सर्वसाधारणपणे ओळीत यतीमुळे घ्यावा लागलेला विरामकाल एका मात्रेइतका किंवा एका लघ्वक्षराइतकाच पुरेसा असतो असे वाटते. पण आनंदकंदाच्या गागालगालगागा आणि गागालगालगागा ह्या दोन खंडांमध्ये येणारा यती जवळ जवळ चार मात्रांइतका प्रदीर्घ घ्यावा लागतो. कविता तालात म्हणून हातावर बोटाने ताल धरून मात्रा मोजल्यास मी काय म्हणतो त्याचे प्रत्यंतर येईल. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आनंदकंदातल्या त्या दोन खंडांतला यती नष्ट करायचा असेल तर चार मात्रा लागतात. उदा.

हे राष्ट्र देवतांचे आणिक हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो आता स्वातंत्र्य भारताचे

तालात म्हणताना

हे । राष्ट्र देवतां । चे आणिक हे । राष्ट्र प्रेषितां । चे

... असे म्हणून पाहा.

किंवा

डोळ्यांवरून माझ्या जेव्हा उतरून रात्र गेली
स्वप्ने मला दिलेली सारी विसरून रात्र गेली

( डो । ळ्यांवरून मा । झ्या जेव्हा उत । रून रात्र गे । ली )

त्यामुळे एवढा मोठा यती असताना जर तिथे यतिभंग होत असेल तर तो आस्वादणे जास्त कठीण होते असे मला वाटते.

अवांतर : वरच्याप्रमाणे चार मात्रा भरलेल्या वृत्तास 'आनंदात भर कंद' असे म्हणता येईल का?