लग्न एक जुळवणे.

१९४९--१९५० सालातली गोष्ट आहे.आमचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड. तालुक्याचे ठिकाण. आमचा व्यवसाय पिढिजात भिक्षुकीचा. खुद्द खेड शहरातील आणि आजुबाजूच्या १५ - २० गावातील भिक्षुकी आमच्याकडे होती.

लग्नसराईत आजुबाजूच्या गावातील कुळवाडी, मराठे समाजातील मंडळी नवर्या मुलग्याची आणि मुलीची पत्रिका जमते का नाही हे पहाण्यासाठी आमच्याकडे येत असत. आता पत्रिका पहाणे हा प्रकार जरी असला तरी प्रत्यक्ष पत्रिका पहाणे हा प्रकार नसावयाचा. मुलग्याचे नाव आणि मुलीचे नाव सांगून, त्या नावांवरूनच फक्त लग्न जमत आहे का नाही ते सांगावयाचे. यालाच नावरस जुळते का नाही असें म्हणत असत.

दुपारी साधारण ३ च्या सुमारास  मुलग्याकडील ४-५ मंडळी आणि मुलीकडील ४-५ मंडळी आमच्याकडे येत असत. आमचे वडील त्यावेळी वामकुक्षी घेत असत. आम्ही मंडळीना थंडगार पाण्याची एक कळशी आणि चार फुलपात्रे आणि खावयास गूळ देऊन वडीलाना उठवत असू.

वडील उठल्यावर चूळ भरून येऊन पंचांग घेऊन मंडळींच्या समोर बसून विचारत असत.  "काय जाबर्यानू, काय लग्न काढलत की काय? तुमचा मुलगा का गोरिवल्यांचा मुलगा? " " होय भाऊ, आमचा मुलगा आणि गोरिवल्यांची मुलगी." जाबरे बोलत.

" मग बोला. काय नावे आहेत दोघांची?  भाऊ विचारीत. " मुलग्याचे नाव गोपाळ आणि मुलीचे जानकी."  गोरिवल्यांपैकी एक म्हातारा सांगे. त्यावर वडील विचारत "दोघांची नावं नावरसची का चालू "  " नाय बा, दोघांची नावरसचीच. " आणखी एक म्हातारा. आता नावरसचे नाव म्हणजे, मूल जन्माला आल्यानंतर भडजीकदे जावून, भडजीला जन्म वेळ सांगून भडजी जे नाव सांगेल ते नाव. आणि चालू नाव म्हणजे भडजीला न विचारता ठेवलेले नाव.

मग वडील पंचांगात बघून काही बोटे मोडून सांगत. " गोरिवल्यानू, हे काही जमत नाही. बघा काय करावयाचे ते. "

" मग काय परस्नच मिटला. चला मंडळी " असे म्हणून आपल्या घोंगड्या, पागोटी घेऊन, निरोप घेऊन मंडळी निघावयाची.भाऊही आपली उरलेली वामकुक्षी  घेण्यासाठी आडवे होयचे.

पाच मिनिटानंतर हीच मंडळी कवाडीत हजर.  " अरे बाला, जरा भाऊना बोलाव. " एक म्हातारा."आता काय आणखी?

जमत नाही म्हणाले ना? "  आम्ही विचारले. " तू त्याना उठव ता खरा " दुसरा म्हातारा. वडील उठावयाचे. " काय गोरिवल्यानू काय झाल? " वडील विचारत.

" भाऊ, मी काय सांगता, मंजे सांगण्यात आणि ऐकण्यात वाइच घोटाळाच झाला. मुलग्याचे नाव गोपाळ नाही. दशरथ हो. आमची म्हातारी त्याला तिच्या म्हातार्याच्या नावाने उगाच गोपाल गोपाल करावयाची. तेच आमच्या तोंडात बसल झाल. " 

मुलग्याचा बाप बोलला. वडील परत पंचांग उघडून, बोटे मोडून म्हणत. " हे छान जमत आहे. पण ही दोधांची नावरसचीच नावे ना?  " वडील विचारत. " तर हो !  दोघांच्या वेळेला तुमच्याकडेच तर आलो नव्हत का ! " मुलग्याचा काका." हला मंडळी हला. ठरल्यापरमाने झ्याक झाल. भाऊ येताव बरका. " असे म्हणून मंडळी खुशीत उठावयाची आणि काण्यांच्या होटेलात वाइच चाय पियायला जावयाची.