मी दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासून दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही
कुणी विचारतं....
"तुला घरी जावंसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही
आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डबा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस
तुझ्या हातचा चहा,
तुझ्या हातची पोळी,
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली
घरापासून दूर...
आई, जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होते
आता रणरणतं ऊन आहे
तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई, आता आम्हाला जायचंय..."
आणि तू त्यांना जाऊ दिलंस...
आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे...
(मला एका विपत्रातून ही कविता मिळाली. ती अगदी मनाला भिडली म्हणून मनोगतींसाठी सादर करीत आहे.)