विलासराव,

हा लेख आपला नाही हे आपण लेखाच्या सुरूवातीला आणि शेवटी लिहिले आहेच त्यामुळे तसा संदेह अजीबात नाही. आपण हा लेख येथे देण्याचा उद्देश केवळ 'एखाद्या नव्या/ वेगळ्या गोष्टीकडे पाहताना आपली नजर पूर्वग्रहदूषित न ठेवता तिच्या कक्षा रूंदावून त्याकडे पाहावे' असा होता असे मला वाटते. (जो मला पूर्णपणे पटतो) परंतु लेखकाचा केवळ तेच सांगण्याचा प्रयत्न आहे असे मात्र मला वाटत नाही.

मुख्य कारणे प्रश्नांतून वर दिलीच आहेत पण आपण जर त्यांना या प्रश्नांची प्रत देणार असाल तर कृपया याचीही भर घाला.

जर लेखकाच्या मते अंनिस नास्तिकतावाद पसरवत असेल तर त्याकडेही सर्वांनी वेगळ्या नजरेतूनच पाहिले पाहिजे. जसे 'देव आहे' असे सांगणे आणि प्रचार करणे गुन्हा ठरत नाही तसेच 'देव नाही' असे सांगणे आणि प्रचार करणे गुन्हा ठरू नये. त्यासाठी अंनिसला समाजापासून दूर ठेवायचे असे सांगणे हा मला आततायी प्रकार वाटतो. सदर लेखकाचे  म्हणणे 'वास्तवामध्ये धर्म विज्ञानाच्या आड येत नाही किंवा विज्ञान धर्माच्या आड नाही' हे ही पटत नाही. विज्ञानाने जरूर धर्माच्या आड यावे. प्रश्न उपस्थित करणे आणि त्याचे पुराव्यांनिशी निराकरण करणे हेच जर विज्ञानाचे काम असेल तर धर्माला विज्ञानाची भीती बाळगायचे काही एक कारण नाही. विज्ञानाकडे प्रत्येक वेगळेपणाचे (चमत्कार हा शब्दप्रयोग टाळत आहे) उत्तर असेलच असे नाही परंतु भविष्यात त्याला ते मिळणार नाही हे कशावरून? प्रयत्न करणे आणि करत राहणे हे विज्ञानाचे कर्तव्य आहे. अध्यात्म सर्वांगीण विकास घडवते असे सांगितले जाते तेव्हाही अशा गोष्टींची शहानिशा, सत्यासत्यता विज्ञानाने पारखून पाहायलाच हवी, त्यात काहीही चुकीचे नाही आणि तसे केल्याने आमच्या परंपरांना, विश्वासाला, श्रद्धेला धक्का पोहोचतो हा विचार (भीती) बाजूला सारायला पाहिजे.

बाकी राहिली पाश्चिमात्य विचारसरणी तर होय ती आपल्या भारतीय विचारसरणीपेक्षा याबाबतीत नक्कीच रूंदावलेली आहे. उदा. येथे पोलिसीखातेही clairvoyant माणसांची मदत घेते. आपण आपल्या प्रतिसादात प्रक्षेपित केलेले विचार पकडण्याबद्दल लिहिले आहे. त्याबाबत बोलायचे झाले तर एक कार्यक्रम आठवतो ज्यात अशा वेगळ्या clairvoyant व्यक्तीने टिव्ही स्टुडिओत बसून कोणतीही कल्पना नसताना दुसरी एक व्यक्ती  जिचे नाव आणि फोटो तिला दाखवण्यात आला ती दूर समुद्रकिनाऱ्यावर असल्याचे ओळखून दाखवले होते आणि ती व्यक्ती  असलेल्या जागीचे मिळतेजुळते चित्रही काढून दाखवले होते. परंतु या व्यक्तीने अनेक लोकांच्या आणि तज्ज्ञांच्या समोर बसून हा प्रयोग केल्याचे आठवते. (इतके करूनही अविश्वास दर्शवणाऱ्या अनेक skepticsना हेटाळले जात नाही ही महत्त्वाची गोष्ट.) विज्ञानाकडे आजतरी या वेगळेपणाचे उत्तर नाही, केवळ तर्क आहेत.

अशा वेगळ्या व्यक्ती जगात सर्वत्र आढळतात. (अगदी आदित्य पाठकसारखे चिमुकले कलाकारही). यात धर्म, अध्यात्म, साधना यांचा फारसा सहभाग असतोच असे नाही. अशा वेगळेपणावर पाश्चिमात्य विविध प्रयोग करून पाहतात आणि त्यामानाने आपल्याकडे अंनिसचे कार्य खचितच तोकडे पडत असावे, परंतु त्यांनी समाजाचे काहीही भले केले नाही हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे वाटते.

हे माझे विस्कळीत विचार आपण जरूर त्या लेखकांना दाखवा.

प्रियाली