फार फार दिवस झाले. किरणनगरीत विजयकुमार नामकं एक तरुण राहत होता. अतिशय शूर, वीर आणि चतूर होता तो. एकदा एका लढाईत तो जखमी झाला. परदेशी सेनेनं घायाळ कुमाराला पकडून नेलं व कैदेत ठेवलं. काही दिवसांनी विजयला बादशहासमोर दरबारात आणलं. तिथं शहाला लवून सलाम करणं जरूरी होतं पण अभिमानी कुमाराला ते का रुचतं ? तो गुपचिप उभा राहिला. हे बघुन शहाच्या डोळ्यातून आगीची बरसात होऊ लागली. अन तोच कुमाराला यावर तोड सुचली.
तो पुढं गेला. बोटातली अंगठी काढली व सिंहासनापुढं भूमिवर अलगद फेकली. नंतर ती उचलायला तो वाकला...... झालं ! बादशहाला वाटलं की यानं सलामच केला, मग तो खूष झाला. पुढे कुमाराची लवकरच सुटका झाली. सापही मेला व लाठीही तुटली नाही.