मराठी भाषा शब्दनिर्मिती

v   भाषा
कोणतीही भाषा त्यातील स्वर व व्यंजने ह्यापासून तयार झालेल्या शब्दांमुळे वाक्यांपर्यंत पोहोचते. भाषेत जितके जास्त शब्द तितकी तिची समृद्धी जास्त. त्यातही हे शब्द जर एक स्वतंत्र व नेमका अर्थ प्रतीत करणारे असतील तर त्या भाषेचे सामर्थ्य अधिकच जाणवते. माझ्या माहितीप्रमाणे "आप" ह्या शब्दाचा अर्थ पावसाच्या थेंबाच्या ढगांपासून पृथ्वी पर्यंत पोहोचण्याच्या मधल्या स्थितीसाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर त्याचे "पाणी" होते. हे शब्द समृद्धीचे एक उदाहरण. "एसोटेरिक" हा इंग्लिश शब्द "एखाद्या विषयाचे खास ज्ञान व आवड असलेल्या काही व्यक्तींचा समूह" यासाठी वापरतात. अशा नेमक्या व परिणामकारक शब्दांमुळे भाषा अत्यंत समृद्ध बनते.

अशी समृद्धी टप्प्याटप्प्यानेच येते. भाषेच्या प्रगतीत इतर भाषांमधून घेण्यात येणाऱ्या शब्दांचाही खूप मोठा वाटा असतो. इंग्लिश मध्ये अनेक शब्द युरोपातील अनेक भाषांमधून जसेच्या तसे अथवा संस्कार करून घेतले आहेत. फ्रेंच भाषेने इंग्लिशला अनेक शब्द बहाल केले आहेत. लॅटीन व ग्रीक भाषेच्या इंग्लिशला दिलेल्या देणग्यांबद्दल तर आपण जाणतोच.

अनेकदा आपल्याला काही शब्द जगातील बहुतांश भाषेत जवळपास सारखेच असल्याचा प्रत्यय येतो. पथ-पाथ, माता-मदर, भातृ-ब्रदर, असे काही शब्द व एक ते दहा अंकांना जगातील अनेक भाषांमध्ये काय म्हणतात हे पाहिल्यास खूप सारखेपणा दिसून येतो. ह्या ठिकाणी सारखेपणा म्हणजे एखादा शब्द आपल्याकडे दंत्य किंवा ओष्ठ्य अक्षरापासून सुरुवात करत असेल तर जवळपास तो त्याच प्रकारच्या शब्दांपासून इतर भाषांमध्येही सुरू होतो.  

असे मानले जाते की मानवाचा प्रवास दक्षिण आफ्रिकेतून जगभर झाला. अशी कल्पना करा की, सुरुवातीला त्याची जी एक भाषा असेल, ती हळूहळू एकाएका समूहाबरोबर जगभर विखुरताना त्यातील मूळ भाषेतील शब्द जवळपास तसेच राहून स्थानिक परिस्थितीनुसार जे जे नवीन शब्द तयार झाले त्यामुळे एक भाषा दुसरीपेक्षा वेगळी झाली असेल. जे शब्द त्यांच्या मूळ भाषेतून आले ते बहुतांश तसेच राहिले व त्यामुळे आपल्याला ते सारखेच वाटत असावेत.

पुढे ज्या भाषा अधिक विकसत गेल्या त्यात महत्त्वाची कामगिरी त्या त्या भाषेतील तज्ज्ञांनी केली व त्या भाषेला व्याकरण, लिपी मिळाली. हे ज्या भाषांत झाले नाही अशा कित्येक भाषा आजही फक्त बोलल्या जातात पण त्यांना लिपी नाही. उदा. कर्नाटकात बोलली जाणारी तुळू भाषा.

v   शब्द
हे सगळे काहीही असले तरी प्रत्येक भाषेचा गाभा एकच- शब्द!

शब्द ज्यांनी कोणी तयार केले त्यामागे त्यांचे जे काही हेतू असतील, त्यातील सर्वात महत्त्वाचा हेतू हा "संभाषण" करण्यास साहाय्य करतील असे शब्द करण्याचाच असेल. त्यामुळे मानवीसमूहाचे ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे ते नवज्ञान इतरांपर्यंत जाण्यासाठी नवीन शब्दांची निर्मिती आवश्यक झाली.

नवीन शब्द तयार करणे हे एक वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आहे. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे पाहिले असता आपल्याला एक निश्चित सूत्र मिळते. ते सूत्र आपल्याला त्या शब्दाच्या गाभ्यापर्यंत पोहोचवते. एकदा गाभा कळला की, त्यापासून आणखी नवे शब्द तयार करता येतात. शब्दांच्या उत्पत्तीबाबत अभ्यास करणाऱ्या शाखेला शब्द व्युत्पत्तिशास्त्र ("इटिमॉलजी" तसेच इतर काही शाखा, उदा- लेक्सीकॉलजी) म्हटले जाते. हा विषय शब्दांबद्दल खूप आवड व जिज्ञासा निर्माण करतो. ह्या जिज्ञासेमुळेच मी मराठीशब्द. कॉम हे कोजळ (वेबसाईट) तयार केले आहे.

मी मराठी भाषातज्ज्ञ नाही व माझा मराठीचा अभ्यास १० वीच्या मराठीच्या परीक्षेनंतर पूर्णपणे थांबला. नंतरच्या २५ वर्षात मी कधीही मराठीत लिहिले नाही, त्यामुळे माझे मराठी शुद्धलेखन, माझे अक्षर (की ज्याबद्दल मला अभिमान होता) ह्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला. पण मला जे मराठीचे ज्ञान आहे त्यानुसार मी हा लेख शब्दनिर्मिती बद्दल एक जाणीव व्हावी ह्या दृष्टीने लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मराठी भाषेत नवीन शब्द निर्मिती शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावी हा एकमेव हेतू ह्या लेखामागे आहे. मी भाषातज्ज्ञ नसल्यामुळे ह्या लेखात काही चुका अनवधानाने झाल्या असतील तर माफी असावी व आपण त्या चुका मला कळवल्यात तर मी त्याचा आनंदाने स्वीकार करीन. हा लेख वाचताना तो एका आधुनिक सामान्य मराठी भाषकाने त्याला मराठीबद्दल काय वाटते ते विचार व्यक्त करण्यासाठी लिहिला आहे असे समजून वाचला तर माझे विचार आपणांपर्यंत योग्यरीतीने पोहोचतील असे वाटते.

v   ह्या लेखाचा सारांश असा आहे:
१. शब्द म्हणजे काय? ह्याची एक चर्चा शब्दाच्या व्याख्येपासून सुरुवात करून केली आहे.

२. त्या व्याख्येबद्दल सखोल चर्चा केली आहे.

३. एखादा शब्द मराठी आहे की नाही हे त्या व्याख्येनुसार कसे ठरवता येईल त्याबाबत चर्चा केली आहे.

४. मराठी भाषेसमोरची आव्हाने कोणती हे व्यक्त केले आहे.

५. लेखाच्या शेवटी, पुढे कसे जाता येईल ह्याबाबत विचार मांडलेले आहेत.

 

पुढे जाण्याआधी, ज्ञात-अज्ञात अशा सर्वजणांना मी नमन करतो की ज्यांनी, नवीन मराठी शब्द निर्मिती केली आहे, करत आहेत.

v   मराठी शब्द: व्याख्या
खाली मी ६ व्याख्या मुद्दाम दिल्या आहेत. त्या व्याख्या क्रमाक्रमाने प्रगत करत नेल्या आहेत.

१. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या कोणत्याही रचनेला शब्द असे म्हणता येते.

२. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या अर्थपूर्ण रचनेला शब्द असे म्हणता येते.

३. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की जी मराठी व्याकरणाच्या नियमांना बांधील आहे.

४. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटुंब, समूह अथवा समाज एकमेकाशी संभाषण करू शकतील.

५. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने व मराठी व्याकरणांच्या नियमांना अनुसरून उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटुंब, समूह अथवा समाज एकमेकांशी संभाषण करू शकतील.

६. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने व मराठी व्याकरणांच्या नियमांना अनुसरून उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटुंब, समूह अथवा समाज एकमेकांशी सर्व-संभाषण करू शकतील.

मराठी शब्दाची व्याख्या करणे हे तितकेसे सोपे नसले तरी मला जे म्हणायचे आहे ते ६व्या व्याख्येने बऱ्यापैकी ग्रहण केले आहे असे वाटते. [माझ्या एका अमेरिकन मित्राला जर मी ही व्याख्या समजावून सांगितली तर तो म्हणेल, "ठिस देफ़िनितिओन विल्ल च्रच्क उन्देर इत्स वोन वेइघ्त.. "  :-)]

६व्या व्याख्येत ठळकपणे मांडलेल्या सूत्रांबद्दल थोडे बोलूया. ही व्याख्या "मराठी स्वर व व्यंजने", "मराठी व्याकरण", "अर्थपूर्ण रचना", "सर्व-संभाषण" अशा मुख्य चार सूत्रांना गुंफते. हे प्रत्येक सूत्र खाली विस्तृत केले आहे.

Ø     "मराठी स्वर व व्यंजने"
मराठीत खालील स्वर व व्यंजने आहेत:-

स्वर:

अ, आ, इ, इ, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ऍ, ए, ऐ, ऎ ऑ, ऒ, औ, ऍं, अं, अः

व्यंजने:

क, ख, ग, घ, ङ | च, छ, ज, झ, ग, ञ | ट, फ, ठ, ड, ढ, ण | त, थ, द, ध, न, ऩ | प, फ, ब, भ, म  | य, र, ल, ळ, व, | श, ष, स, ह, ज्ञ

स्वर व व्यंजने ह्याच्या संयोगाने आपण व्यंजनांची विविध रूपे निर्मितो- अक्षरे व बाराखडी. ६व्या व्याख्येत हा संदर्भ घेतला आहे. मराठी शब्द ह्या स्वर व व्यंजनांच्या विविध रूपांपासून (अक्षरे व बाराखडी) तयार होतात. [आपण देवनागरी लिपीचा वापर करून ते लिहितो. ] म्हणजेच मराठी शब्द असा की जो मराठी स्वर व व्यंजनांनी बनलेला आहे.

Ø     मराठी व्याकरण
 

मराठी शब्द असा की ज्याला मराठी व्याकरणाचे सर्व नियम लागू होतात.

नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय, क्रियापद अशा प्रमुख प्रकारात तो मोडतो.

त्याची भूत, भविष्य, वर्तमान व ह्या काळांच्या स्थितीनुसार निर्माण होणारी रुपे आहेत.

त्याची स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग अशी रूपे आहेत.

त्याची एकवचन व अनेकवचन अशीही रूपे आहेत.

त्याची होकारार्थी व नकारार्थी रुपे आहेत.

व्याकरणाचे वरील सामान्य नियम ज्या शब्दाला लागू होतात, तो मराठी शब्द.

Ø     अर्थपूर्ण रचना
 

अर्थपूर्ण रचना अशी की जी शब्दातील भाव व्यक्त करू शकते.

"रद्दड" म्हटल्यावर तो शब्द नेमके भाव आपल्यापर्यंत पोहोचवतो. कारण तो शब्द "रद्दी" ह्या मूळ शब्दापासून तयार झालाय व आपल्याला त्या शब्दाचा स्वतः:चा असा एक अर्थ माहीत आहे. "आणि त्याचा चेहरा लालीलाल झाला"... मध्ये "लालीलाल" चा अर्थ आपल्यासमोर आपसूक पोहोचतो.

अर्थपूर्ण रचनेचे आणखी एक विशेषण असे सांगता येईल की असा शब्द की जो एका मूळ शब्दरचनेशी निगडित असतो. उदा. फांदी, पान, फळ, फूल, खोड, पानगळ, वठणे, पारंब्या, मूळ, हे शब्द "झाड" ह्या मूळ शब्दरचनेशी निगडित आहेत. आपल्याला "पानगळ" म्हटले की आणखी वेगळे काही सांगावे लागत नाही.

खुरपणी, मशागत, लागवड, तोडणी, म्हटले की आपण कशाबद्दल बोलतो आहे ते "कळते". ह्या "कळवण्याच्या" सामर्थ्याला अर्थपूर्ण रचना म्हणता येईल.

मराठी शब्द जे की त्यांच्यातून आपल्याला कळते.

Ø     सर्व-संभाषण
 

बोलणे, लिहिणे, ऐकणे, वाचणे, शिकणे, शिकवणे, विचारणे, इ. क्रियांतून जे घडते ते सर्व-संभाषण.

गरजेनुसार एखाद्या मराठी भाषिकाने वरील कोणत्याही संभाषण साधनांचा वापर करताना अपेक्षित विचार पोहोचवण्यासाठी जे शब्द वापरले ते मराठी शब्द.

एखाद्या मराठी भाषिकाने एखाद्या व्यक्तीशी, समूहाशी, समाजाशी परिणामकारक संवाद साधण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला ते मराठी शब्द.

हे सूत्र समजावून घेताना, त्याचा आधीच्या तिन्ही सूत्रांशी असलेला संबंधसुद्धा लक्षात घेतला पाहिजे.

वरील चारही सूत्रे एकमेकांत विणली तरच ६व्या व्याख्येचा अपेक्षित अर्थ आपल्याला "मराठी शब्द" कशास म्हणता येईल ते सांगतो.

आता आपण ही व्याख्या चालवून पाहू.

मी जर "ट्रबल" हा इंग्लिश शब्द आता लिहिला आहे तसा देवनागरी लिपीत लिहिला की, तो वरील चार सूत्रांची कसोटी पार करतो का पाहू. माझ्यामते हा शब्द ४ पैकी ३ कसोट्या पार करतो पण मराठी व्याकरणाची कसोटी नाही.

१. ट्रबल हा शब्द देवनागरी लिपीत लिहिला, की तो आपली पहिली कसोटी पार करतो. कारण हा शब्द मराठी स्वर व व्यंजनांनी बनला आहे.

२. ट्रबल हा शब्द वाक्यात वापरला की त्याचा अर्थ कळू शकतो. उदा. "अरे, तो खूप ट्रबल मध्ये आहे, त्याने ज्या पतपेढीत आयुष्यभराची कमाई ठेवली होती, ती पतपेढी बुडली". ज्यांना ट्रबल ह्या मूळ इंग्लिश शब्दाचा अर्थ माहिती नसेल त्यालाही थोडीफार त्या शब्दाची जाणीव होईलच. म्हणजेच हा शब्द "अर्थपूर्ण" आहे असेच म्हणता येईल. ही कसोटीही पार झाली.

३. असे समजू की वरील संवाद दोन व्यक्तीतला होता. ज्याने हे वाक्य व ट्रबल हा शब्द ऐकला त्याला सांगणाऱ्याने त्याले जे सांगायचे होते ते परिणामकारकतेने सांगितले. म्हणजेच "सर्व-संभाषणाची" ही कसोटीही पार झाली.

४. व्याकरणाची कसोटी का पार होत नाही ते पाहूया.

"अरे, त्याच्या समोर अडचणींचा डोंगर उभा आहे. " ह्या वाक्यात "अडचण" ह्याचा समानार्थी "ट्रबल" हा शब्द टाकून पाहू. "अरे, त्याच्या समोर "ट्रबलींचा" डोंगर उभा आहे. " असे आपण म्हणतो का? त्याऐवजी, आपण "अरे, त्याच्या समोर खूप ट्रबल्स आहेत. " असे म्हणतो. मूळ ट्रबलचे अनेकवचन करताना आपण त्या शब्दाचे इंग्लिश अनेकवचन घेतो. म्हणजेच ही कसोटी नापार.

व्याकरणाची कसोटी पार न झाल्यामुळे मी असे म्हणू शकतो की, ट्रबल हा शब्द मराठी शब्द नाही.

आपण असेही म्हणू शकतो की, "ट्रबल" ह्या शब्दावर मराठी संस्करण न झाल्यामुळे सध्यातरी तो मराठी शब्द नाही.

हे असे म्हणायचे कारण म्हणजे, मराठी भाषेत इतर अनेक भाषांतून अनेक शब्द आले आहेत. पर्शियन भाषेतील अनेक शब्द मोगल काळात मराठीत आले व आज मराठी भाषेत त्या शब्दांची अनेक रूपे पाहावयास मिळतात. मोगलांच्या काळात मराठीवर जे परिणाम झाले, तेच आज इंग्लिश मुळे होतायेत.   जो पर्यंत त्या इंग्लिश शब्दांची मराठी रूपे आपण वापरत नाही, उदा. डॉक्टर-डॉक्टरांचे-डॉक्टरांनी, सायकल-सायकली-सायकलींचे-सायकलींचा, तोपर्यंत आपण अशुद्ध मराठीच बोलतो आहोत असे म्हणता येईल.

मुद्दा हा की, जर एखादा परकीय शब्द आपल्याला मराठीत वापरायचा असेल तर त्या शब्दाचे मराठीकरण वरील चार सूत्रांचा वापर करून केला तर ते योग्य दिशेने टाकलेले पाऊल ठरेल.  

v   मराठी भाषेसमोरील आव्हाने व प्रश्न:
 

मराठीला जी आव्हाने आहेत, तीच आज भारतातील किंवा इंग्लिशेतर अनेक भाषांसमोर असतील. (माझी खात्री आहे की ह्या यादीत चायनीज भाषा नसेल). ही आव्हाने म्हणजेच खालील काही मानसिक, तांत्रिक प्रश्न.

१. हा प्रश्न एखाद्या भाषेने दुसऱ्या भाषेवर केलेल्या सांस्कृतिक आक्रमणाचा नसून, हा प्रश्न ज्या भाषेवर आक्रमण होत आहे त्या भाषिकांनी होणारे बदल तंत्रशुद्धतेने न घडवून आणल्याने भाषेचे जे एक अशुद्ध रूप निर्माण झाले आहे, त्याचा आहे. हा प्रश्न ह्याबाबतची जागरूकता नसल्याचा आहे.

२. हा प्रश्न आपण इंग्लिश शिकताना जी काळजी घेतो तीच काळजी मराठी नीट सर्व-संभाषणासाठी न घेण्याचा आहे.

३. हा प्रश्न एखाद्या प्रसिद्ध अमराठी व्यक्तीने मराठीत एखाद-दुसरे वाक्य बोलले तरी टाळ्या-शिट्या वाजवून दाखवलेल्या मानसिक दुर्बलतेचा आहे.

४. हा प्रश्न उदा. एखाद्या खाणेरीत (उपाहारगृहात, रेस्तराँत) गेल्यावर मराठी अभिमानाने न बोलता तोडक्यामोडक्या अशुद्ध इंग्लिश मध्ये बोलून मराठीपण झाकण्याचा आहे.

५. हा प्रश्न आम्ही बोलतो तीच शुद्ध मराठी व ग्रामीण मराठीला "ग्रामीण" ह्या एकाच वेष्टणात गुंडाळून सर्वात प्रथम त्या मराठी भाषाप्रवाहांशी संकर न करण्याचा आहे. कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, इ. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना दूर ठेवण्याचा आहे.

६. ह्यानंतर हा प्रश्न शब्दांच्या मदतीसाठी इतर भारतीय भाषांशी संकर न करता फक्त इंग्लिशशी करण्याच्या मानसिकतेचा आहे.

एक छोटीशी घटना सांगून मी हा मुद्दा संपवतो. १९९४ ला मी पॅरिसला गेलो असताना मला पॅरिस विमानतळाला जाण्यास  ३ जणांचे रेल्वे तिकीट (मराठी संस्करण झालेला हा एक इंग्लिश शब्द) काढण्यासाठी गेलो. तिकीट देणाऱ्या महिलेला इंग्लिशमध्ये मी विमानतळाचे तिकीट मागितले. जाणीवपूर्वक मी माझ्या वाक्यात "चार्ल्स-द-गॉल" असा शब्द टाकला होता व बोलताना बोटांनी मुद्दाम ३ बोटे दाखवत होतो. ती महिला ढिम्म. पुन्हा पुन्हा सांगूनही ती काहीच हालचाल करेना, तेव्हा माझ्या मागच्या फ्रेंच महिलेच्या काय जे लक्षात यायचे होते ते आले. ती पुढे आली व मला कुठे जायचे आहे ते विचारून, फ्रेंचमध्ये त्या तिकीटवालीला सांगून मला तिकीट काढून दिले. ह्या प्रसंगाआधी गेल्या दोन दिवसात असे अनेक प्रसंग माझ्यावर आले होते व रस्ता विचारताना, खरेदी करताना, सगळीकडे इंग्लिश बोलले की प्रतिसाद अमित्र असायचा. पण एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याकडून, जिथे पर्यटन हा एक मुख्य व्यवसाय आहे, अशी वागणूक अपेक्षित नव्हती. तरीसुद्धा जे काही झाले, त्यामागे त्यांची त्यांच्या भाषेबद्दलची आग्रहाची भूमिका चांगलीच लक्षात राहिली. नुकत्याच झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्यांच्या अध्यक्षांनी चायनीजमधे केलेले भाषण आपण सर्वांनी ऐकले-पाहिले.

v   पुढे काय?
 

पुढे काय हे जाणण्याआधी, एक चर्चा करूया. महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आज आहे, त्यात "मराठी" भाषक किती असतील? ह्या चर्चेपुरते असे मानू की ते, लोकसंख्येच्या ६०% आहेत. ह्या ६०% पैकी, कितीजण त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी अशी मराठी बोलतात की जी इंग्लिश शब्द न वापरता बोलूच शकत नाहियेत? ५%? १०%? ही संख्या कदाचित १०% च्या आसपास असेल. इतर लोक आजही त्यांची मराठी बोलून त्यांचे रोजचे व्यवहार पुरे करतायत. पण, त्यांच्यावरही बरेच आक्रमण होते आहे आणि जसजसे नवीन तंत्रज्ञान हे त्या उरलेल्या लोकांपर्यंत पोहोचेल, तसतसे त्यांची भाषा बदलायला सुरुवात होईल. उदा, "मोबाईल फोन" च्या वापराबरोबर येणारे "रीचार्ज", "एस. एम. एस", "डायल ट्यून" "प्लॅन" असे शब्द त्यांना वापरण्यावाचून चालणार नाही. तरीसुद्धा, बोली मराठी खऱ्या अर्थी जिवंत असेल तर ती खेड्यांमध्येच- जिथे जागतिकीकरणाची झळ अजून कमीच पोहोचली आहे. (खतांच्या आणि कीटकनाशकांच्या मजेशीर नावांमुळे ते वारे पोहोचल्याचे जाणवत होते पण आता वेग वाढणार.. )

मुद्दा १- नवीन शब्द निर्माण करताना, तो शब्द कितीजण वापरणार आहेत त्याप्रमाणे त्यावरून त्याचे महत्त्व ठरवता येईल.

दुसरा मुद्दा आहे तो मूळ मराठीतील शब्दांचा योग्य जागी नेमका वापर करण्याचा. जर एखाद्या स्थितीसाठी शब्दच नसेल तर तो निर्माण करण्याचा. उदा. (कदाचित माझेच मराठीचे ज्ञान कमी असेल म्हणूनही मला असे शब्द आहेत की नाही माहीत नाही. पण एक उदाहरण म्हणून ह्याकडे पाहावे. )

मला जर "आवड" ह्या शब्दाचा वेगवेगळ्या स्थितीसाठी वापर करायचा असेल तो शब्द तोकडा पडतो.

"त्याला गणिताची आवड जरा कमीच आहे"

"त्याला गणित आवडते"

"त्याला गणित बरेच आवडते"

"त्याला गणित खूप आवडते"

"गणित म्हणजे त्याचा अत्यंत आवडीचा विषय. "

वरील वाक्यामध्ये आवड ह्या शब्दाची चपखल बसतील अशी रुपे हवी आहेत की जी एखाद्याच्या आवडीच्या पातळीचा नेमका अर्थ पोहोचवतील.

हे असे असणे केवळ भाषेच्या सौंदर्यासाठीच आवश्यक नसून काही व्यावहारिक कारणांसाठीही आवश्यक आहे. उदा, एखाद्या वृत्तपत्रात सरासरी ५०००० शब्द रोज छापावे लागतात. त्याऐवजी जर नेमके शब्द वापरल्यामुळे १०% जागेची बचत होत असेल तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतील. जागेच्या बचतीबरोबरच मनुष्यतासांची बचतही महत्त्वाची असेल- लिहिणाऱ्याच्या व वाचणाऱ्याच्या.  

मुद्दा २: जुन्या काही शब्दांची पुनर्बांधणी हा भाषेच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे.

मध्यंतरी दै. सकाळमध्ये एका महोदयांनी, शाळांमध्ये मराठी शिकवताना ती "साहित्याच्या" मदतीने शिकवण्याच्या एकांगी शिक्षणपद्धतीबद्दल खूप मार्मिक विचार मांडले होते. ह्यामुळे "भाषेचा" अभ्यास मागे पडून भाषेचा वापर फक्त समोर येतो पण पाया कच्चाच राहतो असे योग्य विचार मांडले होते.

एम. ए मराठीचा (एम. ए. ला मराठी शब्द का वापरत नाहीत? ) अभ्यासक्रम तपासला असता त्यामध्ये "शब्द व्युत्पत्ती शास्त्राचा" उल्लेख दिसला नाही.

मुद्दा ३: शब्द निर्मिती हा एक आवश्यक विषय मानून त्याचा शाळांमधूनच अभ्यास सुरू झाला पाहिजे.

खरे म्हणजे ह्या विषयावर अजून बरेच लिहिता येईल. वरील लेख ह्या विषयावरची सुरुवात आहे असे मानून येथेच थांबतो.  


अजय सु. भागवत, पुणे. [ajaybhagwat@marathishabda.com] http://www.marathishabda.com/shabda/?page_id=221