दगाबाज मैत्रिण

रायगडमधल्या आमच्या छोट्याशा गावात जिकडेतिकडे एकच चर्चा होती.. आस्थाच्या नवऱ्याच्या खुनाची. मला चीड येत होती ती याबद्दलच्या लोकांच्या आपापसातल्या कुजबुजण्याची. तिची मैत्रिण म्हणून मला समजलं असतं ना ते काय बरळतायत तर मग मी त्यांना सरळ केलं असतं.

आस्था तर पुरतीच मोडली होती. "मंजिरी, जर तू नसतीस..", माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत ती," तर मी वेडीच झाले असते. गावातल्या सर्वच जणांना असं वाटत आहे की धीरचा खून मीच केला आहे. प्रश्नांचा भडिमार करून पोलिससुद्धा मलाच भंडावून सोडत आहेत."

आस्था आणि मी अगदी बालपणीपासूनच्या मैत्रिणी. पदवीपर्यंतचं शिक्षण देखिल एकाच कॉलेजमधून. बॉयफ्रेंडसाठी एकमेकींशी भांडायचो आणि मग माफही करायचो एकमेकींना. खरं तर तीच मला माफ करायची बऱ्याचदा.. कारण आम्ही एकदम जीवलग मैत्रिणी ना. स्वतःसाठी तिचे बॉयफ्रेंड गटवण्यात मी खूप पटाईत होते.

आस्थाने जेव्हा एकदम स्मार्ट आणि चांगल्या घरातल्या आणि राजकीय वर्तुळात कार्यरत अशा धीरेंद्र सिंग (धीर)शी लग्न केलं, तेव्हाही आम्ही छान मैत्रिणी होतो. मी मुंबईत राहायचे. उच्चभ्रू वर्गातल्या लोकांना सौंदर्यवर्धनासाठी पर्सनल ट्रेनिंग देण्याचं काम मी करत होते. अधूनमधून घरीही चक्कर असायचीच माझी. अशीच एकदा घरी गेलेली असताना धीरने सुंदर दिसण्यासाठीच्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडे मदत मागितली होती. नजीकच्या भविष्यात असलेल्या निवडणुकीत मतदारांवर छान छाप पडावी हा त्याचा हेतू होता. 

त्याला मी काही व्यायाम सांगितले. त्याचा व्यायाम झाल्यावर आम्ही फळांचा रस प्यायचो आणि मग काही त्याच्या कार्यालयीन कामाबद्दलच्या गप्पा व्हायच्या. आधी मला वाटलं होतं की कॉलेजमध्ये असताना जसं आस्थाच्या इतर बॉयफ्रेंड्सबद्दल झालं तसंच हेही प्रकरण चाललं आहे, पण धीरने मला लक्षात आणून दिलं की त्याला फक्त आणि फक्त निवडणुकीत मतदारांवर छाप पडावी या दृष्टीने सौंदर्यवर्धनाबद्दलच्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडून मदत हवी होती आणि त्याहून जास्त काहीच नाही. त्याने मला हेही साफ शब्दात सांगितलं की त्याचं आस्थावर खूप खूप प्रेम आहे आणि कुठलाही गैरसमज मनात निर्माण होऊ देणे योग्य नाही. त्याने आमची ही ओळख कामापुरतीच मर्यादीत ठेव असे बजावले.

ह्म्म.. धीरेंद्रने आस्थाबद्दल इतका प्रामाणिकपणा दाखवावा असं त्या लाजऱ्या गोड मुलीत आहेच काय? आधी कधीच असं झालं नव्हतं की मला तिचा कुठला बॉयफ्रेंड गटवायचा आहे आणि त्याने मला अशाप्रकारे नाही म्हटलं असेल. मग माझ्या लक्षात आलं की मी जेव्हापण त्याच्याकडे गेले होते तेव्हा त्याच्या ऑफीसातच गेले होते. त्याला निवडणुकीत छान छाप पाडायची होती आणि म्हणून कदाचित तो असं वागण्याचं ढोंग करत असेल कारण तिथे सगळेजण त्याला नेहमीच नीट बघत असणार.

त्याला त्याच्या घरी भेटून जाणवून द्यायचं ठरवलं की तो माझ्यासोबत आला तर त्याच्या आयुष्यात त्याला किती धमाल मजा मिळू शकते. व्यायामासाठी नविन वजने ( वेट्स ) देण्याच्या निमित्ताने मी त्याच्या घरी गेले.. अर्थातच आस्था घरी नसेल याची खात्री करून घेऊनच. माझा विश्वासच नाही बसत की मी तिथे पोहोचताच धीरेंद्रने रागाने फणफणत मला सांगितले,"माझे आस्थावर अत्यंत प्रेम आहे आणि तू इथून निघून जा."

माझ्याकडे पाठ करून तो दुसऱ्या खोलीत निघून चालला होता. त्याला दुखापत पोहोचवण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता पण त्याची एकंदर वागणूकच माझ्या डोक्यात गेली. जी वजने मी त्याच्यासाठी आणली होती, ती तिथेच तशीच पडून होती.

मी त्याला आणखीन जोरात हाणायला हवं होतं असं वाटलं मला पण तो अजिबात हलत नव्हता. मी पटकन खोलीतून बाहेर निघाले आणि माझं सगळं विचारचक्र थांबवलं. झाल्या गोष्टीबद्दल कुठलाही पुरावा मागे राहू द्यायचा नाही याची यथोचित काळजी घ्यायचं ठरवलं. आस्थाच्या घरी आधीही बऱ्याचदा येऊन गेलेली असल्याने कुठे काय ठेवलेलं असतं हे सगळं मला अगदी पक्कं माहिती होतं. त्यादिवशी तिची मोलकरीणदेखील निघून गेलेली होती. मी धावत वरच्या मजल्यावर जाऊन आस्थाचं एक ब्रेसलेट घेऊन आले आणि ते किंचित तोडून धीरच्या शरीराखाली सरकवून दिलं. घरातून बाहेर पडत मी पूर्ण खात्री करून घेतली की दरवाजाचा लॅच नीट लागलेला आहे आणि मग मी माझ्या जीवलग मैत्रिण - आस्थासोबत लंच करायला निघून गेले.

आस्थाने पोलिसांना सांगितले होते की ती शिवरत्न हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा मी तिथे तिची वाट बघत बसले होते. आम्ही दोघींनी ठरवलेलं होतं की आम्ही एकत्रच लंच करू. अम्म.. नाही, कोणीच आम्हाला पाहिलं नव्हतं. आम्ही दोघीच होतो तिथे. तिने सांगितले की लंचनंतर ती घरी गेली आणि तिने पाहिले की धीर मरून पडला होता.

मी माझा जबाब देताना पोलिसांना सांगितले की त्यादिवशी मी धीरला पाहिलंच नव्हतं आणि आस्थाने जी लंचची कहाणी सांगितली होती तिलाच पाठिंबा दिला. मी जे काही सांगते आहे ते खरं नाही असा आव आणण्याकरता मी जबाब देताना मुद्दाम डोकं खाली घातलं होतं. पोलिसांना खात्री पटायला हवी होती ना की मी माझ्या जीवलग मैत्रिणीला वाचवायचा प्रयत्न करते आहे.

सगळ्या गावाला माहिती होतं की आस्थाला एका राजकारण्याची बायको म्हणून राजधानीत जाऊन राहायला अजिबात आवडत नव्हतं. तिला फक्त रायगडमध्ये रहायचं होतं आणि मुलांच्या शिक्षणाकडे आणि संस्कारांकडे लक्ष द्यायचं होतं. सगळ्यांना एकच माहिती नव्हतं - आणि मीही ते त्यांना कळू दिलं नाही - लंचच्या वेळेस आस्थाने मला सांगितलं होतं की तिने तिचं मत बदललं आहे आणि ती धीरला आता त्याच्या राजकीय क्षेत्रातही जमेल तितकी मदत करणार आहे. ती म्हणाली होती की जर यातच त्याला आनंद होणार असेल तर तिलाही मदत करण्यात आनंद आहे.

आस्थाने तिच्या मतपरिवर्तनाबद्दल फक्त मलाच सांगितले होते. त्यामुळे मला वाटले की तिच्याकडे खून करण्यासाठी कारण होतं, साधन होतं, संधी होती आणि तिचं ब्रेसलेटसुद्धातर सापडलं होतं जिथे धीरेंद्र मरून पडला होता. अजून काय हवं होतं पोलिसांना? थोड्याचवेळात ते आस्थाला अटक करून घेतील. थोड्याशा ळेचाच काय तो खेळ उरला होता !

मी आस्थाला खात्रीशीर सांगितलं होतं की मी तिच्यासोबत असेन. आणखीन एक मदत माझ्याकडून माझ्या संकटात सापडलेल्या मैत्रिणीला ! पोलिस आधीच येऊन बसलेले होते. आस्था वाचनालयातल्या सोफ्यावर मान खाली घालून बसली होती. मान वर करून माझ्याकडे बघणंही तिला अवघड झालं होतं जणू. मी तिथे पोहोचले तेव्हा मला खूप समाधानी वाटत होतं. इन्स्पेक्टर पटेलने मला प्रश्न विचारायला सुरूवात केली आणि सगळाच नूर पालटत गेला.

धीरचा खून मीच केला आहे असे त्याने सांगितले. सगळेजण परत आपापसात धीरेंद्रबद्दल कुजबुजत सांगायला लागले की धीरेंद्रच्या पर्स्नल सेक्रेटरीने ऑफीसमध्ये आमचे बोलणे ऐकले होते. कशाप्रकारे मी बोलले होते आणि धीरने नाकारलं होतं वगैरे. "पण ते सगळं केवळ प्रासंगिक होतं." या माझ्या म्हणण्याकडे त्याने साफ दुर्लक्ष केलं. पोलिसांनी बोटांचे ठसे वगैरे गोष्टी शोधून काढल्या होत्या. एकूणात आता मी संशयित होते.

बापरे ! याचा अर्थ आता ते माझ्याविरुद्ध सर्च वॉरंट काढू शकणार होते. म्हणजेच माझ्या बॅग्स धुंडाळू शकणार होते. बॅगेतच तर मी ते वजनं ठेवले होते - ज्यामार्फत मी धीरला माझ्या नजरेतून हे जग दाखवलं होतं ! मी विचार केला होता की कुठे टाकले तर कोणाला सापडायचे आणि प्रश्न उपस्थित व्हायचे.. त्यापेक्षा मी ते बॅगमध्येच राहू देणं जास्त श्रेयस्कत जोपर्यंत मी हे गाव सोडून जात नाही.

धीरेंद्र इन्स्पेक्टर पटेलचा मित्र होता. त्याच्या एकूणच बोलण्यात धीरच्या मरण्याबद्दलचं दुःखं झळकत होतं. त्याने मला विचारलं," त्याला दोनदा का मारलंत? दोनदा नसतंत मारलं तर जिवंत राहिला असता तो."

जर मी त्याला दोनदा मारलं नसतं तर धीर जिवंत राहिला असता.. दोनदा मारलं नसतं तर.. दोनदा??? पण मी तर त्याला एकदाच मारलं होतं.

पोलिस जसे मला आस्थासमोरून घेऊन जायला लागले तसं तिने मान वर करून पाहिलं. ही माझी कल्पना तर नाही? तिच्या दुःखी डोळ्यात एक राक्षसी आनंद आणि चेहऱ्यावर एक विचित्र क्रूर हास्य दिसत होतं ! तिने माझे हळूच माझे हात हातात घेतले आणि म्हणाली," आणि मी समजत होते की आपण अगदी जीवलग मैत्रिणी आहोत."

मूळ कथा - Unfaithful friend
मूळ कथालेखक - अभिजीत आनंद
स्वैर अनुवाद - वेदश्री