काळाच्या या नाजुक गाठी
दातांनीही सुटतिल ना
हळूच उमलती पंख हे कोमल
दो हातांनि मिटतिल ना ॥
काळ बसला मारित गाठी
मिटुनि डोळे लावुनि मन
वैशाख वणवा अलगद पेटे
कातरस्मृतींचे जळते वन ॥
कालाचे हे चाक दातेरी
ना कधीही मागे फिरे
कोण चिरडते पदी तयाच्या
कोण उरे आणि कोण मरे ॥
प्रसन्नतेचा झरा खळाळे
ओसंडुनि हे गात्र न् गात्र
निरोप देतो तुजला आता
भरूनि गेले घटिका पात्र ॥