एका आईची कैफ़ीयत

(मनातले विचार कागदावर उतरविण्याची पहिलीच वेळ .. बघु कसे जमतेय )


आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मुर्ति होय. आई हाच माणसाचा पहिला गुरु होय. आईचे अन्तःकरण जात्याच श्रद्धायुक्त असते. स्त्री जेव्हा मुलाला जन्म देते, तेव्हा ती स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. मुलान्ना लहानाचे मोठे करतानाच ती त्यान्च्यावर चांगले संस्कार करत असते. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात तर ती हेच बोलते. माझ्या मुलांची परीक्षा, त्यांचे क्लास, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी याविषयीच बोलत असते. हल्लीच्या परीस्थीत तर मुलांना चांगल्या मित्रांची गरज असते. खरे तर मुलांनी आपल्या वडीलांना जवळचा मित्र समजावे आणि मुलिंनी आईला. पण प्रत्यक्षात असे फ़ार क्वचित घडते. प्रत्येक मुला-मुलींना आपली आई फ़ार कडक आहे, आपल्याशी ती फ़ार वाईट वागते असे वाटते. काहिंना तर आपली आई आडाणी आहे, तिला काहीच कळत नाही असे वाटते. कित्येकदा तर " तु गप्प बैस, तुला ह्यातले काहिच माहित नाही" हे वाक्य मुले अगदी सहज बोलून जातात. आईचे विचार, तिच्या भावना जर तिच्या मुलांनी, नवऱ्याने जर समजुन घेतल्या तर त्या माउलीला केवढा आनंद होईल. काही घरातून तर आईची किंमत फ़ार कमी असते. कारण कधितरी तिच्या नवऱ्याने कळत-नकळत मुलांसमोर बोलुन ती कमी केलेली असते. मुलांच्या प्रगतिसाठी आईवडील दोघे रात्रंदिवस झटत असतात. आपल्या मुलांना व नवऱ्याला थोडे जरी बरे वाटत नसेल तर आई फ़ार हवालदील होते. लगेचच ती देवाजवळ हात जोडून म्हणते "देवा, जे काय व्हायचे असेल ते मला होवू दे. पण माझ्या मुला-बळांना, नवऱ्याला आधी बरे वाटू देत. त्यांना सतत निरोगी आणि सुखी ठेव."


 आईने मुलांना जर चांगले काही सांगितले तर मुलांना तिने आपल्याला उपदेश केल्यासारखे का वाटते ? मुलींची तर ही ठाम समजुत असते की आपली आई आपल्याशीच फ़ार कडक वागते. आईने मुलींवर केलेले संस्कार मुलीला आपल्यावर लाद्लेले नियम वाटतात.


आपली आई सतत आनंदात, हसमुख आसवी असे वाटते ना ? मग मुलांनी आईला आदराचे स्थान द्यादे. तिला मान सन्मानाने वागवावे. तिला कोणासमोर अपमानित बोलू नये. तिची अवहेलना करु नये. तिला थोडासा मान देवून बघा मग ती तुमच्यासाठी कधीच म्हातारी होणार नाही. वयोमानाने मला हे होत नाही हे वाक्य ति कधीच बोलणार नाही. एक नवीन उर्मी तिच्यात येईल. मुलांसाठी केलेल्या कष्टांचे तेज तिच्या चेहेऱ्यावर येईल.


खरतर वयाच्या पंचेचाळिशी नंतर स्त्रीला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एका चांगल्या मैत्रिणिची गरज असते. ह्या मैत्रिणिची अंशतः पूर्तता तिच्या मुलीने किंवा मुलाने करण्यास काहीच हरकत नाही. नवीन घडणाऱ्या घदमोडिंवर तिच्याबरोबर चर्चा करावी. नवीन प्रवाहात तिलाही सामील करून घेण्याचा प्रयत्न करावा. मग पहा, घरातील प्रत्येक मुलाला "माझी आई" जगातील सर्वश्रेष्ठ आई आहे असे वाटेल.