साऱ्या दुनियेचं हायब्रिडिंग झालंय. नवनव्या संकरित बियाण्यांपासून
उपजलेली निसत्व पिके खाऊन शरीर पोकळ बनलेय. धान्यांच्या बिजापासून ते
स्त्री-पुरुष बिजापर्यँत सर्वच ठिकाणी संकरित जग विस्तारलंय.
पूर्वीची माणसं ऐटीत जगायची, हसता हसता गचकायची, कळायचंसुद्धा नाही. आता
मरणाचंही हायब्रिडिंग होत असतं! आजकाल सहज, सुखनैव मृत्यु येतच नाही. किमान
दोन दिवस तरी कृत्रिम श्वासावर मेलेल्या म्हाताऱ्यांना ताटकळत ठेवतात.
(पुरेसं बिल वसूल झाले की मगच डेथ डिक्लिअर करतात!)
जगणेसुद्धा संकरितच म्हणायचे. कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा
म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात. (अखेर
सिझेरियनच होते हा भाग सोडून द्या.) बाळाच्या जन्मापासूनच रोगप्रतिबंधक
लशींचा मारा जो सुरू होतो, तो थेट म्हातारपणापर्यँत गोळ्या इंजक्शने
चालूच...
पूर्वीच्या धडधाकट बायका आदल्या दिवशी कणाकणा काम करून दुसऱ्या दिवशी
दणादणा कळा देत मोकळ्या व्हायच्या. अंधाऱ्या रात्री, ऊसाच्या फडात,
बैलगाडीतच बाळंत झालेल्या अनेक म्हाताऱ्या कोताऱ्या आजही त्यांच्या
सोशिकतेचा गौरव सांगतांना हरखून गेलेल्या आढळतील. ही झाली महिलांची गोष्ट.
हायब्रिड पुरुषांबाबत तर बोलायलाच नको. त्यांचे शरीर म्हणजे चव ना चोथा
झाले आहे. केवळ हँडसम दिसणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. पूर्वीचे तरूण बलोपासक
असत. चारशे पाचशे जोरबैठका मारत, दोन चार लिटर दूध पित. आत्ताची पोरं पाच
पंचविस जोरातच बेजार होतात, अंथरूण धरतात, पावशेर दूधही ह्यांना पचत नाही.
पचणार तरी कसे म्हणा? कारण तेही संकरित जनावरांचेच असते किंवा
म्हशीला/गाईला ऑक्सिटोसीन इंजेक्शन टोचून ओरबाडलेले असते. तापवलेलं दूधच
जिथे आपल्याला पचवता येत नाही तिथे निरसं दूध काय सोसणार?
हायब्रिडच्या धान्यातून फक्त भरघोस उत्पन्न मिळतं, सकसता नाही. संकरित
बियाण्यांमध्ये अधिक उत्पादनासाठी जनुकिय बदल केलेले असतात. त्यामुळे
त्यातून फार काही उत्कृष्ट मूल्ये प्राप्त होतील ही अपेक्षा न ठेवलेलीच
बरी. मूळ बियाणे आता अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे मूळासारखी दणकट शक्ति
असलेली मूळ माणसंही दुरापास्त झालीत. नेहमी नेहमी हे हायब्रिड धान्य खाऊन
बहुतेकांचा शक्तिपात होतोय. हायब्रिड धान्य बियाणे म्हणून वापरता येत नाही.
कारण ती शक्तीच त्यामध्ये नसते. असे वांझोटे अन्न खावून मानवातील
नपुंसकत्व वाढलं आहे, हे पेपरातील पानभरून येणाऱ्या यौनशक्तिवर्धक
औषधांच्या जाहिरातींमुळे लक्षात येईलच.
आणखीही खूप काही सांगता येईल. हायब्रिड जमान्यातील लोक जास्त वर्षे जगत
असली तरी त्या रडत खडत जगण्याला अर्थ उरला नाहीये. दणकून खाल्लं तर पचत
नाही. कणकून काम केलं तर सोसत नाही. गादीवरच जिथे झोप येत नाही, तिथे दगड
उशाला घेऊन आकाश पांघरण्याची कृती म्हणजे कादंबरीय स्वप्नेच ठरतात.
जगण्यातला, वागण्यातला अन् बोलण्यातलाही अस्सलपणा गायब होऊन उरलाय केवळ
हायब्रिडपणा!
इतकेच काय तर लेखन क्षेत्रातसुद्धा संकरित भाषा, वाक्ये, शब्द घुसडले गेले
आहेत. कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी? अन् कुठे
आजकालची चार पाच पानांतच का कू करणारी संकरित रब्बी हंगामाची लेखकू मंडळी!
एकूण काय तर सगळाच हायब्रिड जमाना आलाय बघा...
( 'मिश्किली' मधून.)