'ट्राय' ला जेव्हा जाग येते ....

अन्न,वस्त्र आणी निवारा या बरोबरच मोबाईल ही आजच्या काळाची  मूलभूत गरज बनत चालली आहे हे कोणीही अमान्य करणार नाही.आज भाजीवाल्यापासून भिकाऱ्यापर्यंत ,शाळेतील लहान मुलांपासून खेड्यातील वृद्ध आजींकडेही हा सरास दिसतो.धड खायला नाही, राहायला घर नाही पण मोबाईल मिरवणारे  महाभागही आहेत.अस असताना गेल्या एक दोन महिन्यात ट्राय (टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया)  ग्राहकांच्या हितसंबंधांकडे लक्ष देण्याची चांगलीच ट्राय करत आहे.जवळ जवळ सर्वच क्षेत्रात महागाईचा भस्मासुर सर्व सामान्यांना वाकुल्या दाखवत असताना ट्राय ने  मोबाईल सेवा स्वस्त केल्या आहेत.पाच सहा महिन्या आधी पर्यंत अनियंत्रित असलेल्या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना त्यांनी बऱ्यापैकी   नियंत्रणाखाली आणले आहे.टाटा डोकोमो ने पर सेकंड बिलिंग योजना आणल्यावर  ट्राय ने इतर मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही पर सेकंड बिल आकारण्यास  सांगितले.याला कंपन्यांचा विरोध झालाच पण ट्राय आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

मोबाईल कंपन्यांचे शेअर्स कोसळले पण सर्वसामान्य जनतेला महागाईने जगणं मुष्किल केलेलं असताना   एकतरी सेवा स्वस्त झाली. (खास करून एस . टी . डी . सेवा )त्यानंतर त्यांनी एसएमएस चे दर ही कमी करण्यास सांगितले.परवाच प्रेस रिलीज़ मध्ये त्यांनी जानेवारी २०१० मध्ये फक्त १९ रुपये भरून  मोबाईल कंपनी बदला पण मोबाईल नंबर तोच राखा असे जाहीर केले. मोबाईल कंपनीची सेवा वाईट असून सुद्धा सगळ्या नातेवाईकांना,मित्रांना,व्यावहारिक संपर्कासाठी तो क्रमांक दिलेला असल्याने तो बदलणे जीवावर येत होते, त्यांच्यासाठी खूपच चांगली सोय आहे ही.एकदा मोबाईल नंबर कार्यरत झाल्यानंतर ९० दिवसानंतरच अशा प्रकारे मोबाईल कंपनी बदलता येईल.बरं झालं स्विचिंग साठी फक्त १९ रुपये दर ठरवला ते कारण तो ठरवला नसता तर ह्या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी तो जास्त ठेवून ग्राहकांकडून यासाठीही चांगलाच पैसा उकळला असता आणी ग्राहकाला  क्रमांक बदलताना थोड़ा विचार करायला लागला असता.

शिवाय मोबाईल कंपनी बदलायची सोय  असल्यामुळे पुढे ह्या कंपन्याही आपले ग्राहक राखण्यासाठी चांगल्यात  चांगली   सुविधा देण्याचे प्रयत्न करतील.आणी जेवढी ह्या कंपन्यांची स्पर्धा जास्त होईल तितकाच फायदा ग्राहकांना होईल यात वाद नाही. ट्राय ची ही पाउले महागाईने पिडलेल्या जनतेला थोड़ा का होईना दिलासा देत आहेत.इतर रेग्युलेटरी बोर्डांनी सुद्धा या पासून बोध घेत सामान्य जनतेचे हित संबंध जपण्यासाठी पाउले   उचलावीत हीच अपेक्षा आपण ठेवू....


वाचकांना एक सूचना :

३० नोव्हेंबरला ज्या मोबाईल हॅंडसेटचा "आयएमईआय' (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटी) क्रमांक योग्य नसेल त्यांची सेवा संबंधित कंपन्यांकडून आपोआप बंद करण्यात येईल. त्यासाठी आपला "आयएमईआय' क्रमांक वैध आहे का हे तपासून पाहायचे आहे. आपला तो क्रमांक ५३२३२ किंवा ५७८८६ वर  "एसएमएस' करायचा आहे.(*#०६# दाबून तुम्हाला तुमचा आयएमईआय क्रमांक पाहता येईल) जर आपला तो क्रमांक अवैध असेल, तर तो वैध करून घेण्यासाठी 'जीआयआय' सेंटरवर जाऊन १९९ रुपये भरून तो वैध करून मिळणार आहे.याबद्दल अधिक माहिती  इथे भेट दया.