वा गं वा! तुझा का माझा......?

सकाळी सकाळीच नम्रताचा फोन आला..... तिने जी पंजाबमेल सोडली ती शेवटी तिच्या स्वरयंत्राने तिच्या संतापाची-त्राग्याची साथ सोडल्यावर नुसताच फुसफुसाट होऊ लागला तशी जरा कुठे ती थांबली. " अग, हो हो... जरा हळू गं. किती संतापशील? आणि हा असा त्रागा करून तुझ्या जीवाला होणाऱ्या त्रासात फक्त भर पडतेय. तेव्हा दम खा आणि शांतपणे सांग मला. " हे माझे वाक्य ऐकले अन पुन्हा ही उसळली, " म्हणे शांतपणे.... तुझे काय जातेय गं हे सांगायला. ज्याचे जळते ना त्यालाच कळते. तू चुपचाप ऐकायचे काम कर. उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस." आता इतका सज्जड दम मिळाल्यावर मी अळीमिळी गुपचिळी चा अवतार धारण करून तिचा धोधो कोसळणारा धबधबा अंगावर झेलत ऐकत राहिले. " अगं ऐकते आहेस ना? मग बोल की काहीतरी. माझेच चुकतेय का ते तरी सांग मला. रोजची मेली कटकट. तेच तेच ऐकून कान किटलेत माझे. जणू माझ्या उपकारालाच जन्माला घातला ना यांनी दिनेशला. " एकीकडे मला हसू आवरत नव्हते पण हसून चालणार नव्हते. नाहीतर नम्रताने घरी येऊन मला धोपटून काढले असते.  कसेबसे तिला थोडा धीर देऊन, समजावून मी फोन ठेवला. आणि प्रथम मस्त हसून घेतले.

डोक्यात नम्रताचा विचार असतानाच पुन्हा फोन वाजला. अरे बापरे! पुन्हा नम्रताच की काय? आज ही बया अगदी पेटलीये बहुतेक. " अग काय हे नम्रता, जरा शांत हो म्हटले तर..... " " हं, मला वाटलेच होते. ही बयाबयी तुझ्याच कानाशी लागली असणार. स्वयंपाकघरातून पाहत होतेच, शिवाय तुटक तुटक कानावरही पडत होतीच हिची मुक्ताफळे.... जीवाला काही वाटतही नाही. खुशाल माझी गाऱ्हाणी करते सगळ्या दुनियाभर. " मी नम्रता समजून बोलायला सुरवात केली आणि नेमके आगीत तेल ओतले गेले होते. नम्रताच्या सासूबाईंचा फोन होता. बाकी त्यांचा तर्क एकदम बरोबरच होता. माझ्या मनात लागलीच आले, खरे पाहू गेल्या या सासू-सुनेची मने किती जुळलेली आहेत पाहा. कसे बरोबर कळते एकमेकीच्या मनातले. आता नम्रता माझ्याच कानाशी लागणार हे जर यांना ओळखता येते तर तिच्या मनातलेही येत असेलच ना. मग हा सगळा घोळ म्हणा किंवा काय जो रुसवा-फुगवा-कुरबूर बोलून सुटण्यासारखी आहे हे कळत नसेल का? पण कळून घ्यायचेच नाहीये ना ....

मला सावरून घेणे भागच होते. नम्रता माझी अगदी जवळची मैत्रीण आणि तिच्या सासूबाई या माझ्या आईच्या ओळखीतल्या. इकडे आड तर तिकडे विहीर. जरा काही झाले की या दोघीजणी माझा बकरा करून टाकतात आणि मग निवळले की जोडीने जाऊन--आता गळ्यातगळा घालून म्हणणे शक्य नाहीये  पण प्रकार त्यातलाच, टेंपटेशन मधले सीताफळाचे-शहाळ्याचे आइसक्रीम चापतात तेव्हा मात्र एकीलाही माझी आठवण येत नाही.

" मावशी अहो उगाच कशाला नम्रताला नावे ठेवताय. ती काही तुमची गाऱ्हाणी करत नव्हती, फक्त तिला कशामुळे त्रास होतोय ते सांगत होती हो. बरं ते राहू दे, कशा आहात तुम्ही?" मी आपला सावरायचा प्रयत्न करीत होते पण तो हाणून पाडत, " कळतंय हो मला... तू मैत्रिणीचीच बाजू घेणार. मी कोण... ’ सासू ’ नां? म्हणजे मी वाईटच. सासू म्हणजे दुष्ट-खाष्ट-कुचकट-कांगावखोर आणिक काय काय विशेषणे आहेतच या नात्याला..... पण सुनाही काही कमी आहेत का? आणि आजकाल खरं म्हणजे सास्वाच बिचाऱ्या झाल्यात. अगदी धाकात ठेवतात हो आजकालच्या सुना. पण मी हे तुला काय सांगतेय, तू ही सूनच. ह्म्म्म्म...... " एक मोठठा सुस्कारा सोडून मावशी जरा क्षणभर थांबल्या तशी मी पटकन संधी साधली, " मावशी अहो कुठून कुठे जाताय एकदम? आणि कोणी काही विशेषणे लावलेली नाहीत. उगाच तर्क करून डोक्याला ताप करून घेऊ नका. आता मी जरा घाईत आहे, पळते. एकदोन दिवसात फेरी मारते तुमच्याकडे मग बोलू आपण. चालेल ना?" त्यांनी हो नाही म्हणायच्या आत मी फोन ठेवूनच दिला. घाबरूनच ठेवला कारण आता या दोघींच्या त्रांगड्यात मावशी माझ्यावर- यच्चयावत 'सून' वर्गावरच घसरल्या होत्या ना.

' सासू - सून ' या प्रकरणातले खरे ' कल्प्रेट- नवरा( यच्चयावत नवरेजमातीची आधीच माफी मागतेय)  तो मात्र यातून हमखास सहीसलामत असतो. अगदी लोण्यासारखा अल्लाद तरंगत असतो. आता बरेचसे नवरे म्हणतीलच, " ऐका. एकतर दोघी मिळून घुसळत असतात ते कोणाला दिसत नाही. वैताग नुसता. प्रेम प्रेम म्हणायचे आणि नुसती खेचाखेची करायची. त्या आमदारांना पार्टी बदलायचे पैसे तरी मिळतात इकडे पैसे मरो साधे सरळ संभाषण तरी करा पण नाही..... येताजाता शालजोडीतले चालूच असतात. हे कसले प्रेम? नुसता अधिकार गाजवायला हवा. अरे मी काय म्हणतो, एकदा समोरासमोर बसा आणि काय ती हाणामारी करून मोकळे व्हा. पण नाही.... नुसते धुमसत ठेवायचे. आणि मिळेल तेव्हां तेल ओतत राहायचे. आणि भडका उडालाच तर पुन्हा दोघींना आशा काळे व्हायला वेळ लागतच नाही. "

जरा लाडात आलो की ही लागलीच अंगावर येते, " आता कशाला? जा की मातोश्रींकडे." आता मातोश्री काय प्रत्येक गोष्ट देऊ शकतील का? पण तेवढी अक्कल असेल तर ना. खरे तर खूश व्हायला हवे पण रेमे डोके. आणि आईला खुश करावे म्हणून कधी म्हटले, " आई, अगं तुझ्या हातच्या बटाट्याच्या भाजीसारखी भाजी कोणाचीच होत नाही. कर ना आज." बस हे कानावर पडायचा अवकाश...... कुठून बोललो असे होऊन जाते. मातोश्री अगदी संधीची वाट पाहत असल्यासारख्या उसळतात, " असं का? एरवी आई नाही दिसत ती. सारखा अगं अगं करत तिच्या मागेमागे गोंडा घोळत फिरत असतोस. जा आता तिलाच सांग करायला. मग अर्धीकच्ची भाजी काय मस्त झाली आहे गं असे म्हणत गीळ हो. "

आईपण अतीच करते हं. नाही म्हणजे आता अनुभवाने व सारखे तेच करून करून आईच्या भाजीची सर हिच्या भाजीला येत नाही हे खरेयं पण इतकी काही वाईटही करत नाही ...... आई विसरतेय पण जर गिळावी लागेल अशी होत असती तर आईने खाल्लीच नसती ना कधी. चांगली नीट जेवते की दररोज. पण हे बोलायची सोय नाही. म्हणेल, " मेल्या, माझ्या जेवणाकडे तुझे लक्ष. बाई बाई काय म्हणू आता. माझाच पोर माझे खाणे काढतो म्हटल्यावर ती तर परक्याची पोर......... " त्यापेक्षा घरी कमीतकमी थांबावे म्हणजे बरे. " अग, कुठे गेलाय गं? खूप वेळ झाला. अजून कसा नाही आला? " म्हणत दोघी काळजी करत बसतील हे उत्तम.

" अहो तुम्ही कशाला मध्ये मध्ये नाक खुपसताय? मी आणि माझा नवरा बोलतोय ना. आमचे आम्ही पाहून घेऊ. तुमच्याकडे सल्ला मागितला तरच द्या. "इति सून. " हो का? तू आणि तुझा नवरा का? हा नवरा कुठून आला गं? नाही म्हणजे माहेरून येताना घेऊन आलीस का तू बरोबर त्याला? कसा आणशील म्हणा? अगं मी जन्माला घातलाय, हाडाची काडं करून वाढवलाय म्हणून तुला तो मिळालाय बरं का. " किंवा ते अनेक सिनेमांमध्ये-सिरियल्समध्ये तांडव चालते ना, " एकतर मी तरी या घरात राहीन नाहीतर ह्या तरी/ ही तरी ". नाहीतर, " असं का, तुम्ही माझ्यासाठी जन्माला घातला का? ( इथे सुनेचे फिसकन हसणे व नवऱ्याकडे पाहून छान छान म्हणून वेडावणे ) तुम्हाला नकोच होता जणू? मग आता कशाला हवा झालाय? कमाल आहे, नाही म्हणजे तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा काही ताळमेळ जुळत नाहीये. " अशी वाक्ये कानावर पडली की समजून जावे, युध्द पेटलेय आणि नॉर्मल घर आहे.  लागलीच मला या दोघींच्या मध्ये उभा राहिलेला नवरा व त्याचे थपडा खाऊन रंगलेले गाल दिसू लागतात. काळानुरूप हा प्रश्न मांडण्याचे व त्यावर आपापल्या परीने मात करण्याचे हातखंडे बदलले असले तरी मूळ प्रश्न अजूनही तितकाच गहन आहे. खरं तर उत्तर एकच आहे फक्त दृष्टिकोन दोन.

मुळात जर सासूबाईंना मुलगा झालाच नसता तर सुनेला नवरा कसा बरे मिळाला असता? शिवाय ज्येष्ठतेनुसारही सासूबाईंचा हक्क प्रथम येतो. आणि ' आई ' चा मुलाचे जीवन घडवण्यात, वाढवण्यात, चांगला माणूस बनवण्यात, शिक्षणात फार मोठा हात असतो. आई सांगेल तीच पूर्वदिशा हे समीकरण लग्न होईतो बहुतांशी मुलांचे असते. आईने स्वतःची अतिशय मोलाची वर्षे मुलांसाठी दिलेली असतात. म्हणजे काही उपकार केलेले नसतात. सुनांचे आवडते वाक्य आहे हे," अग बाई म्हणजे उपकारच केलेत म्हणायचे त्याच्यावर आणि आता ते मी फेडू असेच ना?" त्याच्या बदल्यात नव्हे पण आता आईलाही वाटत असते की मुलाने आपल्याकडे आवर्जून लक्ष द्यावे. म्हणजेच थोडक्यात - मुलगा माझा आहे हे आईचे म्हणणे रास्तच आहे.

आता सुनेला हे कसे पटणार. मुळात जर तो माझा असू नये असेच तुम्हाला वाटत होते तर तुम्ही त्याचे लग्नच कशाला करून दिलेत? सासरे तुमचे- मुलगा तुमचा अन संसारही तुमचाच. तो मात्र तुमच्या सासूबाईंचा नाही. तेच माझ्यावर आले की मात्र लागलीच बदलते का? आणि काय हो, माझी सगळी माणसे- आई-वडील, माझे घर सोडून मी या तुमच्या घरात आले ती कोणासाठी व कोणाच्या भरवश्यावर? नवऱ्याच्या ना? आणि तोच जर माझा नाही तर मग मी इथे काय करतेय? म्हणजे हा सगळा त्याग, तडजोड फुकटच म्हणायची की. ज्याच्या बरोबर व ज्याच्या साठी उभं आयुष्य काढायचं तोच मुळी माझा नाही.

आता खरं तर ही दोन्ही नाती परस्पर पूरक आहेत. एकच माणूस आणि भूमिका दोन. गंमत म्हणजे सासू-जावई/ सासरा-जावई/ सासरे-सून या नात्यात ही अशी रस्सीखेच कधीच दिसून येत नाही. अगदी क्वचित सासू-जावई यांच्या मध्ये ’ लेक-बायको ’ तारेवरची कसरत करताना दिसते. पण ती फार कुरकूर करत नाही कारण दोन्हींबाजूंनी तिला महत्त्व मिळत असते.  बरेचदा ही माझी वस्तू- माझ्या मालकीची वस्तू आहे हेच मोजमाप मुलाला-नवऱ्याला लावून त्याच्यावर माझाच अधिकार आहे ही धारणा असते. परंतु अशी वाटणी करायला तो काही स्थावर जंगम मालमत्ता आहे का? की कापला व हा माझा तुकडा आणि हा तुझा तुकडा असे म्हणता येईल. त्यापेक्षा तो तुझा की माझा ही रस्सीखेच न करता आपल्या दोघींचाही कसा राहील हे संगनमताने पाहणे जास्त चांगले होईल. मला यात आणखी एक मजेशीर भाग दिसतो तो म्हणजे सासूला काय किंवा सुनेला काय ’ मुलाच्या-नवऱ्याच्या ’ मनात आपल्याविषयी काय आहे ते कधी जाणून घ्यायची गरजच वाटत नाही. ते घेतले तर खरं तर हा वादच निर्माण होणार नाही. थोडक्यात त्या दोघींचा स्वतःवरही विश्वास नाही आणि त्याच्यावरही नाही. सासरेबुवांची मात्र याच्यात चंगळ. ते मस्त निवांत. काहीही झाले तरी त्यांच्यावर यातले काहीही बेतणार नसते. उलट दोन्ही पक्ष मधूनमधून त्यांची साक्ष मात्र काढत असतात.

मला नेहमी वाटते हा प्रश्न खरे म्हणजे ज्या माणसामुळे निर्माण झालाय त्यानेच मुळात तो निर्माणच होणार नाही या प्रयत्नात असावे आणि दुर्देवाने ( बहुतांशी थोड्याफार प्रमाणात तो होतोच ) झालाच तर आई व बायको यांच्यात स्वतःला भरडून न घेता त्या दोघींनाच एकमेकींच्या जवळ कसे आणता येईल हे पाहायला हवे. ज्या आईला सतत मुलगा तिच्याजवळ असण्याची- प्रत्येक गोष्ट प्रथम आईला सांगण्याची सवय असते तिला अचानक तो नवरा झालाय म्हणून त्याने एकदम बदलून जावे हे झेपण्यासारखे नसते. आईला हे कळत असतेच की बायको आलीये म्हणजे आता तो तिच्याशी जास्त बोलेल- तिला वेळ देईल. इतके दिवस त्याच्यालेखी सगळे काही मीच होते पण आता तितक्याच जवळचे माणूस मीच त्याच्या सुखासाठी घरात आणलेय तेव्हां तिलाही तितकेच भावनिक महत्त्व त्याच्या मनात असणारच. पण ही कळणारी गोष्ट अंगवळणी पडायला थोडा वेळ द्यायला हवाच ना. सुनेनेही जरा गोड बोलून, सासूबाईंचे मन राखून ( त्यासाठी काही हाँजी हाँजी करायला नको की उगाच ढोंगीपणाची नाटकेही नकोत ) चतुराईने वागले तर हा तिढा बसणारच नाही. दोघींनी त्यांच्या आनंदाचे कारण असलेला माणूस घरात आनंदी कसा राहील हे पाहिले तर तो आईला व बायकोला एकाच वेळी तृप्त ठेवू शकेल. नाहीतर या रोजच्या कटकटीला वैतागून काहीतरी दुसरेच खरे दुःख घरात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही!