कळले नाही मला कधीही

आयुष्याचा अर्थ शोधताना;

निरर्थक झालं ते कधी कळलंच नाही मला;

दैवाचा अर्थ लावताना;

कधी फुटलं माझं नशीब कळलंच नाही मला.

आकाशाला गवसणी घालण्याआधी;

पंखांच बळ ओळखायचं असत;

मी मात्र कपाळमोक्ष झाल्यावर;

झेपावण्याची उंची मोजायचा केला प्रयत्न.

आतापर्यंत काय कमावलं याचा;

सहजच एक दिवस विचार केला;

पेला पूर्णं भरला म्हणता म्हणता ;

अर्धा रिकामाच राहून गेला.

संपली सारी उमेदच आता;

उरले फक्त आठवणींचे  थवे;

डोळ्यातले अश्रू लपवायला;

मी पापण्यांचेच वलय पांघरले .