रावसाहेब,

गुलज़ार हा मोठा प्रतिभावान कवी आहे, ह्यात शंका नाही. त्याचा लहजाही देखणा आहे. त्यामुळे त्याचा गौरव व्हायलाच हवा. पण खरेच लोक जेवढे डोक्यावर घेतात तेवढा मोठा कवी आहे तो आहे काय, असा प्रश्न मला कधीकधी पडतो. त्याच्या कवितांतल्या, गझलांतल्या कल्पनांत मला बऱ्याचदा रेशमी इग्ज़िबिशनिज़्म जास्त आढळतो. मला गझलकार गुलज़ार फार प्रभावी वाटला नाही. 'सरहद पार' टाइप कविता आवडतात. 'शाम से आँख में नमीसी है' पेक्षाही कितीतरी चांगल्या गझला उर्दूत आहेत. फ़िराक़ गोरखपुरीने ह्या 'सी'चा वापर फार छान आहे. आपण त्याला वाचलेलेच नाही.

शाम भी हैं धुआं-धुआं हुस्न भी है उदास-उदास
दिलको कई कहानियाँ यादसी आके रह गयी

इथे 'यादसी आके रह जाना' किती मस्त आले आहे. नासिर काज़मीने तर अशा छोट्या वृत्तातल्या फारच सुंदर गझला/ली लिहिल्या आहेत.

वानगीदाखल काही शेर बघा-
हमारे घर की दीवारों पे 'नासिर'
उदासी बाल खोले सो रही है

चांद देखा तो हमने वहशत में
जिसको देखा उसीको चूम लिया.

ना मिलाकर उदास लोगों से
हुस्न तेरा बिखर न जाये कहीं


ह्यात मला कुठेच रेशमी इग्ज़बिशनिज़्म आढळत नाही. पण तो लोकांना माहीत नाही. कारण त्याने हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहिली नाहीत. त्यामुळे त्या लोकप्रियतेवर त्याला आरूढही होता आले नाही. आणि तो तेवढा फॅशनेबलही नाही. रावसाहेब, ते काही असो, लेख आणि लहजा आवडला.  आणि विनायकरावांचा प्रतिसादही तुम्ही म्हणता त्या कारणांमुळेच आवडला.

चित्तरंजन