आभाळ वेडे

प्रतिभायोगे एकदाची, घटिका भरली निर्माणाची
यथावकाश ओघवली, कविता इवलीशी नवसाची.

हळूहळू दिसामासी, वाढू लागे कविता तैसी ,आनंद बहु कविमानसी
चिंता परी लगोलग त्यासी, तिच्या पुढल्या प्रवासाची.

कधी कविचे बोट धरुनी, कधी त्याच्या कडेवरुनी
कविसंमेलनी, काव्यवाचनी, कविसंगे कविताही जाऊ लागली.

बहरून सर्वांगी झाली थोर, कविमना लागे घोर
हिला अनुरूप तालेवार, मिळे कोण असा रसिकवर ?

धीर करुनी मग कविराव, शोधे फिरे गावोगाव
मुद्रेवरी वधुपित्याचे भाव, त्याच्या काव्यवाचना वाव
परि कुठे मिळेना,

दामटावे घोडे पुढे आपुले हे धाडस त्याला होईना !

सोन्यावाणी लेक लाडकी, तिला मिळेल का कुणी रत्नपारखी....
मिळेल का स्नेही हितचिंतक, काव्यप्रेमी अन् दर्दी वाचक?

परि कविला पुरते ठाऊक,
येते जेथुन काव्य तेथुनच, येती ते गुणग्राहक रसिक....

नशिबावरि ठेवून हवाला, प्रकाशना धाडिले तियेला
काळ बहु लोटियला पण, देईना कुणी होकाराला.

कालगतीने एके दिवशी, गेला तो कवि निजधामासी
पंचत्त्वी तो  विलीन होई, परि चित्त तयाचे मागे राही,
नभातुनी तो पाहत राही.

नित्यनेमे मग कविता ती, बसे येऊनी ओढ्यावरती
येई तिथे मग एके मिती, स्वार शुभ्र घोड्यावरती
तृषार्त शोधक  वाचक एक, सौंदर्याचा नित्य उपासक
कवितेवरी ध्यान आपसुक, पडे दृष्टी अन् होई भावुक.

म्हणे,' कोण गे तू रुपवती, सुलक्षणी ऐश्वर्यवती
कोण कुल अन् कवण पिता तव, वसशील का तू माझे चित्ती ?'

खिन्न हासुनी कविता मग बोले, "वाट पाहुनी बाबा गेले,
रसिकराज उशिराने आले,
पण कुणावरही मी नाही रुसले,
आम्हा कवितांचे हे नशिबच असले....
बहु करवलित तुम्ही प्रतीक्षा,  सफल आज मम सत्त्वपरीक्षा!"

रसिकहृदयी मग ती डोले,
हर्ष मानसी परि नयन ओले ......

नभाकडे पाहुन ती बोले,
"बघा, ते आले !"
आभाळ वेडे --अपुल्याशीच मग
कृतार्थपणे, गदगदून हसले !