मृदुला,
प्रतिसादाबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद. ध्वनीलहरी जशा आपल्याला नेमक्या पद्धतीने ऐकता येतात; त्याप्रमाणे वातावरणातील विचार आपल्याला जाणता येतील का हा माझ्या मनातील प्रश्न आहे. ध्वनीलहरी आणि विचारलहरी एकाच माध्यमातून प्रकट होतात का? हाही विचार करण्याचा प्रश्न आहे. जाणणे हा जाणीवेचा प्रांत आहे. ज्ञानेंद्रियांच्या पलिकडे ही जाणीव कार्य करते असा माझा समज आहे. मी काही भौतिकशास्त्रातील संशोधक, मानसोपचार तज्ञांशी बोललो आहे. पण कुणीच माझे समाधान करू शकले नाही. अर्थात प्रश्नही आपलेच असतात. त्यांचे समाधानही आपणच शोधले पाहिजे.
बायोनिक आय इंप्लांट हा प्रकार मला नवीन आहे. सवडीने वाचेन त्यावर.
प्रियाली,
भारतीय विचारसरणी आजच्या घडीला तरी मनाला न पटणारी आहे. बऱ्याच वेळा प्रवचनांतून ऐकले होते की चार्वाकांसारख्या "नास्तिकतेच्या" समर्थकालाही आपले प्राचीन ऋषीमुनी आपल्या चर्चेत सहभागी करून घेत होते. त्यांनाही सन्मानाने वागविले जात होते. भगवतगीतेतही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला १८ अध्यायापर्यंत उपदेश करतात आणि शेवटी सांगतात की तुझ्या बुद्धीला पटेल ते तू कर. आपली भारतीय संस्कृती ही अशी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता जपणारी असूनही असे वातावरण का निर्माण झाले असावे? ह्याचा पुन्हा नव्याने विचार व्हायला हवा असे वाटू लागते. आपल्या साऱ्यांचा हाच मानस असावा असे वाटते.
मी कधीही अंनिसविरोधात नव्हतो आणि नसेनही. पण आपल्या ज्ञानाच्या कक्षेबाहेर जाऊन विचार करायला हवा असे वाटते. काही वर्षांपूर्वी माझ्या सद्गुरूंकडे एक नामवंत नाट्यकलावंत आले होते. म्हणाले," मला देवाचा साक्षात्कार करून द्या." सद्गुरूंनी त्यांना सांगितले की "अवश्य करून देईन. तुम्ही रोज २० मिनीटे नामस्मरण करण्याचा अभ्यास करा आणि ६ महिन्यांनी मला भेटा. " ते गृहस्थ परत कधी फिरकलेच नाहीत. विचारले तर म्हणाले," कामाच्या व्यापात नामस्मरण करायला वेळच मिळत नाही." मॅट्रीक पास होण्याची योग्यता नसतांना आपण phd च्या गोष्टी करतो हे मनाला खटकते.
विज्ञान आणि प्रज्ञान ह्या दोहोंची मानवी जीवन अधिक सुखी आणि समृद्ध करण्यासाठी गरज आहे हे माणसाला जेव्हा कळेल तो दिन सुदिन असेल. विज्ञानाच्या संशोधनातून माणूस हा देहाच्या अंगाने निसर्गाचाच एक घटक आहे हे आपल्याला समजले पाहिजे आणि निसर्गावर मात करण्याच्या गप्पा न करता निसर्गाला समजावून घेऊन निसर्गाशी एकरूप होऊन राहता आले पाहिजे किंवा नैसर्गिक साधनांचा योग्य वापर ( उपयोग) करता आला पाहिजे आणि प्रज्ञानातून देव आणि मी हा दुजा भाव जाऊन ऐक्य साधता आले पाहिजे. मग आनंदाचे डोही आनंद तरंग ही अनुभूती फार दूर राहणार नाही. असे जीवनाचे ध्येय असावे असे मला वाटते.