सौमित्रची एक वेगळी कविता पाठवत आहे. ही कविता नक्षत्रांचे देणे श्रावणमासी या कार्यक्रमात होती.... ही कविता म्हणजे कविचे स्वगत वाचकांशी संवाद व पावसाशी संवाद या स्वरुपात आहे.....
-----स्वप्निल
मध्यरात्री, दारावर टकटक
दार उघडलं,
पडून पडून जखमी झालेला पाऊस,
सरळ आत आला, ती कुठंय म्हणाला.
मी म्हणालो नाई ती नाई...
म्हणजे ????
म्हणजे ती आली नाई कधीच इकडे...
अरे पण ती मला म्हणाली होती,
इथेच भेटेन म्हणून....
anyway आता असं कर...
हे माझे ढग घे,
आणि बरसून ये ती असेल तिकडे,
मला फार कंटाळा आलाय...
मग मी बाहेर पडलो...
रात्रभर बरस बरस बरसलो कुठे कुठे..
सकाळी घरी परतल्यावर पाऊस म्हणाला,
जा ना साल्या माझ्यापेक्षा तूच चांगला बरसतोस
जा ना साल्या जा माझ्यापेक्षा तूच चांगला बरसतोस...
आता माझ्या खोलीत ढगांशिवाय राहणारा तो
आणि हा असा भणंग भटकत फिरणारा मी
ओळखा पाहू .....
खरा पाऊस कोण?
-------- सौमित्र