गोष्ट एका माणसाची - १

|| ॐ ||

पावसाची रिपरिप अजूनही थोडी चालू होती. गेला आठवडाभर पाऊस काही ऐकायचं
नाव घेत नव्हता. सारे ओढे नाले अगदी भरभरून नर्मदामाईला मिठी मारत होते.
नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाचा खळखळाट इथे ही ऐकू येत होता. इतक्या दूरवरही
... अगदी स्पष्ट... त्यात आजच्या ह्या जराश्या उघडीपी मुळे जणू रातकिड्यांना
जागे केले होते अन तेही सुरात सुर मिळवायचा प्रयत्न करत होते त्याला
शेजारच्या पिंपळपानांच्या सळसळीचीही सोबत होती. साऱ्यानाच जणू लय सापडली
होती. हवे मध्ये प्रचंड गारवा भरून राहिला होता. नुसताच गारवा नव्हे तर
तिथेही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली होती. मातीचा, झाडांचा, पानांचा,
गवतांचा,.... कित्येक वास त्या हवेत भरून राहिले होते... घोंगावणाऱ्या
वाऱ्याची झुळुक जेव्हा हळूच दरवाज्यातून आत येत होती तेव्हा अंगावर
उमटणाऱ्या प्रत्येक रोमांचांपेक्षा, त्या बोचऱ्या थंडीच्या जाणिवेपेक्षा,
निसर्गाने बाहेर मांडलेल्या खेळाची जाणीव मनाचा जास्त ठाव घेत होती. तसा
सूर्यास्त तर बरेच दिवस दिसला नव्हताच पण किमान दोन - तीन प्रहर नक्कीच
उलटून गेले असावेत. क्षितिजावर चांदोबा हळूच ढगांमागून डोकावायचा प्रयत्न
करत होता.

ते एक शंकराचं जुनं पुराणं मंदिर होतं. अप्रसिद्धच असावं बहुधा
कारण एक शिवलिंग, त्याच्यावरची २ बिल्वपत्र अन कोपऱ्यातल्या दगडी समई सदृश
दिव्यात शांतपणे तेवत असलेल्या ज्योती व्यतिरिक्त दुसरी कोणतीच मानवी
अस्तित्वाची खूण नव्हती.

आणि कदाचित म्हणूनच "त्याने" ही जागा निवडली होती.

तसा मागच्या गावातल्या आश्रमात त्याला फार आग्रह झाला होता - " महाराज
इथेच थांबा, पावसाळा सुरू झालाय, आता चातुर्मासही लागेल, स्वामीजी इथेच
राहा आता चार महिने. तुमच्या निमित्ताने आम्हाला काही सत्संग होईल
... तेवढंच पुण्य गाठीशी पडेल " पण त्याच्या साठी निर्णय फारच सोप्पा होता
-" खूप खूप आभारी आहे मी तुमचा... पण.... जर लोकांच्याच ह्या भाऊगर्दीत
राहायचे असते तर येवढं सगळं सोडून इथे माईच्या पायाशी का आलो असतो? इथे
राहण्यापेक्षा परत जाईन ना... तिकडे घरी... तुमच्या ह्या आश्रमापेक्षा
कित्येक पट जास्त उपभोगात लोळत पडेन ना "

त्याच्या ह्या वाक्याने सगळ्यांनाच हतबुद्ध केले शेवटी त्याने सर्वांना त्यांचा ओळखीचे ते गूढ स्मितहास्य दिले अन बाहेर पडला...

आता धुनी शांत पेटली होती, निखाऱ्यांची उब चांगलीच जाणवत होती. शेणाच्या गोवऱ्यांच्या धुराने ते मंदिर भरून गेले होते ' आता धुनीत शेणाच्या गोवऱ्या घालतात का? किंवा घातल्या तर त्याला धुनी म्हणतात का?' ह्या बालिश प्रश्नाने त्याच्या चेहऱ्यावर तेच ते निष्पाप स्मितहास्य मनातल्या मनात उमटले. ' बर बाबा, धुनी नाही तर नाही स, शेकोटी म्हणू? चालेल? ' आता मात्र तो हळूच खुदकन हसला. आणि त्याचे ते हसणे हळूच नर्मदेच्या खळखळाटात अन रातकिड्यांच्या सुरात विरून गेले.

तो तसा जास्त मोठ्ठा नसावा... ३४- ३५ कदाचित... काळे भोर केस अगदी
मानेवर रुळणारे कानावरून रुळत रुळत न कळत दाढीत विरून गेलेले... कपाळावर
अन इतर अंगावरही ठसठशीत भस्म फासलेलं... कुण्या शेतकऱ्यानं दिलेली बंडी
अन त्यातून जाणवणारं कमावलेलं शरीर, दंडावर करकचून बसलेल्या जपमाळा, काय
तर म्हणे " बुवाबाजीला उपयोगी पडतं " म्हणे असं सगळ्यांना सांगायचं... मग लोकही हसायचे ' भोलाबाबा ' भोलामहारज' म्हणायचे तोमात्र नेहमीच स्मितहास्य देऊन सटकायचा.

आता मात्र धुनी अगदी संथ झाली. त्याचा आधीच सतेज असलेला चेहरा
त्या प्रकाशात उजळून निघाला. तो अगदी ताठ पण सुखासनात बसलेला. दोन्ही
हातांचे तळवे एकमेकांवर ठेवून धरलेले. धुनीच्या उबी मुळे त्याने अंगावरची
ती जुनीपुराणी गोधडी बाजूला सारली, त्याचा शेजारी निखारे हालवण्याचा चिमटा,
कोण्या एकाने दिलेली अन आजवर वापरायची इच्छा न झालेली चिलीम, काही पुस्तकं
सांभाळणारी त्याची झोळी वगळता काहीच नव्हते.

पण आज त्याच्या मनात काहीतरी खळबळ चालू होती जणू त्याला काही
बोलायचे होते... काही तरी लिहून ठेवायचं होते, काहीतरी जे उरल्या सुरल्या
आयुष्यभर शिदोरी म्हणून पुरेल... काही तरी असं की ज्यामुळे ह्या
स्वीकारलेल्या आयुष्या पुढे कधीच " का? " हा गंभीर प्रश्न उभा राहणार नाही
... त्याने झोळीतून कागद पेन काढले, पण सुरवात काय करावी हे बराच वेळ
त्याला उमजेचना....

तेव्हा मग ती पावसाची रिपरीप, नदीचा खळखळाट, रातकिड्यांचे संगीत,
पिंपळपानांची सळसळ, हवेतला गारवा, देवळातले ते शिवलिंग, शांत तेवणारी
धुनी, देऊळ भरून राहिलेला धूर, सारेच जणू दोन क्षण स्तब्ध झाले,

त्याच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे स्मितहास्य उमटले अन मग त्याने
त्याच्या खोल धीर गंभीर आवाजात त्या शांततेला भेदून जाणाऱ्या ॐ काराचा
उच्चार केला अन वही वर लिहायला सुरुवात केली....

|| ॐ ||