पुलंच्या लिखाणातील काही गोष्टींचा या निमित्ताने परामर्श घ्यावासा वाटतो.
स्मरणरंजन : इंग्रजीत ज्याला नॉस्टाल्जिया म्हणतात त्याचे दर्शन पुलंच्या जवळजवळ प्रत्येक लिखाणात दिसेल. त्यांच्या लेखक म्हणून ऐन बहरात असण्याच्या कालात या मुद्द्याचे अपील खूप मोठे होतेच ; पण ऐंशी-नव्वदीच्या दशकात जेव्हा पुलंनी जवळजवळ लेखनाच्या मुख्य प्रवाहापासून संन्यास घेतला होता, त्या काळातील पिढ्यांवर सुद्धा , या स्मरणरंजनाचा प्रभाव कमी नव्हता. बालगंधर्व, पुलंचे आजोबा, अगदी बोरकरसुद्धा ..... या साऱ्यांना कधीही न पाहिलेली मंडळी त्याना पहात होती पुलंच्या चष्म्यातून. वसंतराव देशपांडे , केसरबाई केरकर यांसारख्यांना या पिढीतील लोकांनी ओझरते पाहिले असेलही ; पण ते त्यांच्या उतारवयात , कारकीर्द आटोपताना. पण त्यांची व्यक्तिचित्रे अगदी अलिकडील पिढ्यांमढ्ये लोकप्रिय होती.
पुलंच्या अस्तानंतर या स्मरणरंजनाची जादू लोप पावत असल्यासारखी का वाटत असेल? (प्रदीप यांचा अभिप्राय या बाबतीत उल्लेखनीय आहे.) माझ्या मते, त्याचे एक उत्तर असे असेल की, पुलंच्या अस्तानंतर जवळजवळ लगेच, त्यांना पाहिलेल्यांची, त्यांच्याबरोबर काम केलेल्यांची , त्यांचे कर्तृत्त्व घडताना ते अनुभवणाऱ्यांची पिढीच काळाच्या पडद्याआड गेली. हे संक्रमण जास्त जाणवले ते पुलंच्या एक्झिटमुळे. याचा अर्थ या पिढीतील सर्वच्या सर्व माणसे इतक्या थोड्या कालावधीत देवाघरी गेली, असा कुणी शब्दशः अर्थ काढू नये. पण ही पिढी जीवनाच्या क्रीडांगणातून निवृत्त होत गेली आणि पुलंच्या लिखाणातील स्मरणरंजनाच्या एका मोठ्या भागाचे संदर्भ विरल्यासारखे झाले असे मला वाटते.