प्रेमसंदेश

दु:ख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं, परंतु आपल्या  दु:खावर फुंकर घालून इतरांना सुख देणारी माणसंही या जगात काही कमी नाहीत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव या गावात अशा सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचा असामान्यपणा दिसून आला. दरडीखाली आपल्या लहान लहान मुलांचा करुण अंत झाल्यावर त्यांच्या दु:खातून होरपळून निघालेल्या पालकांनी आपली मुलं शिकत असलेल्या शाळेला मदतीचा हात पुढे करून "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " ही साने गुरुजींची शिकवण प्रत्यक्षात आणली.

मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हे सावित्री नदी किनारी वसलेलं एक खेडेगाव. मुळातच हे इतिहासकालीन बंदर म्हणून ओळखले जाते. वाळू उपसा, मासेमारी, जलवाहतूक हे येथील पारंपरिक व्यवसाय. काळानुसार अन्य व्यवसायही गावात केले जातात. हे इतिहासकालीन गाव अचानक प्रकाशझोतात आले ते २००५ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे. २५ जुलै २००५ या दिवशी या गावावर निसर्गाचा कोप झाला. या दिवशी पावसाने सर्व राज्यात हा:हाकार माजवला होता. सावित्री नदीला भयानक पूर आला होता. जवळचे महाड शहर आणि आजूबाजूची गावे पाण्याखाली होती. दासगावच्या किनाऱ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरू लागले. रात्रीची वेळ. वीज गायब झालेली. अशा स्थितीत किनाऱ्यालगतची माणसं डोंगरावरील घराच्या आसऱ्याला जाऊ लागली. आणि याच दरम्यान घरांच्या मागे असलेली डोंगर कोसळू लागला. काही क्षणातच दरड कोसळली. या दरडीखाली बघता बघता घरच्या घरे गाडली गेली. डोळ्या देखत निष्पाप जीव दरडीखाली गाडले गेले. या आपत्तीत दासगावने ४७ माणसे कायमची गमावली. या मध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळेतील १२ विद्यार्थी मृत झाली. दासगावच्या याच डोंगरात प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिकणारे गौरव प्रकाश खैरे, प्रतिज्ञा प्रकाश खैरे, अक्षता प्रकाश खैरे, रविराज प्रकाश निवाते, सिद्धांत संतोष तोंडकर, श्वेता सुरेश जैन, संदेश दीनेश उकिर्डे या पहिली ते चौथीत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांचाही दरडीखाली मृत्यू झाला. प्रकाश खैरे यांची तीनही मुले दगावली होती. कोसळलेला डोंगर पहाडा एवढे दु:ख पदरात टाकून गेली होता.

शासनाने विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विमा योजना सुरू केली आहे. या योजनेतून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३० हजार रु. ची रक्कम विमा कंपनी कडून अदा करण्यात आली. भविष्यातला आधारच निघून गेल्याने मिळालेल्या पैशाचा आधारही पालकांना नकोसा वाटू लागला. परंतु या पालकांनी आपल्या दु:खातूनच इतरांच्या सुखाचा मार्ग शोधला. मिळालेल्या पैशातील काही रक्कम पालकांनी दासगावच्या प्राथमिक शाळेला देणगी दिली. आपल्या मृत पाल्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी शाळेला बेंचेस भेट दिल्या. आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेणारे अनेक असतात पण असा आदर्श ठेवणारे विरळच! आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात. परंतु  ‘त्या ’ मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.