काठाशी निष्प्राण पडलेले दगड उचलून उचलून तो तळ्यात फेकत होता
एका मागून एक.... यंत्रवत,
हात - दगड - पाणी - डुबुक..... तडफड,
पाण्याचे ते तडफडणे निरखत होता...... पुन्हा पुन्हा.....
आजकाल बरेचदा तो इथे येतो, वेळी.... अवेळी,
तडफडणार्या पाण्यात प्रत्येकवेळी त्याला तोच दिसतो,
एकाकी.... घुसमटलेला
ऊन रणरणते तापलेय रे, जरासा सावलीत थांब की
रस्त्यावर अजूनही जीव बचावून उभे ते झाड, त्याला रोज अडवते
सावली देण्याचा त्याचा तो अट्टाहास, त्याचा जीव गुदमरून टाकते
मुसळधार पावसात भिजणारे ते गरीबाचे पोर
कोरड्या डोळ्यांनी लोकांच्या छत्र्या निरखत होते
त्याला इतके निर्विकार पाहून त्याचे डोळे का भरत होते....
आशेचा किरण ही नसलेल्या मार्गावर तो पुढे पुढे निघालाय खरा
शाश्वत सोडून पळत्याच्या मागे....
कशाची ही अगम्य ओढ? का नुसतीच फरफट?
उत्तर नाही....
तरीही, त्याचं नशीब त्याच्यामागे धापा टाकत येतच राहिले,
त्या बिचार्याला पर्यायच नाही.....
ही कुठली ’ भूक? ’
’ अन्न ’ हा केवळ एक शब्द आहे की, अन्न आहे आनंद
का कोण जाणे आजकाल वारंवार हा प्रश्न त्याच्या ’ भुकेला ’ तो विचारत असतो
ती फक्त हसते, तिचे ते हसणे त्याला उगीचच कुत्सित भासते....
जेव्हां उमजले त्याला की, ’ तो ’ आरसा ही आहे
स्वत:पासूनच चेहरा लपवत, स्वत:लाच चुकवत तो कुठेसा पळतो आहे
वेडाच नाहीतर काय....
काळ्या रंगाला अंधारापासून हिरावून घेता येईल का कधी...
कुठले भविष्य, कोण दिशेला...
पलीकडे मायबापाचा श्वास कोंडला
अस्वस्थ टाहो आभाळास भेदूनी गेला
मायेचा हुंदका मुक्यानेच जळून गेला
आता व्यर्थ आहे हिशेब सारा....
सांजवेळी फुटे प्राणांत गलबला
उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह
अन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,
संपूर्ण रिता......