पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत 
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)

महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५

            बहुजन समाजाच्या लेखणीतून वेदना झळकायला लागल्यामुळेच शेतीसाहित्याचे प्रतिबिंब सर्वदूर पोहचले आहे. त्यामुळे खर्‍या जाणिवेचे साहित्य जगापुढे येऊ लागले आहे. आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या घटकाला आता या साहित्यप्रेरणेमुळेच न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असा सूर "शेती साहित्य आणि पत्रकारिता" या विषयावरील पहिल्या अ.भा.शेतकरी मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केला.

साहित्य संमेलन

            संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सरोज काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, परिसंवादाचे अध्यक्ष अनिल महात्मे, ’महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे, विजय विल्हेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलन

            या साहित्य संमेलानाच्या आयोजनामागची भूमिका विषद करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले, या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तीशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. शेती विषयातील जटील प्रश्न ऐरणीवर आणून शेतीची दुरावस्था बदलायची असेल तर आता शेतकर्‍यांनी सुद्धा एका हातात नांगर आणि दुसर्‍या हातात लेखनी धरली पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन आहे. ते पुढे म्हणाले की शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत शासन उदासिन आहे, साहित्यिक निष्क्रिय आहे, केवळ पत्रकारिता व प्रसारमाध्यमेच जागृत आहेत म्हणून "शेतकरी आत्महत्त्यांचा" प्रश्न ऐरणीवर आहे. नाही तर शेतकरी आत्महत्या हा विषय चव्हाट्यावर आलाच नसता असे सांगून सर्व पत्रकार व पत्रकारितेचे त्यांनी आभार मानले.

साहित्य संमेलन

            श्रीपाद अपराजित म्हणाले, विविध चळवळींचा प्रभाव असल्याने साहित्यातून शेतकरी नायकांना फ़ारसा न्याय मिळाला नाही. म. फ़ुले यांच्या ‘आसूड’ मधून शेतकरी वेदनांचा प्रत्यकारी अनुभव सर्वप्रथम आला. मराठीतील साहित्य मोटेवरच्या गाण्यात रंगले असताना हिंदी साहित्यात प्रेमचंद यांच्या ’गोदान’ने शेतकर्‍यांच्या कळा प्रखरपणे पुढे आणल्या. सिनेमातूनही विमल रॉय यांच्या ’दो बिघा जमीन’ने याच दु:खाचा जागर केला. नेमाडेंची ’कोसला’, आनंद यादव यांची ’झोंबी’ने तसेच शंकर पाटील, डॉ. विट्ठल वाघ, सदानंद बोरकर, इंद्रजित भालेराव यांनी शेतीसाहित्याला न्याय दिला. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे दु:ख वृत्तपत्रांनीच आकडेवारीनिशी पुढे आणले.

साहित्य संमेलन

            वर्धा जिल्ह्यातील साहेबराव पाटील या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यावरील डॉ.विट्ठल वाघ यांची कविता प्रसिद्ध करून वृत्तपत्राने १९८६ च्या दरम्यान पहिले मंथन घडवून आणले, या कडेही अपराजित यांनी लक्ष वेधले. आस्था, व्यवस्था व अवस्था या तीन घटकांचा विचार केल्याशिवाय पत्रकार शेती-शेतकरी यांना न्याय देवू शकत नाही, असे मत राजोरे यांनी व्यक्त केले. पत्रकारितेत क्रिकेट, क्राईम,सिने आणि सेलिब्रिटी या चार ’सी" ला अधिक महत्व दिले जाते. कृषि व शेतकर्‍यांना गांभीर्याने घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलन

            अध्यक्षीय मत व्यक्त करताना अनिल महात्मे म्हणाले, कृषि पत्रकारितेला आज प्रतिष्ठा मिळाली आहे. पण, शेती व शेतकर्‍यांना ती मिळाली नाही. जोपर्यंत शेतमालाला भाव मिळणार नाही तो पर्यंत शेतकर्‍याला प्रतिष्ठा मिळणार नाही. कारण यामागे शेतीचे अर्थकारण दडलेले आहे. सरकार किंवा राजकीय पक्ष शेतकर्‍यांचे प्रश्न तोंडी लावण्यापुरते किंवा सत्तेसाठी वापरतात, असा आरोपही त्यांनी केला. आगामी काळात अन्नधान्याचे संकट उभे राहणार आहे. त्यावेळी शेती आणि शेतकरी यांचे महत्व सर्वांना कळेल, असेही ते म्हणाले.

परिसंवादाचे बहारदार संचालन विजय विल्हेकर यांनी केले.

साहित्य संमेलन

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची प्रकट मुलाखत अनंतर नांदुरकर यांनी घेतली.

साहित्य संमेलन

या नंतर शेतकरी कवी संमेलन झाले.

साहित्य संमेलन

या प्रसंगी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त "सारस्वतांचा एल्गार" या स्मरणिकेचे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव याचे हस्ते विमोचन करण्यात आले.

        पहिल्या अ.भा. शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी मातोश्री सभागृहात झाला. शेतकर्‍यांना बोलण्याकरिता या संमेलनाचा उपयोग व्हावा, असे मत काही विचारवंतांनी व्यक्त केले तर काहींनी आम्हाला दिशा दाखविण्याची गरज नाही, आम्ही लढणारे आहोत, हे संमेलन आमच्या गंजलेल्या तलवारींना धार देण्याकरिता उपयोगी ठरेल, असे विचार व्यक्त केले.
         समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अँड. वामनराव चटप उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल संजय पानसे, संजय कोल्हे, स्वागताध्यक्ष सरोजताई काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते. 

साहित्य संमेलन

       यावेळी मार्गदर्शन करताना अँड. चटप म्हणाले, आम्ही मुळचे शेतकरी संघटनेचे आंदोलक आहोत. लढणे हा आमचा धर्म आहे. आजवर आम्ही अबोल होतो. या संमेलनाने आम्ही बोलू लागल्यास संमेलनाचे यश दिसून येईल. लढा, पुन्हा सज्ज व्हा! व्यक्ती स्वातंत्र्यासोबत बाजार स्वातंत्र्यांचा पुरस्कार आणि रास्त भावासाठी संघर्ष हे तीन मत या संमेलनात व्यक्त झाले. शेतकरी संघटना या तीन मुद्दांचे युद्ध शेवटच्या घटकांना सोबत सोबत घेवून लढणार आहे. त्याशिवाय आपण डोळे मिटणार नाही, असा इरादा शरद जोशी यांनी केल्याची माहिती चटप यांनी दिली.
      सांगलीचे संजय कोले म्हणाले, आम्हाला 'अबू मियाच्या भेंडी' इतके तरी स्वातंत्र्य मिळावे एवढेच मागणे आहे. आमच्या नांगराच्या भाराने ते येत नाही. तुमच्या लेखणीने येऊ द्या. पारतंत्र्यातून आम्हाला काढा, भावांचे कर्जाचे मुक्तीचे स्वातंत्र्य मांडा, त्यासाठी शरद जोशी पहिल्यांदा समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
     अमरावतीचे संजय कोल्हे यांनी याविरूद्ध भूमिका मांडली. ते म्हणाले, साहित्यिकांनी आम्हाला दिशा दाखविण्याची गरज नाही, आम्ही मुळचे आंदोलकच आहोत. हे संमेलन एक प्रयोग म्हणून यशस्वी झाले आहे. थोड्या गंजलेल्या आमच्या तलवारी घासण्यासाठी हा संमेलनाचा 'खरप' कामी पडणार आहे. संजय पानसे म्हणाले, शरद जोशी ज्या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, त्याचे प्रतिबिंब या संमेलनात पडले नाही. काही गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या असतात तशी चर्चा न होता, वरवरची चर्चा झाली. या संमेलनात झालेली स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणी हास्यास्पद आहे. कारण अर्थसंकल्पाच्या उत्पन्न आणि खर्च या दोन बाजू असतात. यात शेती-कृषी ही केवळ खर्चाची बाजूच आहे. उत्पन्नाची नव्हे! त्यामुळे अर्थसंकल्पाची बाब गैरलागू ठरते. शेती सोडून इतर गोष्टींकडे शेतकर्‍यांनी मोर्चा वळवावा, सन्मानाने दुसर्‍या क्षेत्रात जावे, याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. या समारोप्रसंगी मंमेलनानिमित्त आयोजित आंतरजालस्तरीय गझज, गीतरचना, छंदमुक्त कविता, पद्यकविता, ललित लेख, वैचारिक लेख, शेतीविषयक लेख कथा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. संचालन प्रा. राजेंद्र मुंढे यांनी केले.
----------------------------------------------------------

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*********

साहित्य संमेलन

*   *   *   *   *   *