उडीद डाळ आणि मुगडाळ एकत्रित करून भिजत घालावी. सहा तासाने कांदा चार भाग करून नंतर उभा चिरावा. आल्याचेही उभे पातळ काप करावे. मिरच्याही बारीक चिराव्यात. कडिपत्त्याच्या पानांचे तुकडे करावेत. कोथिंबीर चिरून घ्यावी. मीरे मिक्सर मधून काढावे. अर्धेवट तुटतील इतपतच बारीक करावेत. काजू व खोबऱ्याचे तुकडे करून घ्यावेत. ही तयारी झाल्यावर भिजलेली डाळ वाटावी. कमीतकमी पाण्यात वाटण्याचा प्रयत्न करावा. गॅसवर तेल घालून कढई ठेवावी. आंच मध्यम पेक्षा जास्त ठेवावी. प्रथमच तेल व्यवस्थित गरम होऊ द्यावे म्हणजे वडे तेल पीत नाहीत. आता वाटलेली डाळ व वरील सगळे साहीत्य एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून एकाच दिशेने तिन/चार मिनीटे फेटावे. हातावरच थोडे दाबून वडे तेलात सोडावे. तांबूस रंगाचे झाले की काढावे.
मुगाची डाळ जवळजवळ बरोबरीने घातल्यामुळे वडे अजिबात तेल शोषत नाहीत. अतिशय हलके व चविष्ट होतात. नेहमीच्या मेदूवड्यांनपेक्षा जास्त खाता येतात. गरम गरम वडे गरम सांबार नंतर वाफाळता चहा.
काजू व खोबऱ्याचे तुकडे उपलब्धता आणि आवडीनुसार घालावे. वडे खाताना मीरीचे तुकडे व बारीक चिरलेली मिरची दाताखाली येते तेव्हां मस्त वाटते.
सर्वश्रूत -स्वतःच्या अनुभवातून थोडा बदल केला आहे.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.