शाळे बाहेरच्या शाळा

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाइन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे कीर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. कीर्तन दोन भागात असायचे पाहिल्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनांबरोबर कीर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुसऱ्या भागात सांगितलेल्या कथेचा मथितार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा पण वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुसऱ्याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे. कधी महाभारतातील सोळा महत्त्वाची पात्रं, तर कधी गीतेचा अकरावा अध्याय, कधी उपनिषदांवर चर्चा. जर शेवडे गुरुजी प्रवचन करणार असतील तर चक्क "१९७१च्या भारत पाक युद्धातील अभिमन्यू" असापण विषय असायचा. पण येवढे मात्र खरे, ह्या कीर्तन, प्रवचनांना एकदा का जायला सुरवात झाली की आवड वाढते. नवनव्या गोष्टी कानावरून जातात. उपनिषदांतून केवढे प्रगाढ तत्त्वज्ञान आहे ते तेव्हा लहानपणी समजले नाही तरी त्याची कल्पना येते. पुढे त्याचा खूप फायदा होणार असतो. वयाच्या कोणच्या ना कोणच्या टप्प्यावर आपण सर्व जण त्यातले तत्त्वज्ञान स्वीकारतो व त्या तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट होतो. हा साक्षात्कार केव्हानाकेव्हा प्रत्येक माणसाला होतो. लहानपणी ते तत्त्वज्ञान नुसते कानावरून जरी गेले तरी आपल्या अंतर्मनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतून बसते. जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी राहावयास मदत मिळते.

 शाळेला सुट्टी लागायची तशी बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणांना आम्ही जायचो. पुढचे दोन तास प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर काढायचो आणि नंतरचे काही दिवस त्याच धुंदीत जायचे.

डोंबिवलीच्या नगरपालिकेचे पुस्तकालय चांगल्या पुस्तकांसाठी खूप प्रसिद्ध होते व ठेवले सुद्धा छान होते. सुट्टीत दुपारी सावरकरांचे काळेपाणी, १८५७चे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने. लोकमान्यांचे गीता रहस्य (त्या वेळेला जरी पूर्णपणे डोक्यावरून गेले तरी आता कळते त्याचे महत्त्व) आर्टीक होम ऑफ वेदाज, ऑरायन ही पुस्तके वाचल्याचे आठवत आहे. पुलंची सगळी पुस्तके, वपुंची कथाकथने, रणजित देसाईंची पुस्तके इत्यादी कित्येक अनेक. किशोर मासिक, चांदोबा, गोट्या, चिंगी व चिमणराव, साने गुरुजींची श्यामची आई, गोनीदांची पुस्तके व अजून खूप पुस्तके, आमच्या व बाकीच्या लहान मुलांच्या आवडीनिवडीवर वाचली जायची.

संध्याकाळ झाली की कोणी मोठी उत्सुक ‘ग्राउंड’ घ्यायचे. म्हणजे जवळच्या मैदानावर खेळ घ्यायचे. मुलं, मुली त्या ‘ग्राउंड’ वर जायचे. व खेळ खेळायचे. आम्ही म्हणायचो ‘ग्राउंडला’ जातो. मोठी समजायची की अमकाअमका नेहरू मैदान किंवा बागशाळा मैदानावर गेलाय. मला आठवताय लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा समोर एक घर होते त्यात राहणारे आजोबा संध्याकाळी त्यांच्या घराच्या गच्चीवर, उत्सुक अशा शालेय मुलामुलींना सभाधीटपणा शिकवायचे. एखादा विषय समोर ठेवायचे व त्यावर बोलायला लावायचे. बाकीची ऐकणारी मुले, बोलणारा कसा बोलतो व चुका कसे करतो ते बघायची. त्याची वेळ आली की मग तो बोलायचा व बाकीची ऐकायची. काही मुले संध्याकाळची संघाच्या शाखेत जायची, त्यांच्या शिबिरात जायची. मी पण एक दोनदा शिबिरांना गेलेलो आहे. बहुतेक मुलांना एखादा छंद असायचा. शाळेला सुट्टी लागली की मुले आपापला छंद जोपासायची. त्यातून मिळणारा विरंगुळा काही वेगळाच असतो. दिवसभराचा डोक्यावरला ताण काही क्षणातच निघून जातो.

हे सगळे होत असताना शाळा असायचीच. शाळेतला अभ्यासक्रम जरी व्यापक असला तरी समर्पक कधीच होऊ शकत नाही. मुलाला एकदा शाळेत पाठवले,     मग ती कोठलीही शाळा असो – शेजारची सरकारी शाळा घ्या किंवा अद्ययावत आंतरराष्ट्रीय विद्यालय असो, त्यात वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जरूर मिळते, वेगवेगळे विषय शिकायला मिळतात, जशी शाळा असेल तसे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात एखाददुसरा अनुभव पण गाठी लागतो. पण आपल्या विचारसरणीत बसणारे संस्कार होऊ शकत नाहीत. जीवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे त्याचे पाढे मिळू शकत नाहीत. आपल्या लोकनेत्यांचे जीवन कसे घडले, त्यांचे विचार उमजू शकत नाहीत. आपल्या संस्कृतीचा इतिहास व आपली संस्कृती कशी तयार झाली हे समजू शकत नाही. आपले सामाजिक कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना फार क्वचितच येऊ शकते. एकूणच शाळा ही ‘अबकड’ शिकवणारी असते पण जीवनाचे ‘कडबोळे’ सोडवण्यासाठी लागणारे धडे देणारी नसते. आपल्या डोक्यावरला आलेला ताण नैसर्गिकरीत्या कसा कमी करायचा ह्याचे शिक्षण नसते. मनाची प्रसन्नता कशी टिकवून ठेवायची ह्याचे शिक्षण नसते. ह्या जगात ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे, तोच मनुष्य यशस्वी गणला जातो.

ह्या सगळ्याचे नकळत शिक्षण देणाऱ्या व चांगले संस्कार करवणाऱ्या शाळेबाहेरील शाळा अजूनही आहेत पण त्यांचा आपण वापर फार कमी करायला लागलो आहे. धकाधकीचे आयुष्य ह्या नावाखाली आपण सगळ्यांनी ह्या शाळेबाहेरील शाळांमधून आपल्या मुलांचे नाव काढले आहे. आपल्या लहानपणी सुद्धा धकाधकीचे आयुष्य होते. प्रत्येक पिढीला आयुष्य धकाधकीचेच वाटत आलेले आहे. पण आता ग्राउंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकू, "का कु" करायला लागली आहे. तिला दूरदर्शन वर दिसणाऱ्या "सास बहू" मालिकांमधून उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व इंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरीक्षण करायचे सोडून स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटणं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरूकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले कॉंप्युटर मित्र फार व आसपासच्या खऱ्या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पीएस ३ वर! अशाने जीवाभावाचे मित्रगण व नेतृत्व गुण विकसीत होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराश्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चूक झाल्यावरच्या पश्चात्तापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चूक होऊन सुद्धा पश्चात्ताप होईनासा होतो. मूल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चात्तापाची नैसर्गिक भावना नाहीशी होणे.

कोणाला जर वाटत असेल की काय करायचे हल्लीची मुले ऐकतच नाहीत, येतच नाहीत खेळायला कारण मुले म्हणे कॉंप्युटरलाच चिकटून बसतात. त्यात मुलांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांना द्यावा लागेल. माझे आयुष्य, मला, माझी स्पेस, मी काही फक्त मुलांसाठी जगत नाही मला माझे जगायचे आहे, मी मुलांसाठी का म्हणून स्वतःच्या स्वातंत्र्यावर आळा घालू?, मी त्यांच्यासाठी का म्हणून बंधन ओढवून घेऊ?. हल्ली साधारण अशा तऱ्हेचे उद्गार आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात.

आपले आई वडील असेच विचार करते असते तर आज आपण हे वाचत नसतो. पूर्वी "डिप्रेशन" किंवा "बोर" होणे हे शब्दच आपण कधी ऐकले नव्हते. हल्ली पालकच म्हणतात व त्यामुळे मुले पण "बोर" व्हायला लागली आहेत. "बोर" होण्याची पुढची पायरी म्हणजे "डिप्रेशन".

समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद साधतात असे हल्ली बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपूर्वकपणे केले पाहिजे. शाळेबाहेरील शाळा सक्षम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कीर्तन, प्रवचनांना प्रोत्साहन देणे. सगळ्यात चांगले प्रोत्साहन म्हणजे आपल्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमांना जाणे. कीर्तन, प्रवचनांना फक्त म्हातारी लोकं जातात असा जो एक समाजात समज आहे तो आपण स्वतः जायला लागून बदलला पाहिजे. त्यात कोणाला कमीपणा वाटायला नको, लाज वाटायला नको व मागासलेपणा पण वाटायला नको. आपले ख्रिश्चन बांधव पण रविवारच्या "मास" साठी जवळच्या चर्च मध्ये जातातच ना. ते मागासलेले वाटतात का आपल्याला? त्यांना लाज वाटते का? त्यांना त्यात कमीपणा वाटतो का? ते जातीयवादी होतात का लागलीच? कीर्तनात, प्रवचनात जे सांगितले जाते ते सगळेच्या सगळे देश, काल पात्रांनी आपल्याला आणि आपल्या समाजाला लागू होतच असेल असे नाही पण निदान आपल्या विचाराला चालना तरी मिळेल. बऱ्याच जणांना आपल्या मुलांना कीर्तन, प्रवचनांना घेऊन जायचे म्हणजे मुलाला शामळू बनवायचे किंवा लहानवयापासून वैराग्याचे व अल्पसंतुष्ट होण्याचे धडे देणे असे वाटते. थोडक्यात कीर्तन, प्रवचनांना लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे गृहस्थाश्रमासाठी मुलाला नालायक बनवणे असे काही लोकांना वाटेल. उलट आपली विचारसरणी अशी सर्वसमावेशक आहे की वेदांतून, शास्त्रांतून, उपनिषदांमधून, गीतेतून कधीही टोकाची भूमिका घ्या असे प्रतिपादिलेले नाही. टोकाचे वैराग्य, टोकाचा संन्यास, टोकाचा उपवास, टोकाची व्रते, टोकाची कर्मे, टोकाचा निःस्वार्थीपणा ह्याला विरोधच नाही तर ते तामसी कर्म मानले गेले आहे. माणसाने जगात राहून, जगाच्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेऊन, कर्म न सोडता, प्रसन्न व आनंदी राहून आपली सदसद्विवेक बुद्धी हळूहळू कशी वाढवावी व आत्म्याची उन्नती कशी करावी व त्यासाठी कसे जगायचे हेच प्रत्येक ठिकाणी प्रतिपादिलेले आहे. आपली सर्वसमावेशक विचारसरणी म्हणजे आपला धर्मच आपल्याला शिकवतो की आनंदी कसे राहायचे, प्रसन्न मन कसे ठेवायचे, शरीरास व्यायाम कसा द्यायचा, रोगव्याधींपासून दूर राहण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक औषधे व पथ्यपाणी हे आपल्या हिंदू नावाच्या जिवनसरणीतच सामावलेले आहे.

कोठच्याही विचारसरणीचे दोन भाग असतात पाहिला भाग – विचार असतो. त्यात समाजापुढे विवेकबुद्धीला अनुसरून विचार ठेवण्यात येतो. धार्मिक सूत्रे व तत्त्वज्ञान ह्यात मोडते. दुसरा भाग – क्रिय. त्यात मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवणे असा असतो.

विचार - कोणतीही विचारसरणी लोकांनी अंगिकारण्यासाठी लोकांना ते तत्त्वज्ञान पटायला पाहिजे. अशा दृष्टीने विचारांची मांडणी केली पाहिजे. आपला धर्म किंवा आपली विचारसरणी हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. कालांतराने त्या परीसावर कधी कधी बुरशी जमते. प्रत्येक पिढीचे मग कर्तव्य बनते की समाजातील मोठ्यांनी ती बुरशी वेळोवेळी दूर करावी. आपली विचारसरणी समजायला सोपी ठेवावी. पाखड आहेत म्हणून आपण तांदूळ टाकून थोडेच देतो. वेळोवेळी समाजातील मोठ्यांनी पाखड पाखडून टाकुनद्यावेत. देश, काल व पात्राच्या परिसीमेत ती विचारसरणी कशी सोपी होईल ह्याकडे लक्ष घालायला हवे. लहानपणा पासून कीर्तन, प्रवचनांना जाण्याने आत्मसात झालेले हे विचार त्यांना विचार करायला लावतात. त्यांच्यातली सारासार विचारकरण्याची ताकद प्रज्वलित होते. चूक झाल्यावर नैसर्गिक पश्चात्तापाची भावना उफाळून येते. ही भावनाच लहानांना चांगले गुण आत्मसात करण्यात प्रद्युप्त करते. लहानपणा पासून विचार कानावरच पडले नाहीत तर मग आपली विचारसरणी एकदम अंगिकारली कशी जाऊ शकेल.   

क्रिय – मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवण्यासाठी, समजलेले तत्त्वज्ञान जीवनात उतरवण्या एवढे सोपे व व्यावहारिक पाहिजे.    फार क्लिष्ट चाली रूढींचा लोकांना अनुसरायला कंटाळा येतो व त्या मागचा उद्देश स्पष्ट नसेल तर विचारसरणीवरचा विश्वासच उडतो. तसेच जर देश, काल व पात्र ह्यांना अनुलक्षून आपल्या विचारसरणीला वेळोवेळी धार दिली नाही तर ती लौकरच कालबाह्य होते व अनुसरणीय राहत नाही. आता हे करण्यासाठी काही कोणती धार्मिक बैठक बोलावण्याची गरज नाही किंवा राजकारण्यांसारखी कमिटी बनवण्याची गरज नाही. आपण समाजातील वयस्कर व मोठ्या लोकांनीच वेळोवेळी आपणहोऊन आपला धर्म सोपा करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. म्हणजे सुपातले तांदूळ न सांडता पाखड तेवढे जातील असे बघितले पाहिजे. ह्याची सुरवात अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरात होऊ शकते. आपण लहानांना लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडू म्हणून द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रूपरेषा दिल्या आहेत –

• आपल्या मुलांना जवळच्या देवळात आठवड्यातून एकदा कीर्तन वा प्रवचनांना घेऊन जाणे. ह्यागोष्टीला आठवड्यातून दोन ते तीन तास लागतील जास्तीतजास्त. साधारण वयाच्या चार वर्षांपासून बारा वर्षांपर्यंत हे करावे लागेल.
• लहान मुलांनमध्ये मिसळणे. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळणे. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडून पळायचा व्यायाम करवून घेणे. सूर्यनमस्कारांचे महत्त्व पटवून देणे व त्यांच्या कडून सूर्यनमस्कार घालून घेणे.
•  लहानांना राष्ट्रव्रती बनवणे व राष्ट्रव्रत काय असते ते समजावणे.

 शाळेबाहेरच्या शाळेची प्रथा तेवत ठेवणे आपल्या हाती आहे.    लहान मुलांना दोष द्यायचा सोडून आपला माणुसघाणेपणा आपण कमी करायला शिकला पाहिजे. आपणच परत पूर्वी आपल्या बरोबर होत असायची तशी लहान मुलांबरोबर सुसंवादास सुरवात केली पाहिजे. ह्या शाळे बाहेरील शाळा कार्यक्षम केल्या पाहिजेत. शाळेबाहेरील शाळांना आपण प्रत्येकाने महत्त्व दिले पाहिजे.

 

आपण राष्ट्रव्रत घेतले का

त्या संबंधी येथे अजून वाचा
दुवा क्र. १
आणि येथे
दुवा क्र. २
(मराठी ब्लॉग)