एखाद्याला दुसरा एखादा माणूस एखादी भेट देत असेल (गिफ्ट या अर्थी), तर ती भेट देणारा स्वखुशीने देतो आणि घेणारा मिळेल ती भेट समाधानाने घेतो असा माझा समज होता, काही प्रमाणात अजून आहे. भेट देणाऱ्याचा किंचित का होईना वरचष्मा असतो, असा समज होता, काही प्रमाणात अजून आहे. एखाद्या क्षेत्रातील यशामुळे ती भेट सार्थ ठरे. कालांतराने भाऊबीज, दिवाळी पाडवा, वाढदिवस अशा प्रसंगानुरुप चित्रपटात पाहिले व प्रत्यक्षातही अनुभवास आले की, देणारा घेणाऱ्यालाच विचारतो," तूला काय पाहिजे माझ्याकडून ?" क्वचित प्रसंगी मागणाराही देणाऱ्याला (वर उल्लेखलेला कोणताही किंवा अजून कोणताही प्रसंग) सांगतो, ""मला अमुक दिवशी अमुक पाहिजे." संबंधित देणारा राजी असेल तर देतो, राजी नसेल तर पुढे रुसवा फुगवा आणि त्या अनुषंगाने पुढचे परिणाम होतात. त्यामुळे आजकाल, खरे तर, कधीपासून कोण जाणे, भेटीतील निखळ संतोष गायब होऊन तो डिमांड आणि सप्लाय चा, स्पर्धेचा, प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला आहे की काय, असे वाटते. मग ते नाते पती पत्नी असो, भाऊ बहीण असो , काका पुतण्या असो किंवा मित्र मित्र असो. त्यामुळे आता मागणाराच मोठा होऊन देणारा बिच्चारा झालेला आहे.
तुमचे अनुभव काय ?
भेट देणाऱ्या व मागणाऱ्यांनाही सर्वार्थाने दीपावली शुभेच्छा !