तव्य करता येईल का असा प्रश्न ही पडला. त्यांचे पद पाहता त्यांच्या वाट्याला येणाऱ्या चांगल्या वागणूकीचे फारसे नवल वाटत नाही.
असो. माझ्याबद्दल बोलायचे झाले तर १९९६ सालापासून माझा येन-केन प्रकारे या पाकिस्तानी माणसांशी संबंध येत आहे. आधी अबुधाबीला राहिल्यामुळे आणि नंतर खुद्द अमेरिकेतच जिथे जावे तिथे पाकिस्तानी कुटुंबेच शेजारी म्हणून मिळतात.
मला चांगले वाईट दोन्ही अनुभव आहेत; पण मग ते कोणाबद्दल नसतात. आपल्याच भारतीयांबद्दलही आहेतच. उलटपक्षी मी अबुधाबीला नव्याने कचेरीत रूजु झाल्यावर सर्वात प्रथम मला मदत पाकिस्तानी लोकांनी केली. बोलण्यातील अदब व मिठ्ठास अप्रतिम. एखादी मदत लागली तर न कुरकुरता करतील. दोन उच्चविद्याविभूषित पाकिस्तानी सहकारी मला तिथे लाभले आणि कधीही कोणत्याही गरजेला धावून येतील इतकी मैत्री होती. (बऱ्याच भारतीयांकडून याविरुद्ध अनुभव आला हे नमूद करावेसे वाटते.)
त्यानंतर अमेरिकेत एक पाकिस्तानी डॉक्टर कुटुंब आमच्या शेजारी राहत होते. ते दोघेही अतिशय व्यस्त असल्याने आमची मैत्री फारशी घट्ट नव्हती परंतु अडी अडचणीला कोणते औषध घ्यावे, बाहेर जातो आहोत जरा लक्ष ठेवा. पार्सल येणार आहे इतपत संबंध होते. त्यानंतर सध्या आम्ही जिथे राहत आहोत तिथेही एका पाकिस्तानी कुटुंबाशी आमची चांगली मैत्री झाली होती.
त्यांच्या मुली माझ्या मुलीच्या वयाच्या असल्याने घट्ट मैत्री होती. फोन न करता, आगाऊ सूचना न देता सरळ थडकण्याचे, मुलीला तास-दोन तास तुझ्याकडे ठेवून जाते हे सांगण्याचे किंवा थोडी कोथिंबीर उसनी मिळेल काय असे हक्काने विचारण्याचे ते माझे अमेरिकेतील एकमेव घर असावे. हे ही नवरा बायको दोघे बऱ्यापैकी पुरोगामी होते. (सध्या ते बदलून डेट्रॉईटला गेल्याने आमचे संबंध फोन आणि विरोपापुरते आहेत पण एकमेकांची विचारपूस असते.)
बाकी, या पाकिस्तानी लोकांना मुंबईत राहणाऱ्या माणसांबद्दल फार आकर्षण असते. म्हणजे चित्रपटातल्या फॅशन्स तुम्ही करता का? ते मेक-अप, तोकडे कपडे, वागणे तुम्हीही असेच असता का शाळा कॉलेजात?नायक नायिका तुम्हाला रस्त्यावर दिसतात का? त्या मोठ्या मोठ्या इमारती आणि स्थळे तुम्ही पाहिली आहेत का? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. (असो. गेल्यावर्षी मुंबईला चक्कर मारल्यावर यातील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मला "हो" अशी द्यावीशी वाटतात.)
सुन्नी-शिया, कराचीवाले-लाहोरवाले यांची एकमेकांविषयी मते, आकस इ. मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून "वाकिफ़" आहे. मुंबईकर-मराठी-बिहारी-भय्ये यापेक्षा फार वेगळे असतात यातला भाग नाही. राहता राहिली त्यांची रुढीप्रिय धार्मिक मते आणि समज तर ती स्वतःच्या धर्मातल्या माणसांची तरी कोठे पटतात?
कुंपणा अलीकडची आणि पलीकडची माणसे सारखीच असतात असे वाटते. शासन, खुर्चीवर बसणारे शासनकर्ते आणि शासकांना बळ देणाऱ्या इतर शक्ती यांचा सामान्य नागरिकाशी आणि जीवनमानाशी फारसा संबंध नसतो असे वाटते.