वडे विरघळण्याचे कारण 'तेल तापले नसावे' या व्यतिरिक्त, वडे हलके होण्यासाठी त्यात खायचा सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो सॉल्ट चुकून घातले असेल हे असू शकते.
उडदाच्या डाळीची प्रत जरी चांगली नसेल आणि पाणी बरेच कमी असेल तरी कधी कधी वडे फुटतात. पाणी कमी असेल तर वड्याचे कवच जरा कडक होते आणि आंत वाफ अडकून वडे फूटतात असे मला वाटते. त्यामुळे थोडे पाणी असावे. म्हणजे, पाककृतीच्या परिभाषेत त्याला पीठ 'ओतीव' नसावे, असे म्हणता येईल. पण चमच्याने किंवा हाताने वडा (गोल आकारात) तेलात सोडता येईल असे असावे. दूसरे, पीठ एकदम गुळगुळीत वाटावे. पीठ वाटल्यावर लगेच वडे करण्यासाठी ते हाताने खूप फेसून घ्यावे. (बोटांमध्ये अंतर ठेवून हात पिठातून एकाच दिशेने गोलाकार, जोरजोरात फिरवावा.) पीठ तसेच आंबण्यासाठी ठेवले तर नंतर सुद्धा वरील प्रमाणे त्यात हात फिरवून आत जमा झालेली हवा काढून टाकावी आणि वडे तळावे. पण पीठ आंबवून वडे केले तर ते तेल जास्त पितात आणि वडे तेलकट होतात. त्यामुळे पीठ आंबण्याची वाट न बघता, वाटून झाले की ताबडतोब खूप फेसून घेऊन लगेचच वडे तळावेत. तेल मंद आंचेवर तापवून वडे गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. तेल जास्त तापले तर वडे न फुगता बाहेरून गुलाबी झाले तरी आतून कच्चेच राहतात. एका वेळी ४ -५ वडे तळावे. वडे तेलात सोडल्यावर लगेच त्यांना झार्याने हलविण्याची (ते खाली किंवा एक्मेकांना चिकटले तरीही) घाई करू नये. वरचे कवच शिजले की वडे हलक्या हाताने सोडवून घ्यावेत.
धन्यवाद.