मी चिडून म्हणालो," सगळ्यांनी मिळून जुडेकरच्या बाबतीत मलाच टार्गेट करायचं ठरवलंय का? " मग तो थोडा समजावणीच्या सुरात म्हणाला,"तू थांबवलं असतंस तरी तो थांबला नसता. जरी रजा दिली नसतीस तरी तो गेलाच असता. त्यात तुझाही दोष नाही म्हणा. "....मी थोडा नरमाईने म्हणालो " चल, जेवून घेऊ या". जेवणाच्या टेबलावर बसता बसता,मी उद्या भुयारातून चर्चच्या भागात जायचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्याला बरं वाटलेलं दिसलं. त्याला नवीन काहीतरी करायला आवडत हे मला माहीत होतं.जेवणं होऊन टीव्ही बघेपर्यंत दहा वाजायला आले. आम्ही हॉलमध्येच बिछाने घातले.त्याला मध्येच काहीतरी आठवून त्याने त्याची बॅग उघडली. त्यातून चार उदबत्त्या काढल्या. ते पाहून मी खुणेने, हे काय म्हणून त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला," अरे, या विशिष्ट प्रकारच्या उदबत्त्या आहेत. जिथे अमानवी शक्तींचा वावर असतो तिथे लावल्या तर त्या पळून जातात आणि बळकावलेली जागा सोडतात "......मी म्हटलं," छान! तू कधीपासून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास ?"त्यावर काही उत्तर न देता त्याने त्या पेटवून एक माझ्या बेडरूममध्ये ,दुसरी हॉलमध्ये,तिसरी जिन्यावर आणि चौथी वरच्या मजल्यावरील कॉरिडॉर मध्ये लावली. लवकरच लसूण , धूप , काळी हळद आणि इतर मसाल्याचा तीव्र दर्प सगळीकडे भरू लागला. लवकरच घशात घुसमट होऊन मी खोकू लागलो.त्याचीही तीच अवस्था झाली. मी खोकत खोकत म्हटलं," विझव लवकर, नाही तर झोपणं मुष्किल होईल ". ....खोकणं थांबवीत तो म्हणाला," अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळ त्रास होणार नाही. पण रात्रभरात नक्कीच काहीतरी घडेल. " लवकरच सवय झाल्याने आम्हाला झोप लागली. घडलं काहीच नाही.मात्र रात्री एकदीडच्या सुमारास बऱ्याच लोकांच्या दबक्या आवाजातील गलबलटाने मला जाग आली.................
पाहतो तर काय ,वरच्या मजल्यावरील कॉरिडॉर मधे एक नाही तर दहाबारा ,बिनचेहऱ्याचे, पांढऱ्या कपड्यातील मृतात्मे काहीतरी कुजबुजत उभे होते.त्यातली काही जिन्याच्या कठड्यावर रेळून उभी होती. अगदी स्वतःच्या घरात वावरतात तशी. ते कोणत्यातरी अगम्य भाषेत बोलत असावेत . काही हातवारेही करीत होती. माझ्या तोंडाला कोरड पडू लागली. आणि घामही सुटू लागला. बाजूला घोरत असलेल्या श्रीकांतला मी उठवलं.त्याला वरच्या मजल्याकडे बोट करीत म्हटलं," पाहिलंस काय आहे ते ?" त्यावर तो न घाबरता शांतपणे म्हणाला," उदबत्यांनी आपलं काम केलंय " मग मी तडकून म्हंटल, "अरे, पण ही गर्दी जाणार कशी आणि कुठे ?". .... त्यावर तो म्हणाला," आपल्याला वाट पाहावी लागेल . मलाही अनुभव नवा आहे विकणारा म्हणाला सुरवातीला त्रास होईल ."....... आता बिनचेहऱ्यांच्या मृतात्म्यांची कुजबुज वाढली होती. पण भाषा मात्र कळत नव्हती. आणि ते कुठेही जात नव्हते की खालीही येत नव्हते. श्रीकांत हलक्या आवाजात म्हणाला," यांचा अर्थ इथे, बिनचेहऱ्याचे एकदोन नाही तर दहाबारा मृतात्मे असले पाहिजेत. उद्या आपण खालचं भुयार आणखी ढुंडाळून पाहू ." मला त्याही अवस्थेत त्याच्या धैर्याची दाद द्यावीशी वाटली......... साधारण दीड दोन तास आम्ही अंथरुणावर बसून काढला. चार वाजण्याच्या सुमारास त्यांची गर्दी कमी होऊ लागली. श्रीकांत म्हणाला," ही त्यांची जाण्याची वेळ दिसत्ये.आपण कोणातरी दर्दी माणसाचा सल्ला घ्यायला हवा "
पाचच्या सुमारास परत झोप लागली. मग मात्र एकदम साडेसातला जाग आली. मी घाईघाईने ऑफिसला जायची तयारी केली. श्रीकांतला मी लवकर येईन असं सांगितलं.मग आपण भुयाराची तपासणी करून,पण त्याला पाहिजे तर तो आधी जाऊनही तसं करू शकतो. त्याला बरं वाटलं. इतके दिवसांत माझ्या एक गोष्ट लक्षात आली की श्रीकांतला त्यांच्या इच्छेनुसार वागून दिलं तर बरं असतं.नाहीतर तो नाराज होतो. मी घाईघाईने बँकेत शिरलो. तर माझी वाट पाहत पारलोकेंचा मुलगा बसलेला दिसला. मी आधी काही रुटीन कामं हातावेगळी केली. आणि मुलाला बोलावलं. त्याचा चेहरा उतरलेला दिसला.मी काही विचारण्याच्या आतच तो म्हणाला," बाबा गेले, तुम्हाला माहिती आहेच. पण पर्वा आईलाही त्यांनी पळवून नेलंय. " असं म्हणून तो रडायला लागला. मग त्याच्या जवळ जाऊन पाठीवर हात फिरवत मी म्हटलं," हे बघ, पो.स्टेशनला जायचं सोडून तू इथे का आलास ?" त्यावर तो त्याला भिती वाटली म्हणाला. मग मी त्याला म्हटलं, आपण आत्ताच जाऊ पो. स्टेशनला. मलाही काम आहेच. " मलाही कानविंदेंकडे जायला नवीन कारण मिळेल असं वाटल्याने थोडं हलकं वाटलं. तो तयार झाला. मग पैंना सांगून आणि हेडऑफिसला मेसेज करून आम्ही गाडीने निघालो. हेडऑफिसच्या उत्तराची वाट मी मुद्दामच पाहिली नाही. कारण एकतर माझ्याबद्दल मोहंती साहेबांचं मत फारसं चांगलं नव्हतं आणि उगाचंच वेळ जाईल . मात्र एक गोष्ट मी ठरवली की पैंना एकदा चांगलं दमात घ्यायचं, म्हणजे बरीच माहिती मिळेल. असो. आम्ही पंधरावीस मिनिटात पो. स्टेशनला पोहोचलो. कानविंदे कोणत्यातरी आरोपीला कोठडीमध्ये बोलतं करण्याचा प्रयत्न करीत होते. आम्ही आल्याची खबर दिल्यावर त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. कदाचित मी एकटा आलो नाही म्हणूनही असेल.
- कानविंदे टेबलापाशी बसत थोडे कठीण रडेपणाने म्हणाले," बोला सबनीस,आता नवीन काय ?" मग मी त्यांना पारलोकेंच्या मुलांशी ओळख करून दिली आणि त्याची आई बेपत्ता असल्याचंही सांगितलं. पण त्यांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी कोणतीही घडपड केली नाही.