गझलांमधे वापरण्यात येणारी वृत्ते पाहिली तर त्यांच्यात एक प्रकारची लय ताल किंवा ठेका असतो, असे वाटते. (.. अर्थात असा काही नियम किंवा बंधन नसावे.) शिवाय लघुगुरुक्रम हा पुनरावर्ती असल्याचे दिसते उदा. भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा. आनंदकंद - गागालगालगागा - गागालगालगागा किंवा (नाव?) गालगागा गालगागा गालगागा गालगागा. अशा पुनरावर्तनाने आणि लयीने त्यांत एक प्रकारची सहज आकलनसुलभ अशी गेयता येत असावी, त्यामुळे त्यांत केलेली रचना ऐकताना श्रोत्याला अन्वय समजून घ्यायला तुलनेने कमी श्रम पडत असावेत.
शार्दूलविक्रीडित त्यामानाने अधिक ओबडधोबड (?) आहे. ते गद्याच्या अधिक जवळ जाणारे आहे (असे मला वाटते ... माझे ते सर्वात आवडीचे वृत्त आहे) अशा वृत्तात गझल करण्याचे शिवधनुष्य तुम्ही उचलून खूपच सहज वाटणारी (तरी परिश्रम जाणवणारी) रचना केलेली आहे. अर्थात माझे ज्ञान हे एखाद्या गझलकाराचे किंवा कवीचे नसून केवळ एखाद्या शब्दजुळाऱ्याचे आहे हे निश्चित.
शार्दूलविक्रीडितातल्या लघुगुरु पुनरावर्तनांची, यमकांची, यतींची आणि लयीची मजा यायला किमान चार ओळी कडव्यात असाव्या लागतात असे वाटते. (कदाचित अशाच रचना बाहुल्याने वाचल्याने तसा पक्षपात होत असावा.) त्यामुळे शार्दूलविक्रीडितात रुबाई सारखी रचना वापरून अन्योक्ती सारखे काव्य लिहिता येईल असे वाटते. (... अर्थात तुम्ही सातत्याने शार्दूलविक्रीडितात उत्तम गझला करत गेल्यास त्याचाही काही काळाने पायंडा पडेलच!)
वृत्तात आणि व्याकरणात बसावे म्हणून बोले ती, "जगले तुझ्यातर मुळे" - आटोपली मोजणी ... असे काहीसे मनात म्हणून पाहिले तरी अशा बदलाने तुम्हाला अभिप्रेत असलेली 'तुझ्यामुळेच' मधली अनिवार्यता पुरेशी स्पष्टतेने उमटणार नाही असे वाटते.