नमन मुंबईच्या हुतात्म्यांना...

(मुंबई मधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शेकडो निष्पाप जीवांना आणि अतुलनीय शोर्य दाखवत अतिरेक्यांचा सामना केलेल्या मुंबई पोलिस आणि लष्करी जवानांना सादर अर्पण.)

सागराच्या कवेमधे, सुंदरसे एक शहर वसे;

येई त्यास सामावून घेई, सर्वदूर ही ख्याती असे.

मायानगरी म्हणती त्याला, लक्ष्मीचे वरदान जसे; 

वेगवान हे जीवन इथले, आरामाला स्थान नसे.        ॥१॥

ऐश्वर्याला परि त्याच्या, एक भयानक शाप असे;

दहशतवादाचा भुजंग, त्यासी विळखा मारून बसे.

रक्ताचे पडतात सडे, अन मुडदयांचे उठतात ठसे;

भय हे इथले संपत नाही, म्रुत्युचे थैमान दिसे.          ||2||    

एके दिवशी विनाश करण्या, शहरामधे सैतान घुसे;

रक्षण करण्या जनतेचे सैन्य आमुचे सज्ज असे.

शूरवीर ते लढले ऐसे, शिवबाचे मावळे जसे;

उपकारांचे अपार त्यांच्या, कर्ज तरी फिटणार कसे ?  ||3||

पुन्हा, पुन्हा हे घडते येथे, यात कुणाचा दोष असे ?

नेत्यांच्या भूलथापांना, जनता आता मुळी न फसे.

शेकडोंनी प्राण गमविले, नुकसान हे भरणार कसे?

म्रुतात्म्यांना शांती मिळो, हेच ईश्वर चरणी नमन असे.  ||4||