पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे "आटे में नमक'

पाकिस्तान हा भारताचा कधीकाळी भाग होता. फाळणीनंतर आता तेथील संगीताची स्थिती काय असेल, याबाबत माझ्या मनात नेहमीच कुतूहल आहे. मी खरेतर जातीभेद मानत नाही; परंतु शास्त्रीय संगीत समृद्ध करण्यात मुस्लिम कलाकारांचा मोलाचा वाटा आहे, असे माझे ठाम मत आहे. पाकिस्तान आज अराजकाच्या गर्तेत सापडला आहे. तेथील सांस्कृतिक क्षेत्राला मूलतत्त्ववाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. तेथील संगीताबद्दल खास करून शास्त्रीय संगीताबद्दल कुतूहल आहे. प्रख्यात गझल गायक मेहदी हसन यांचे चिरंजीव असिफ मेहदी मैफलीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे परस्परांविषयीची दृष्टिकोन बदलले आहेत. त्याप्रमाणे संगीत क्षेत्रही बदलले आहे का, तेथील सांगीतिक माहोलमध्ये काही फरक पडलाय का, असं विचारल्यावर असिफ म्हणाले, ""संगीताची उत्पत्ती हीच मुळात भारतात झाली आहे. पाकिस्तानचेही तसेच आहे. त्यामुळे संगीतात फारसा बदल झालेला नाही. भारतात जे शास्त्रीय संगीत-रागरागिण्या आहेत. त्याच तिथे आहेत; परंतु भारतात संगीताला "मजाक' समजले जात नाही. या संदर्भात मला भारत आणि पाकिस्तानच्या संगीतात थोडा फरक जाणवतो. बाकी सगळे सारखेच आहे. माहोलही सारखाच आहे.''

भारतात संगीत आणि कलाकाराला भरपूर मानसन्मान मिळतो. तसा पाकिस्तानातील कलाकारांना मिळत असेल का? संगीत क्षेत्राकडे पाहण्याचा सरकार आणि लोकांचा दृष्टिकोन कसा असेल, याविषयी मला जाणून घ्यायचं होतं... ""पाकिस्तानमध्येही खूप आवडीने संगीत ऐकले जाते. त्यामुळे जनता आणि सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते. मानसन्मान मिळतो. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे मेहदी हसन आहेत. तिथे आजही ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत,'' असं असिफनं मला सांगितलं.

गझल गायकी हा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे; पण सध्या त्याला "सुगम संगीता'चे स्वरूप आले आहे, या माझ्या मतावर आसिफनंही होकाराचा शिक्का मारला. ""आज-काल गझल म्हणून जे गायले जाते त्याला गझल नव्हे; गीत म्हणायला हवे. गझलचा जो "मिजाज' आहे त्यात भाव, शब्द आला महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताची जानकारी असणेही तेवढेच आवश्‍यक आहे. ती नसेल तर गझलेचा भावार्थ लोकांपर्यंत पोचविता येणारच आहे. आज जे गायले जात आहे, ती गझल नाही.'' ही असिफची स्पष्टोक्ती!

आजचे संगीत "ग्लोबल' झाले आहे. "फ्युजन'चा जमाना आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा आशियाई संगीत यात पॉप, रॉक आदींचा वापर वाढू लागला आहे. याचा शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होईल, अशी भीतीसंगीताचा विचार करणारा प्रत्येकजण उगाचच करीत असतो. माझ्या भीतीवर असिफनं फार मार्मिक उत्तर दिलं, ""शास्त्रीय संगीतावर कोणताच परिणाम होणार नाही. कारण ते सत्य आहे. सत्य हे चिरंतन असते. संगीत क्षेत्रातील "फ्युजन' निश्‍चितच चांगले आहे. त्यातून चांगले संगीतच आपल्याला मिळेल. एक उदाहरण देतो. पूर्वी उपचारासाठी संगीताचा वापर केला जायचा-आजही केला जात आहे. माझे आजोबा इस्माईल खॉं हे "जिल्फ' नावाचा राग गाऊन लहान मुलांची पोटदुखी बरी करायचे. भारतातील इंदूर संस्थानच्या महाराजांच्या पुतणीला कर्करोग होता. एका संगीतकाराने तानपुऱ्याच्या झंकाराने तिला बरे केले. संगीताचे हे माहात्म्य आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत कधीही लोप पावणार नाही.''

पाकिस्तानात मूलतत्त्ववाद्यांचे वर्चस्व वाढत आहे. त्यांना संगीत मान्य नाही, असे बातम्यांमधून ऐकायला वाचायला मिळतं. सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून याविषयी मी असिफला विचारलं. ""पाकिस्तान हा इस्लामिक देश असल्याने तेथे अनेक लोक गायन-वादनाला चांगले मानत नाहीत. हे खरे आहे; परंतु लोकप्रियतेचा विचार केला तर तेथील नव्वद टक्के लोकांना संगीतात रस आहे. या प्रमाणातच आम्हालाही तिथे प्रतिसाद मिळतो. संगीत मान्य नाही, असे खूप कमी लोक आहेत. त्यांच्या तीव्रता "आटे में नमक' अशी आहे. या लोकांच्या विरोधामुळे पाकिस्तानातील संगीत कमी झालेले नाही. किंबहुना त्यात वाढच झाली आहे,'' अशी टिपण्णी असिफनं केली.

त्यावर मी म्हटलं, अशा लोकांच्या विरोधामुळे संगीतकार, गायक यांच्यावर पाकिस्तान सरकारकडून बंधने लादली जातात का? असिफनं सांगितलं, ""अजिबात नाही. उलट कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे तेथील सरकारचे धोरण आहे.''या संवादानंतर मेहदी हसन आणि स्वत:च्या काही अप्रतिम गझलाही असिफनं सादर केल्या.

क्‍या बात है?... मेहदी हसन यांचीच याद आली...!

www.santshali.blogspot.com