काय भुललासी वरलिया रंगा ?

                                                                 वेष असावा बावळा
     दिसत तस नसत. (दिसत तसे नसेलहि  .. म्हणीत माझी सुधारणा)   काय भूलासी वरलिया रंगा ?      
     वरील म्हणींचा मला आलेला प्रत्त्यय.
    माध्यमिक शाळा संपल्यावर आम्ही कोठूरकर अर्ध्या चड्ड्या तून पट्ट्याच्या  पायजाम्यात शिरत असू. एकादा मांजर पाटाचा पायजमा पण असे. महाविद्यालयाचे पहिले वर्ष संपता संपता आमचे  एन सी सी ( N C C )  शिबीर बडोद्याला भरले होते. दिनकर दादा  तेंव्हा तिथे शिकायला होता. त्याने तिथे जीवन भाई कडून शिवून घेवून मला माझी पहिली pant दिली.
असो S आजमितीसही आम्ही कोठूरला पायजाम्यातच  असतो. आय आय टी मध्ये शिकत असतांनाची ही गोष्ट आहे.
भास्कर पाटील हे आमच्या वडिलांचे दोस्त. (द मा मिरासदारांच्या भाषेत सांगायचं तर भास्कर पाटील म्हणजे जंगशन माणूस.) माझे बाबा व त्यांनी मिळून गावाकरता खूप काही केले. गावात गंगेच्या पाण्याचे नळ, रस्त्याची कामे, ५० साली गावाच्या चतु: सीमेवर संडासची सोय म्हणजे फारच चांगले काम. गावामध्ये रस्त्यावरच्या दिव्यांकारता जनरेटर घेण्याची सुद्धा योजना आखली होती. पण तेव्हड्यात कोयनेची वीज आम्हाला मिळणार असल्याचे समजले.
       गावाबाहेर जावून छान बंगला व आजूबाजूला झाड लावून राहणारे भास्कर पाटील हे दुसरे. त्या आधीचे कानिटकर कोठुर सोडून सांगलीला गेल्याने त्यांचा छानसा  बंगला ओसाडच होता. भास्कर पाटलांकडे मला केसरी आणण्यास नेहमीच जावे लागे. त्यावेळी गावात फक्त त्यांचेकडे केसरी वर्तमानपत्र येत असे व त्यांचे वाचून  झाले कि मग आमचे बाबा ते वाचत.
     असाच एकादा उन्हाळ्याच्या सुटीत त्यांचेकडे गेलो असता, "वसंता उद्या दुपारी इकडे ये, नातीला पाहायला पाव्हणे येणार आहेत." मी, येतो म्हणालो. त्याकाळी  नाही म्हणण्याची किंवा सबबी सांगण्याची परवानगी नव्हती. तसा त्यांचेकडे जाण्याचा कधी कंटाळा येत नसे ते छान गप्पा मारत व मस्त दूध पण मिळे.   
          ठरल्याप्रमाणे मी दुपारी हजर झालो. पाहुण्यांना चहा पोहे  (मला चहाऐवजी दूध) झाल्यावर, मी त्यांना थोडा बाहेर घेवून गेलो. लगेच त्या दोघा भावांनी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. त्यांना अंधारात न ठेवता मी म्हणालो कि, "आपल्याला काही खाजगी बोलायचे असल्यास आपण कृपया फ्रेंच किंवा जर्मन भाषेत बोलावे, अन्न्यथा मी दूर जातो." मुलाचा मोठा भाऊ लगेच म्हणाला, "म्हणजे तुम्हाला इंग्रजी येत कि काय ? "
मी, " मी सध्या मुंबईला आय आय टी मध्ये शिकतो आहे". पाहुणे आश्चर्य चकित झाले आणि थोडे शरमले. "तुम्ही आय आय टी मध्ये शिकत असून इतके साधे राहता?"
             नंतरही माझ्या दाढी व टोपीमुळे बऱ्याच वेळा. मला अडाणी मियाभाई  समजून माझ्याशी बोलणारे पुष्कळ भेटले व दिवसे दिवस जास्त भेटतात. १९८५ च्या दरम्यान मी एका संगणकाच्या प्रदर्शनास गेलो होतो. तिथला माणूस मला संगणक म्हणजे काय हे सांगू लागला. मी त्याला थांबवून इथे नवीन काय आहे हे कृपया सांगा अशी विनंती केली. मला संगणक काय आहे हे माहिती असेल, यावर त्याचा विश्वास बसेना. मी त्याला म्हणालो, "अरे राजा! संगणक मला तुझ्या जन्माचे  आधी पासून माहिती आहे. तुझा जन्म १९६८चा आहे? (मी अंदाज केला आणि तो बरोबर निघाला.) मग मी १९६४ साली TIFR (टाटाच्या मुलभूत संशोधन शास्त्र संस्था ) मध्ये संगणकावर काम केले आहे." हे सांगितल्यावर. त्यानी नम्रपणे मला सर्व माहिती सांगितली.
          विजयच्या जन्म नंतरची गोष्ट. मीनाक्षी ( माझी पत्नी) जरा थंडी असल्याने, व्यवस्थित डोक्यावरून पदर घेवून वावरत होती. सुहास बोडस हा माझा मुंबईचा भाचा माझ्याकडे आला होता. तो हळूच विचारतो, "मामा, मामी पदवीधर आहे का रे?"
      एस बी जोशी व कंपनी ही महाराष्ट्रातील पूल बांधणारी प्रसिद्ध कंपनी होती. त्याचे संस्थापक हे फारच साधे राहत असत. तसेच वालचंद कंपनीचे मालक लालचंद शेठ. हे दोघेही बऱ्याच वेळा बंडीत असत. एकादा, एस बी जोशी, प्राध्यापक पदाच्या मुलाखती घेण्यास आय आय टीत  आले होते. मी सहज एका उमेदवाराला येणारा माणूस तुला कोण वाटतो आहे असे विचारले. त्याने प्रांजळ पणे प्यून असावा असे म्हटले. मी त्याला म्हटले, "आत जा अवघड प्रश्न विचारून तुला ते फाडून खातील बघ. एस बी जोशी आहेत ते. " 
    उलट प्रसंगही माझ्या आयुष्यात घडले आहेत. मी जसा साध्या गबाळ्या वेषात  असे तसा वेळप्रसंगी खूप स्मार्ट कपड्यात पण असे. व्ही जे टी आय संश्थेच्या  एम इ च्या प्रवेशाकरता असाच स्मार्ट होवून गेलो होतो. माटुंगा विशेष परिचयाचा नसल्याने व उशीर होवू नये म्हणून मी बराच लवकर पोहोचलो. प्युनने खोली उघडली व तो निघून गेला. मी तिथे एकटाच उरलो. तेव्हड्यात दुसरा एक मुलाखत इच्छुक दबकत दबकत आला. चला आता गप्पा मारायला एक जण मिळाला म्हणून मी सहज विचारलं, " काय मुलाखतीस काय?" त्यान म्हटलं, " होय सर." सर ऐकल्यावर मी त्याची फिरकी घ्यायची ठरवली. (अन्न्यथा माझ्या मनात तसल काही नव्हत हं. ) मग मी १५ - २० मिनिटे त्याची व्यवस्थित मुलाखत घेतली व मग त्याला सांगितलं कि, "मी पण मुलाखतीस आलो आहे." बिचारा खजीलझाला.
             दुसरा प्रसंग औरंगाबादचा लग्नानंतर वर्षभर आम्ही दोघे जवळ जवळ दर रविवारी सिनेमाला जात असू. असेच एके रविवारी ( मी पूर्ण सुटात आणि मीनाक्षी शालूत ) थेटरात पोहोचलो. मी तिकिटाच्या खिडकीकडे मोर्चा वळवला. तेव्हड्यात एक दोन माणस, "नमस्कार सर" म्हणत हात जोडून पुढे आली  व आम्हाला दोघांना त्यांनी थेटरात नेवून, खास आणून ठेवलेल्या कोचावर नेवून बसवले. कुठल्याश्या संस्थेचा तो खास शो होता व शेवट पर्यंत त्यांनी आम्हाला, मी संस्थेचा बडा अधिकारी समजूनच वागवले. म्हणजे मग चहापाणी वगैरे सर्व काही आले. मिही मौनम संमती दर्शनम न्याय वापरला.
वसंत बरवे
३० नोव्हेंबर २०१०