हे बंध रेशमाचे

सकाळी चिवचिवत येणाऱ्या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकवायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणू ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदूळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकीकडे चिवचिवाट सुरूच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येऊ लागले आहेत. सकाळी ’आम्ही आलो, तांदूळ आणा’ असा एक बोल, आपल्या सख्यांना ’नाश्ता आला, या’ असा दुसरा आवाज आणि अगदी आकांताने केलेला चिवचिवाट म्हणजे ’हे दुष्ट पारवे आमचे तांदूळ फस्त करत आहेत, त्यांना हाकला’ असा आवाज. हे पारवे महा तापदायक. माझ्या चिमण्या जिथे पाच दहा मिनिटे रमत गमत दाणे टिपतात तिथे हे पारवे मध्येच घुसून सगळे दाणे क्षणात फस्त करतात. पूरग्रस्त वा भूकंपग्रस्तांना आलेली मदत परस्पर लाटणाऱ्या पुढाऱ्यांसारखे. वर छज्जावर घाण करतात तो आणखी त्रास.

तसाही या पारव्यांनी बराच ताप दिला. एकानं बेडरूमबाहेर छज्जावर बरोबर ए सी खाली घरटं केलं. लक्षात आलं ते सकाळी होणाऱ्या फडफडाटानं आणि पिलांच्या बारीक, पुसट आवाजानं. ते इवलेसे जीव असताना घरटं कस उडवणार? मग ती पिलं मोठी होऊन उडेपर्यंत त्यांना बाळगावा लागलं. मग एकदाच ते घरटं काढलं, घाण केलेला छज्जा स्वच्छ केला तेव्हा कुठे निस्तरलं. हा त्रास वाढतच गेला. एकदा तर रात्री स्वयंपाकघराची खिडकी लावताना एक पारवा आत शिरला. त्याला हुसकायचे नाना प्रयत्न झाले पण तो पठ्ठा धुलाई यंत्र आणि शीतकपाट यांच्या खोबणीत अंग चोरून बसून राहिला. शेवटी नाद सोडला. सुदैवाने सकाळी आई लवकर उठली आणि सगळीकडच्या सरकत्या काचा तिने दूर सारल्या तेव्हा तो फडफडत उडून गेला आणि त्याने रात्री स्वयंपाक घरात केलेल्या घाणीवरच भागलं. अखेर एक दिवस सर्व खिडक्या आणि कपडे वाळत घालायच्या भागाला पक्षी रोधक जाळी बसवून टाकली आणि त्या उपद्रवी पक्षांचा बंदोबस्त केला.

त्याच सुमारास घरात नवा कोच आणला. जास्त माणसांना बसायची सोय आणि हल्ली जरा प्रचलित असा इंग्रजी एल आकाराचा कोच हौसेने आणला. मात्र त्याचा तोटा दुसऱ्याच दिवशी लक्षात आला. बाहेरच्या खोलीची भिंत नसलेली छज्जाची मोकळी बाजू आता बऱ्यापैकी अडली होती. पूर्वी तीन आसनी कोच लांब भिंतीलगत व त्याला काटकोनात मोकळ्या बाजूकडे पाठ करून दोन स्वतंत्र अशा कोचाच्याच पद्धतीच्या खुर्च्या होत्या आणि त्यामुळे मोकळ्या भागाची बाजू बरी मोकळी होती. मुख्य म्हणजे दोन खुर्च्यांच्या मधून चिमण्या आत यायच्या, डोकावायच्या, चिव चिव करायच्या आणि क्षणात भुर्रकन उडून बाहेर छज्जावर तांदूळ येण्याची वाट पाहायच्या. या नव्या कोचामुळे मागची मोकळी बाजू कोचाच्या उंचीपर्यंत बंद झाली आणि चिमण्यांना आत येता येईना. त्या बिचाऱ्या दूर कठड्यावर बसून साद देऊ लागल्या. पूर्वी दाणे टाकायला उशीर झाला वा सकाळी कुणाचा फारसा वावर दिसला नाही तर चिमण्या बेशक हक्काने दुडकत दुडकत घसरत घसरत पटकन परत फिरता येईल अशा बेताने थेट आतपर्यंत यायच्या. ते आता शक्य नव्हते.

आणि एक दिवस तो प्रकार घडला. सकाळी दहाचा सुमार होता. आईची पूजा नुकतीच झाली होती. मी आणि माझी आई आम्ही बाहेर कोचावर बसलो होतो. माझी पत्नी अर्चना आतल्या खोलीत होती. कामवाल्या बाई स्वयंपाक घरात काम करीत होत्या. आणि अचानक चिमणीचं एक पिलू धिटाईने आत शिरलं. एकाच झेपेत ते पोर थेट जेवणाच्या टेबलापर्यंत पोचलं. तिथे बसून त्याने चिवचिव केली. टेबलावर काही दिसतंय का ते पाहिलं. मग ते उलट वळलं. मात्र लगेच त्याच्या लक्षात आलं की समोर बरीच माणसे आहेत. तो इवलासा जीव विलक्षण घाबरला. भितीच्या भरात त्याने बाहेर येण्या ऐवजी उलट आतल्या बाजूने झेप घेतली. पुढचं संकट माझ्या डोळ्यापुढे स्पष्ट दिसलं. ते पिलू घरातल्या कुठल्याही खोलीत शिरलं तरी बाहेर पडायला वावच नव्हता कारण सर्व खिडक्यांना पक्ष्यांच्या जाळ्या बसविलेल्या होत्या. आंतमध्ये माणसं पाहून ते जर परत फिरलं तर आपल्याला बुजून पुन्हा बुजू नये म्हणून मी आईला हातानेच आहे तिथेच स्वस्थ बसून राहायची खूण केली आणि मीही स्तब्ध बसून राहिलो. ते भेदरलेले पिलू उजव्या बाजूला गेले. लगोलग परतले आणि ते स्वयंपाकघरात शिरले आणि त्याने खिडकीकडे झेप घेतली. मात्र बिचाऱ्याला समजले की बाहेर जाता येणार नाही. ते स्वयंपाकघरातून बाहेर यायच्या आत मी जेवणाच्या टेबला पलीकडची उजव्या कोपऱ्यातली खिडकी बंद केली. ते पिलू त्या खिडकीतून गेले असते तर मागच्या बाजूला कपडे वाळत घालायच्या छज्जाकडे जाणार आणि तिथेही जाळी असल्याने बाहेर पडायला रस्ता नाहीच.

ते पिलू आता भलतंच घाबरलं होतं. त्याची थरथर जाणवत होती. त्या पिलाने सुरक्षित जागा म्हणून टेबला लगतच्या मांडणीवर मुक्काम ठोकला. तिथून त्याला हालवणे गरजेचे होते. मी आईला आत जायची तर अर्चनाला व बाईंना बाहेर न येण्याच्या खुणा केल्या. पिलू उजव्या कोपऱ्यातल्या खिडकीकडे जाऊ नये यासाठी देवापुढच्या उदबत्त्या त्या कोपऱ्यातल्या खिडकीत नेऊन ठेवल्या. म्हणजे धुरामुळे ते तिथे जाणार नाही. मग त्याला बाहेरच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी टेबलावर तांदूळ टाकले. ते तांदूळ पाहून पिलू मांडणीवरून उतरून टेबलावर येईल आणि तिथे आल्यावर कदाचित त्याला बाहेरचा रस्ता दिसेल. मात्र ते भेदरलेलं पिलू त्या दाण्यांकडे पाहायच्या मनस्थितीत नव्हतं. पोटाच्या भुकेपेक्षा जीवाची भिती अधिक प्रबळ ठरली होती आणि भयग्रस्त झालेल्या पिलाला भुकेची जाणीव उरली नव्हती की त्या तांदुळाच्या दाण्यांचा लोभ उरला नव्हता. ते पिलू अस्वस्थपणे चिवचिव करत मांडणीच्या वर फिरत राहिलं. मात्र त्याची आर्त साद त्याच्या आई बाबांपर्यंत पोचली होती.

आमच्या डाव्या अंगाने म्हणजे मोकळ्या बाजूने भरारी घेत चिमणा. म्हणजे त्याला पिलाचा बाबा त्याच्या सुटकेला आला. रोजच्या सवयीचे घर व माणसे असल्यामुळे म्हणा किंवा आपल्या पिलाला वाचवायच्या निश्चयामुळे असेल. पण त्या चिमण्याने आमची दखल घेतली नाही आणि आमच्या समोरून तो थेट जेवायच्या टेबलावर जाऊन स्थिरावला. समोरच ते तांदुळाचे दाणे होते. चिमण्याने तिथे बसून चिवचिवाट केला. बहुधा तो त्या पिलाला सांगत असावा, की काळजीच कारण नाही, आता मी तुला न्यायला आलोय, घाबरू नकोस. ते पिलूही जरा शांत झाले. पण क्षणभरच. लगोलग त्या पिलाचा आकांत पुन्हा सुरू झाला. इकडे चिमणा त्या पिलाला बोलावत होता. जर त्याला पाहून धीर करून ते पिलू तिथे आले असते तर त्या चिमण्याला पिलासकट उलटे वळून बाहेर पडणे सोपे झाले असते. अखेर त्या चिमण्याने पुढे व्हायचे ठरवले. चिमणा त्या मांडणीवर गेला. पिलाला त्याला पाहून धीर आला असावा. ते पिलू त्याच्या जवळ जवळ फिरू लागले. चिमण्याने पिलाच्या चोचीत दाणा भरवला, पण पिलू खायच्या स्थितीत नसावे. ’मला बाहेर काढा’ हा एकच धोशा त्याने लावला होता. चिमणा मात्र खरंच खूप हुशार. त्याने पिलाकडे पाठ फिरवून समोर टेबलाकडे झेप घेतली. अशा हेतूने की त्याला पाहून पिलूही मागोमाग येईल. पण त्या उंच सुरक्षित जागेवरून खाली यायची त्या पोराची हिंमतच होत नव्हती. चिमणा पुन:पुन्हा गिरक्या घेऊन त्या पिलाला उडायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत होता मात्र पिलू तिथून हालायला तयार नव्हते, आर्त चिवचिव मात्र अखंड सुरू होती.

मला आता एक मार्ग सुचला होता. नाईलाज होता, पण तो कठोर उपाय करणे अपरिहार्य होते, दुसरा मार्गच उरला नव्हता. तो उपाय म्हणजे आणखी मोठी भीती, मोठे संकट निर्माण करणे. त्यामुळे जिवावर उदार होऊन पिलाला प्रयत्न करणे भाग पडले असते. मी सर्वांना आपला जागीच थांबायच्या सूचना दिल्या. आणि एकदम डोक्यात ट्यूब पेटली, अरेच्चा हा प्रसंग चित्रित केला पाहिजे. मी अलगद आत गेलो, हँडिकॅम काढला. सुदैवाने बॅटरी चार्जड होती आणि आत टेपही होती. बाहेर येता येता मी अर्चनाला धुणी वाळ्त घालायची काठी आणायचा इशारा केला. मी पुढे होत स्वयंपाक घरात शिरलो आणि बाईंना आत सरकण्याची खूण केली. कॅमेरा सज्ज करून मी बरोबर समोर सुरू असलेल्या त्या धडपडीचे चित्रण करू लागलो. अर्चनाला मी काठी घेऊन पुढे येण्याची खूण केली. आणि उपाय अचूक लागू पडला. तिला काठी आपल्या दिशेने आणताना पाहून आधी चिमणा उडाला व काठी पाहून ते पिलूही चिमण्यापाठी उडालं. मी त्यांना टिपत बाहेर आलो तो मागोमाग बाईही धावत आल्या आणि त्यांना बाहेर हुसकू लागल्या. मी ओरडून त्यांना थांबवलं. त्यांना बहुधा असं वाटलं असावं की उपद्रवी पाखरांना आम्ही हुसकून लावू पाहतोय. मी त्यांना मागे फिरायला सांगितले. एव्हाना ते दोघे उडाले होते.

मग मात्र मी फार अस्वस्थ झाले. माझा उद्देश कितीही चांगला असला तरी माझ्या लाडक्या चिमण्यांना मला काठीने हुसकावावे लागले हे मला फार लागले. क्षणात मनात विचार आला, की ती पाखरे मनोमन म्हणाली असतील की माणूस जातच अशी. चिमूटभर तांदूळ ते काय आणि त्या साठी आमच्या जिवावर उठायचे काय? कदाचित त्या पाखरांना असे तर वाटले नसेल की ही माणसे रोज आम्हाला बोलावून दाणे तरी का टाकतात? यांच्यावर विसावून निर्धास्तपणे आमचं पिलू आत शिरलं तर हे त्याच्या जिवावर उठले! कदाचित ती दुखावलेली, धास्तावलेली पाखरं कदाचित पुन्हा कधीच येणार नाहीत या विचारानं मी व्यथित झालो. हे सगळे मनाचे खेळ अवघ्या चार पाच सेकंदात थैमान घालून गेले. हातातला कॅमेरा तसाच ती पाखरं गेली त्या दिशेने रोखलेला होता. आणि अवघ्या काही क्षणातच ते बापलेक परत आले. मी विलक्षण सुखावलो. एकजण कठड्यावरून साद देत होता तर एकाने थेट आत खुर्चीच्या पाठीवर जागा घेतली होती. दोघांनीही चिवचिव केली आणि जणू सांगितलं की ’आता आम्हाला रस्ता समजलाय बरं. आता नाही अडकणार. बरं आहे, येतो आम्ही". पुढच्याच क्षणी ते पुन्हा भुर्रकन उडून गेले, अगदी  नेहमी सारखेच.

मला खूप वर्षांपूर्वी कुणीतरी मेल केली कविता आठवली. नक्की शब्द लक्षात नव्हते पण अर्थ असा होता की जर तुमचे पाखरावर प्रेम असेल तर त्याला पिंजऱ्यातून मुक्त करा आणि सोडून द्या. जर त्या पाखराचेही तुमच्यावर प्रेम असेल तर ते नक्की परत येईल. इथे गोष्ट जरा वेगळी होती पण माझे पाखरू मात्र परत माझ्याकडे आले होते.

या प्रसंगाचे चित्रण येथे पाहा

(वरील चित्रावर टिचकी मारून ध्वनिचित्रदर्शन सुरू करावे. )