.. शुभ्रकळ्या... जगती सार्‍या..

.. शुभ्रकळ्या... जगती सार्‍या...

श्रीलंकेतली एल.टी.टी.ई. ही स्वतंत्र तामिळ भाषिक राष्ट्रासाठी लढणारी
एक फुटीरतावादी संघटना आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विविध कारवायांमध्ये
सामील होण्यासाठी श्यामा नावाची एक तरुणी ह्या संघटनेच्या आत्मघातकी पथकात
दाखल झालेली असते. राष्ट्राच्या कार्यात मुलीचा अडसर नको म्हणून, ह्या आईने
मुलीचा जन्म होताच तिला टाकून दिलेले असते... ही छोटी मुलगी... दत्तक
म्हणून तमिळनाडु मधल्या आपल्यासारख्याच एका मध्यमवर्गीय घरात येते... या
निरागस छोटीला आपल्या आईवडीलांनी आपल्याला दत्तक घेतले असल्याचे स्वत:च्या
९व्या वाढदिवशी अचानक कळते.. आणि मनाने सैरभैर होऊन आपल्या खर्‍या आईला
शोधायला म्हणून कविमनाची कोमल विचारांची ही छोटी घरातून पळून थेट श्रीलंकेत
जाऊन पोहोचते.. ही मुलगी श्रीलंकेमध्ये पोहोचताक्षणींच इ.स. २००१ चे घनघोर
नागरी युद्धाला तोंड फुटते आणि त्यात अनेक निष्पाप लोकांचे निष्कारण बळी
जातात... हे सारे पाहून ती छोटी अधिकच व्यथित होते.... उद्ध्वस्त होते...

मानवी मनाच्या गुंतागुंतीवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सुंदर
भाष्य करणार्‍या मणिरत्नम् नामक दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या अशाच एका
कन्नत्तिल मुत्तमिट्टाल ह्या गाजलेल्या तमिळ चित्रपटातील ही मध्यवर्ती
कथावस्तू. मुळात कोणत्याही तमिळ माणसाच्या भावना श्रीलंकेतल्या तमिळांमध्ये
खोल गुंतलेल्या असतात. इ.स. २००१ च्या श्रीलंकेतल्या घनघोर नागरी युद्धात
होणार्‍या नरसंहारामुळे संवेदनशील मनाचे मणिरत्नम् आणि हळव्या मनाचे
संगीतकार ए. आर. रहमान हे दोघेही अत्यंत उद्विग्न होतात... त्या मनस्थितीतच
त्यांच्या हातून एका अजरामर अशा हळुवार कलाकृतीची चाल घडते. वेळ्ळै
पूक्कळ् उलगम् एंगुम् मलर्हवे.... तमिळ मधे या गीताची शब्दरचना महान कविराज
वैरमुत्तु यांनी केली आहे. ह्या गाण्याला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके
प्राप्त झाली. २००३ चे उत्कृष्ट संगीतासाठी राष्ट्रीय पारितोषिकदेखील
प्राप्त झाले... होरपळणारी मानवता आणि घृणास्पद भीषण संहारात अकारण ओढले
जाणे हे सारे अनुभवणार्‍या त्या छोटीच्या मनातून सर्व मानव जातीला उद्देशून
व्यक्त झालेली हळुवार भावना स्वरबद्ध करणारे हे गीत... त्यात हळुवार
शब्दरचना आणि विश्वस्पर्शी भाव असल्याने ह्या अत्यंत सुश्राव्य गीताला
रहमानाच्या सांगितीक कारकीर्दीत एक वेगळेच स्थान आहे...

दाक्षिणात्य संगीतकार ए आर. रहमान हे वैश्विक संगीताच्या दुनियेत
अद्वितीय प्रतिभावान संगीतकारांमधले एक म्हणून गणले जातात. त्यांच्या
संगीताचा बोलबाला संपूर्ण जगभरात आहेच, त्यांना मिळालेली जागतिक दर्जाची
पारितोषकेही याची साक्ष देतात. त्यांचे संगीत, त्यांची गाणी ही अनेक संगीत
तज्ज्ञांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहेत. भारतात त्यांची
लोकप्रियता अफाट आहे... हे लक्षात घेऊन, फेब्रुवारी २००९ मधे
आंतरराष्ट्रीय मानाची २ ऑस्कर्स मिळवून आलेल्या रहमान यांची ऑस्कर्स नंतरची
पहिली कॉन्सर्ट् केरळामधे कोळिक्कोडला ठेवली जाते. ह्या कॉन्सर्टला
Guests म्हणून त्यांच्या team पैकी काही लोक मुंबईहून केरळात जातात. तसेच
इतरही ठिकाणाहून तिथे काही संगीतप्रेमी आलेले असतात. तिथे कळते की
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमधे, पुण्यनगरीमधे लवकरच रहमानची
कॉन्सर्ट लावण्यासाठी बोलणी चालू आहेत. हे ऐकून पुण्याच्या एका
संगीतप्रेमीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते.... रहमाननी पुण्यामधे
मराठी गाण्याच्या चार ओळी तरी गाव्यात.... आपण विनंती तर करून बघू...!
रहमानच्या टीमपैकी काही लोकांना approach केले जाते. त्यांच्याकडून, "रहमान
यांना मराठीभाषेचा गंध नाही. त्यांना उच्चार आत्मसात करण्यासाठी तुम्ही
आधीच record केलेले एखादे गाणे आणून द्या, ते त्यांना ऐकवू... पुढचे पुढे
पाहू" असा प्रतिसाद येतो...

पुण्याच्या संगीतप्रेमींची एकच धावाधाव सुरू होते... कोणतेही मराठी गाणे
चालेल... नको, रहमानचेच एखादे गाणे हवे.... पण रहमानची गाणी मराठीत
कुठायेत? रोजा ची गाणी नव्हती का मराठीत डब झाली? नको नको, रोजा मराठीत
नको... त्यापेक्षा त्यांच्या team मधल्याच एखाद्याला विचारूया... असे म्हणत
मुंबईहून आलेल्या team पैकी एका व्यक्तीस विचारण्यात येते... त्या
व्यक्तीकडून "वेळ्ळै पूक्कळ्" हे सुप्रसिद्ध गाणे सुचवले जाते.... ह्या
सुचवणीमागे एक theme ही असते... श्रीलंकेच्या युद्धभूमीच्या
पार्श्वभूमीवरले हे तमिळ गीत, मुंबईच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या
नव्या पार्श्वभूमीवर मराठीत केले जावे... रहमान यांनी ते मराठीत सादर
करावे...

ही व्यक्ती विविध सूचना करत सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन देते...
खरेतर दुसर्‍या एका मित्राच्या आग्रही मागणीखातर त्या गाण्याचे मराठीकरण
आधीच तयार झालेले असते... आता त्याच्या recording पासून ते रहमान ह्यांना
सादर करेपर्यंत सारी जबाबदारी ही व्यक्ती स्वत: उचलते.... तमिळमधे हे गीत
स्वतः रहमाननी गायलेले आहे. आता त्यांना उच्चार शिकता यावेत ह्यासाठी
मराठीमधे ह्या गीताला स्वर देण्यासाठी महाराष्ट्राचे महागायक हृषिकेश रानडे
यांना पाचारण केले जाते... शुभ्रकळ्या... जगती सार्‍या... असा नवा शब्दसाज
घेऊन तयार झालेले हे गीत पुढे रहमानजींना सप्रेम भेट म्हणून पाठवले जाते.
ह्या सार्‍यासाठी एक व्यक्ती स्वत: झटते...

...आपल्या तमिळ भाषेसाठी झटणारी, तमिळ-मराठी भाषाभगिनींची,
तमिळ-मराठी संस्कृतींची एकमेकांशी तोंडओळख व्हावी ह्यासाठी झटणारी ती
व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर
अभ्यासकार्य करणारे.... हैयो हैयैयो होत...
.