ह्यासोबत
"असं नाही बाई. तपशीलवार सांगा. " देवदत्तने फर्मावले.
"बाईंचं या साहेबांसोबत लफडं होतं साहेब. बाईंनी यांना पैसेही दिले होते. एकदोनदा मीच हे काम केले होते. मग मलाही पैशाची हाव सुटली. मी बाईंकडून वेळोवेळी पैसे उकळायला लागले. त्याच सुमारास माझी बजाशी ओळख झाली. मग आम्ही एकदाच मोठा डल्ला मारायचे ठरवले. पण बाई राजी होत नव्हत्या. त्यादिवशी इतर कोणीही घरी नव्हते. गोवंडेंनीही सिनेमाचा कार्यक्रम आखला होता. आम्ही तीच रात्र ठरवली. बजा अकरा वाजता येणार होता. मी त्यापूर्वी एकदा बाईंशी पुन्हा एकदा बोलले. त्यांनी नकार दिला. मी बजानं दिलेली सुरी घेऊन त्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्या बधल्या नाहीत. शब्दाने शब्द वाढला आणि मी त्यांच्यावर वार केला. तेवढ्यात बजा पोचला. मग त्यानेच हा सर्व दिखावा रचला. ते अर्ध्या हृदयाचं लॉकेटही त्याचंच. " रखमा पूर्ण तुटली होती.
"घ्या तावडे तुमचा गुन्हेगार. " देवदत्त म्हणाला, "बजाला पुणे पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. "
"काय ट्रिक होती देवदत्त? " सर्वजण गेल्यावर मी विचारले.
"सगळ्यात महत्त्वाचा क्लू तूच तर दिलास. खुनी व्यक्ती स्त्री असावी हे तुझं मत माझ्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं. तुला आठवतं पहिल्याच भेटीत मी तावडेंना वेळामधील गोंधळाबद्दल बोललो होतो. वेळ. कुठल्याही कामाला लागणारा वेळ हा या तपासात महत्त्वाचा मुद्दा ठरला. " देवदत्त.
"समजावून सांग जरा. काहीच कळत नाही. " मी पुन्हा विचारलं.
"पहिल्याप्रथम मी जी गोष्ट पाहिली ती म्हणजे रखमाची खोली आणि स्वयंपाकघरातील अंतर. पहिली किंकाळी ऐकल्याबरोबर रखमा लगेच धावली. ती अर्ध्या मिनिटाच्या आत घटनास्थळी पोचली पाहिजे. पण सुनंदाबाई एक मोठं वाक्य मध्ये बोलल्या. नंतर अजून एकदा किंकाळीचा आवाज. आणि मग खून. या सर्वासाठी खूपच जास्त वेळ लागतो. खुन्याने एकूण तीन वार केले याचाही विचार कर. "
"याचा अर्थ रखमाची जबानी खोटी होती. "
"बरोबर सूर्या. पुढची गोष्ट म्हणजे मृत्यूचे कारण. जर अतिरक्तस्त्राव हे कारण असेल तर तो गोवंडे येण्याच्या आधी दहा मिनिटे शक्य नाही. किमान साडेअकराला खून झाला. गोवंडेनी एक पुरुष पळून जाताना पाहिला, तो बजा होता. रखमाच्या आताच्या जबानीप्रमाणे खून झाल्यानंतर बजा तसा लगेच पोचला होता. सर्व रचना ठीक करायला त्यांना अर्धातास लागला असणे शक्य आहे. "
"यापुढचे काम सोपे होते. रखमाच्या मागे माणूस लावलाच होता नंतर बजामागेही लावला. बजा एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला होता. तिथूनच त्याने टोनर केमिकल मिळवलं ज्याने सुरीची मूठ साफ करण्यात आली. खून झाला चुकून पण बजा पूर्ण तयारीत होता. पण खुनाचे कारण कळणे आवश्यक होते. गोवंडेंच्या साक्षीनंतर मी किशोरच्या मागे लागलो. त्यातून मला त्याचे सुनंदाबाईंशी असलेले संबंध तपशीलवार कळले. रखमाचा संबंधही लक्षात आला. बाकी रत्नहार आणि ते अर्ध्या बदामाचे लॉकेट म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. मग काय बजाला पकडले आणि पुढे तू पाहिलेसच. रत्नहारही त्याच्याकडेच मिळाला. "
"म्हणजे देवदत्तच्या यादीत अजून एका केसची भर" मी म्हटले, "वाईट त्या किशोरचं वाटतं. एकदा हरकिशनभाई आणि आता रखमामुळे सुनंदा त्याला दुरावली. आणि दोन्ही वेळा पैसाच कारण ठरला. "