वैदेही

तुझ्या जन्माच्या आनंदालासुद्धा;

नांगराच्या फाळाच गालबोट लागलं;

रामाची वैदेही म्हणून जगताना;

शिवधनुष्य तुलाच पेलावं लागलं.

तुझ्या स्वयंवरातल्या शिवधनुष्याची;

ओढली प्रत्यंचा जेव्हा त्या राजकुमाराने;

तेव्हा 'हाच तो' म्हणून कौल दिला;

फुलाहून हलक्या झालेल्या तुझ्या मनाने.

महाराणी म्हणून अभिषिक्त होताना;

वनवासाचं नशिबं तुझ्या भाळी;

तुझं सुख; शील; आयुष्य;

होतं फक्त जगाच्या नियमांसाठी.

तुझा राम काहीच नाही बोलला;

प्रेम अन् व्यवहाराचा तराजू नाही तोलला;

खरंतर हे सगळे जुळवलेले योग;

अन् तुझ्या नशिबाचे भोग होते.

राम राम म्हणत अशोकवनात झुरताना;

नजर जमिनीवर रावणाशी बोलताना;

कसं द्रवलं नाही तुझ्या रामाच काळीज;

समाजासाठी तुझ्या शुद्धतेची खात्री मागताना.

कुठल्यातरी एक कवडीच्या परिटाने;

तुझी क्षणात परित्यक्त्या केली;

रामाची सीता म्हणून जगण्याच्या;

तुझ्या स्वप्नांची होळी केली.

जेव्हा केलं हद्दपार आयुष्यातून;

तुझ्याच रामाने तेव्हा;

सोडवायला आलेल्या लक्ष्मणानेही;

'वहिनी मला माफ कर' म्हणून पाठच फिरवली.

रानोमाळ भटकताना, पोटातला अंकुर;

तुला तुझ्या रामाची द्यायचा आठवण;

अश्रूही आटावेत अशा यातना भोगताना;

तुझ्यावर कोणीच केलं नव्हत प्रेम.

अयोध्येचा राजा तुझा राम;

पुरुषोत्तम होण्यासाठी 'नवरा' नाकारतं राहिला;

हातात पकडून लगाम अश्वमेधाचे;

'सगळ्यांना माफ करून सीते परत चल' म्हणाला.

मग विषण्णपणे तुझं भूतकाळ आठवणं;

डोळे भरून तुझ्या जुळ्यांना पाहणं;

आता उरलंच काय आपल्या आयुष्यात;

म्हणून स्वतःच्याच जगण्याला माफ करणं.

पण रामावरच्या विश्वासाच काय?

तो तर कुठेतरी अधांतरीच होता;

लवकुशांच्या समोर तुझी विटंबना नको;

म्हणून कदाचित तुझा नाईलाज होता.

अगं आजही तुझी कथा ऐकतो;

चार सुस्कारे सोडून फुले उधळतो;

पण तुझा त्याग शून्यच ठरतो;

कारण रामाच्या पायावर आम्ही डोके ठेवतो.