कोSहम, प्रदीप, मुक्ती , तुमची मते कळविल्याबद्दल धन्यवाद.

मुक्ती : तुमचा मुद्दा मान्य होण्यासारखा आहेच. भाषेची एकूण सांस्कृतिक संदर्भातील स्थिती, तिचे वाङ्मयव्यवहारातील आणि मुख्य म्हणजे एकूण सामाजिक, राजकीय व्यवहारातील स्थान हे सर्व प्रश्न गुंतागुंतीचेच. मराठी सारस्वतात आता जे काही थोडे लोक राहिले आहेत त्यांच्यामधे हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे यात शंका नाही. माझा प्रश्न काहीसा स्पेसिफिक होता. केवळ एका अत्यंत लोकप्रिय दिवंगत लेखकाबद्दलच नव्हे , तर त्या लेखकाने आपल्या लिखाणातून वर्णन केलेल्या जीवनसरणीबद्दल , जगण्याच्या एका भूमिकेबद्दल.

प्रदीप यांनी निर्देशित केल्याप्रमाणे , "असामी असा मी" , "बटाट्याची चाळ" यांसारखे ललित लिखाण काही लोकाना संदर्भहीन वाटते. मला व्यक्तिश: तसे वाटत नाही हा भाग अलाहिदा. (किंबहुना, बटाट्याची चाळ मला पुलंची एक स्वतंत्र कलाकृती, जिचे मराठी साहित्यातील स्थान चिरकाल टिकून राहील असे वाटते.) परंतु, हे असे वाटणे या गोष्टीचे निदर्शक आहे की, पुलंचा रिलेव्हन्स तपासणे हे नक्कीच अभ्यसनीय ठरते.