माननीय चाणक्य यांस,

आपल्या प्रतिसादाला उत्तर म्हणून नव्हे पण त्या अनुषंगाने काही विचार मांडीत आहे.

महाभारत नुसतेच महाकाव्य असले तरी त्यांतील पात्रे मनाची इतकी पकड घेणारी आहेत की महाभारत किंवा गीता म्हंटल्यावर तीच डोळ्यासमोर येतात; व्यासांची आठवण होत नाही. त्यामुळे सर्वसाधारण संवादांत (वादविवादांत नव्हे) त्या व्यक्ति खरोखरच होऊन गेल्या आहेत असे समजूनच बोलले किंवा लिहिले जाते. हा व्यासांच्या प्रतिभेचा चमत्कार आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे  महाभारतांतील योगेश्वर व त्याने सांगितलेली गीता ही व्यासांचीच निर्मिति आहे.

माझ्या लेखाचा उद्देश मनाच्या एकाग्रतेंत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मनोविश्लेषणाचे आधुनिक तंत्र कसे वापरता येईल हे सांगण्याचा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाची स्थिति अर्जुनासारखीच असते व प्रयत्नांती प्रत्येकजण योगेश्वर बनू शकतो हे माझ्या लेखावरून दिसून येईल. त्यासाठी व्यासांच्या प्रतिभेने निर्माण केलेली व अजूनही कालबाह्य न झालेली पात्रे उदाहरण म्हणून घ्यायला हरकत नसावी.