"बापू सांगतात, 'हात उगारणे सोपे आहे; माफी मागणे त्यापेक्षा कितीतरी कठीण आहे" 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट पाहून गांधीगिरीने भारावून गेलेले एक गृहस्थ भावुकपणे बोलत होते. मध्यंतरी या चित्रपटाने थोडी खळबळ माजवली होती. बाँबस्फोट खटल्यांत दोषी ठरलेल्या संजय दत्तला तेवढीच अनुकूल प्रसिद्धी.
थोडा विचार केला तर बापूंच्या तोंडचे वरील वाक्य हे संपूर्ण सत्य नसून अर्धसत्यच आहे हे लक्षांत येईल. ते, ज्याला नेहमी हात उगारण्याची सवय आहे त्याच्याबाबतींत खरे आहे. पण ज्याला नेहमी पड खाऊन अन्याय सहन करीत राहायची खोड आहे त्याला माफी मागणे सोपे आहे. त्याच्यासाठी हात उगारणे तेवढेच कठीण आहे जेवढे हात उगारण्याची सवय असणाऱ्याला माफी मागणे.
खरे तर जो वेळ पडल्यास हात उगारू शकतो त्याच्या माफी मागण्याला किंमत आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर अहिंसा परिणामकारक ठरण्याची शक्यता तिचे पालन करणाऱ्याच्या (वेळ पडल्यास) हिंसा करण्याच्या क्षमतेच्या प्रमाणांत असते.
गरज आहे ती सवय मोडण्याची व सारासर विचारशक्ति शाबूत ठेवून परिस्थितीनुसार फुलांप्रमाणे कोमल वा वज्राप्रमाणे कठोर बनण्याची किमया आत्मसात करण्याची.
आपल्याला गांधीही हवेत व गीता सांगणारा श्रीकृष्णही हवा.