विराम चिन्हे....... कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,

जो जो दृष्टीत ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!

बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,

तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वछंद चोहिकडे!

आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?

सांगा ईश्वर कोण? त्या पलिकडे ते काय? केव्हा? कसे?

जे ते पाहुनी यापरी भकतसे, दृकसंशये, टाकित,

सारा जीवनलेख मी करतसे तै 'प्रश्नचिन्हां'कित'.

अर्धांगी पुढती करी वश मना शृंगार देवी नटे,

अर्धे जीवन सार्थ होईल इथे साक्षी मनाची पटे;

प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये!

केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये!

झाली व्यापक दृष्टी; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,

दिक्कालादी अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी!

सूक्ष्मस्थूलही सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,

त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गारवाची' मन!

आशा, प्रेम नवीन वैभव, तशी कीर्तीप्रभा, सदृश-

ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश/

सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,

देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला!