पुतळा

तो पुतळा होता एका राष्ट्रपुरुषाचा…ज्याने समाजाला अनेक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला अशा महान विचारवंताचा.   शहरातल्या भर गर्दीच्या चौकात अगदी मध्यभागी उभा असलेला…त्याच्या भोवती एक छोटेसे रिंगण. वाहतुकीचे नियंत्रण सोपे जावे म्हणून बांधलेले. लोकांना त्या महापुरूषाच्या विचारांची,   त्याने दिलेल्या शांतीच्या शिकवणुकीची सदैव आठवण राहावी ह्या सदहेतूने बांधलेला तो पुतळा..

एका रात्री कुणीतरी त्यापुतळ्याच्या गळ्यात चपलांचे हार घातले.

सकाळी जशी वर्दळ वाढायला लागली तशी बातमी सगळीकडे पसरली. लोकं पेटून ऊठली.   चर्चा चालू झाल्या.   आमच्या नेत्याच्या गळ्यात असा चपलांचा हार घातला जातो म्हणजे काय? केवढा मोठा अपमान आहे हा! ह्या अपमानाचा बदला घ्यायलाच हवा. नारेबाजी चालू झाली. चिडलेल्या लोकांनी पहिला मोर्चा काढला तो महानगरपालिकेच्या कार्यालयावर…सरकारविरोधीघोषणा, बसची तोडफोड, महानगरपालिकेच्या आवारात दगडफेक, बंदची मागणी…  मग लोकांना आवरायला पोलीस.... लाठीमार झाला. अश्रुधूराची नळकांडी फोडली गेली. लोकं जखमी झाली. दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. सुरळीतपणे चालू असलेले दैनंदीन व्यवहार ठप्प व्हायला लागले. अस्वस्थतेचे परिणाम सगळ्या शहरात दिसायला लागले. जमावकरून, काठ्या घेउन, घोषणा देत देत लोकं इकडे तिकडे धावायला लागले…दिसेल त्याची तोडफोड करायला लागले. खूप नुकसान झाले…वाहनांचे, इमारतींचे, माणसांच्या आयुष्यांचे…ज्यांचा ह्या घटनेशी प्रत्यक्षपणे संबंध होता असेही आणि ज्यांचा काहीही संबंध नव्हता असेही हकनाक बळी पडले…

ज्या महापुरूषानेशांती, अहिंसा, खरेपणा, माणसामाणसांतली समानता ही तत्त्वे लोकांना शिकवण्यासाठी आयुष्य वेचले, स्वतःच्या आचरणातून आदर्श घालून देण्यासाठी सतत प्रयत्न केले, त्याच्या पुतळ्याच्या अवहेलनेमुळे केवढी ही अशांतता…. केवढी ही हिंसा…केवढी ही हानी…

काय दिसलं ह्या सगळ्यातून? लोकांच्या मनात त्या समाजसुधारकाबद्दल असलेला आदर? त्याच्या तत्त्वांची केलेली जपणूक? की त्याच्यावरच्या प्रेमापोटी त्याच्याच तत्त्वांना घातलेली मुरड? की फक्त सदसदविवेकबुद्धीचा अभाव? पैशाचा, वेळेचा आणि मालमत्तेचा अपव्यय? की विचार न करता विध्वंसक होणारी mob mentality?

का हे सगळं एक षडयंत्र असावं? सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी, त्यांच्या कारकीर्दीत किती अराजक माजले आहे हे लोकांना दाखवून देण्यासाठी घडवून आणलेलं नुसतं एक नाटक? सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतील अशा लोकांनी मुद्दामून ऊठवलेलं एक वादळ? पण मग त्यासाठी एवढी हिंसा? एवढी हानी?

खरं तर त्या समाजसुधारकाने केलेले कार्य एवढं मोठं आहे की काही चपलांच्या हारांनी त्याचं महत्त्व कधीच कमी झालं नसतं. लोकांच्या मनातलं त्याच्या बद्दलचं आदराचं स्थान कधीही ढळलं नसतं…

ज्यांना त्या महापुरूषाने दिलेली शांती, अहिंसा, खरेपणा, माणसामाणसांतली समानता ही तत्त्वे खरोखरी समजली, उमगली, त्यांना ह्या सगळ्या घटनांमधला विरोधाभास आणि विपर्यास जाणवत असेल. हा सगळा मूर्खपणा आहे असं मनोमन वाटतही असेल. अशाप्रकारांतला फोलपणा समजतही असेल. पण तो समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांपर्यंत पोचवायला हवा. अशा प्रकारे महानगरपालिकेवर दगडफेक करून, बसेसची जाळपोळ करून, मालमत्तेचे नु्कसान करून काहीही साध्य होऊ शकणार नाही.

‘वेळ’ आणि ‘पैसा’ ह्या दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अशा प्रकारे वाया घालवण्यात काही अर्थही नाही, हे जर सर्वांपर्य़ंत प्रभावीपणे पोचू शकले, पटवून देता येऊ शकले, तर कदाचित भविष्यात अशा घटना घडणारही नाहीत.