मी एका राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झालो. या कार्यकालात काही काळ निरिक्षक म्हणूनही काम केले. ते करत असता मनुष्य स्वभावाचे विविध नमुने पहायला मिळाले. शाखा-व्यवस्थापक कित्येकदा त्यांच्या कामाच्या ओझ्यामुळे अतिशय त्रस्त असत. निरिक्षणाच्या कार्यालयीन कामाबरोबरच त्या-त्या शाखा-व्यवस्थपकांचे मनोधैर्य संभाळण्याचे काम देखील करावे लागे.
शाखा-निरिक्षकाला अपरिहार्यपणे शाखांच्या चुका दाखवणे भाग असते. एकदा असाच एका व्यवस्थापकास काही चुका दाखवत होतो. थोड्या वेळाने लक्षात आले, अरे, काही माझेच चुकते आहे! हा प्रत्येक चूक दाखवल्याबरोबर एक सिगारेट पेटवित अहे. तीन-चार वेळा असे झाल्यावर मग मात्र मी चूक दाखवणे बंद केले. संध्याकाळी त्यास विचारले, "बाबा रे, किती सिगारेटस् आज ओढल्यास? इतके अस्वस्थ होऊन कसे चालेल? चुका व्हायच्याच! काम करणारा चुकतो; काम न करणारा कसा चुकेल? चूक कळल्यावर ती पुन्हा होऊ देऊ नये म्हणजे झाले!"
अणखी एक असाच त्रस्त व्यवस्थापक. त्याला एका संध्याकाळी बळेच फिरावयास घेऊन गेलो होतो. त्यांच्या डोक्यात कामाचेच विषय! समोर एक पक्षांचा थवा दिसला. हे सद्गृहस्थ म्हणाले, "पहा हे पक्षी किती मस्त खेळताहेत. सारे ताण-तणाव काय ते आम्हालाच! " मी म्हटले, " असे नाही! यांना ही ताण-तणाव आहेतच! भक्ष्य मिळेल ना? पिलांचे रक्षण नीट होईल ना? लाख विवंचना त्यांनाही चुकलेल्या नाहीत! जो जो जन्माला आलेला आहे त्याला-त्याला समस्या, चिंता आहेतच. त्यांचे नियंत्रण महत्वाचे!"
खरे तर, ताण ही सुद्धा एक चांगली प्रेरणा आहे. माणूस ताणात असतो तेव्हाच त्याच्याकडून उत्तम कामगिरी घडून येते. अगदीच निर्धास्त, बिनघोर माणूस काय कामाचा? परंतु हा ताण जेव्हा एका मर्यादेपलिकडे जातो, असह्य बनतो- तेव्हा नक्कीच घातक स्वरुप धारण करतो. ते होऊ नये म्हणून काळजी आवश्यक!
हे ताण कमी कसे करता येतील? त्यांना नियंत्रणात कसे ठेवता येईल?
मला काही उपाय सुचतात. पहा तुम्हाला पटतात का ते!
- सद्भावनांचा प्रसार - सकाळी भेटणाऱ्यांना " आजचा दिवस सुखाचा जावो" असे अवश्य म्हणा! सकारात्मक विचारांच्या लाटा आपल्या पासून सुरू होऊ द्यात. पाहा स्वत:लाच किती प्रसन्न वाटेल!
- वृत्तपत्रातील विधायक बातम्यांचा मागोवा- रोजच्या वर्तमानपत्रात भल्या-बुऱ्या वार्ता असणारच! त्यातील खुनाच्या बातम्या चवीने चघळण्याऐवजी 'सिंधुताई संकपाळांनी अनाथ मुला-मुलींचा संभाळ कसा केला आहे' ते रस घेऊन वाचा. पहा काय फरक पडतो ते!
- गाणे गुणगुणणे- मला माहित आहे मी एक गचाळ गायक आहे! ना ताल, ना लय! सौ. ओरडत असते- चालीची पार वाट लावता म्हणून! पण मी तिकडे दुर्लक्ष करून गातच राहतो- स्वानंदासाठी! आणि मग होते काय ती ही तेच गाणे आता गुणगुणू लागते- नेमक्या चालीवर- अन् आता मी फक्त श्रोता असतो.
- बच्चे कंपनीशी दोस्ती- ही छोटी-छोटी मुले निष्पाप असतात. त्यांच्याशी गप्पगोष्टी करताना, त्यांच्याबरोबर कधी लटकेच रुसताना, त्यांना हलकेच गोलगोल फिरवताना आपण आपले राहतच नाही. जगाचे भान उरतच नाही. आता कुठले ताण आणि कुठले तणाव! पळले सारे दूर-दूर!
- विनोदाचा शिडकावा- आपल्यापैकी अनेकजण छान निरोगी विनोद करतात. वितंडवाद, हमरी-तुमरी अशा विनोदाने सहज टळते. मात्र त्यात उपहासाचा थोडा सुद्धा वास असू नये.
- संध्याकाळचे फिरणे, सहलीस जाणे- माझ्या माहितीत कित्येकजण असे आहेत, ज्यांनी अनेक महिन्यांत, वर्षांत सुर्यास्त पाहिलेलाच नाही. असे करू नका! निसर्ग भरभरून देतो, आपणच ते लुटायला कमी पडतो.
- नाटक, चित्रपट, कथा-कादंबऱ्या.. अन् हो पु̮ल., व. पु., द. मा.... यांना कसे विसरू?-आम्ही ऋणी आहोत या विविध कलाकारांचे! आपल्याला देखील अशीच काही कला जोपासता आली तर?
- 'मित्राविना मुळी ही जगी सौख्य नांदते ना'- सुख वाटल्याने दुप्पट होते, अन् दुःख निम्मे होते असे म्हणतात. अनुभव हीच खात्री!
- मित्रांची गोष्ट बोलतोय मग अर्धांगिनीला विसरून कसे चालेल? जोडीदाराबरोबरची मैत्री जेवढी घट्ट तेवढे सुखांचे स्त्रोत बळकट!
- सुखी सगळ्यांना ठेव देवराया- ज्यांना देवाची ओढ आहे त्यांच्यासाठी रामनाम आहेच!
- ही प्रार्थना आठवते?- हे देवा, जी गोष्ट मी बदलू शकतो, ती बदलण्याचे सामर्थ्य मला दे! जी बदलू शकत नाही ती सहन करण्याची शक्ती दे! अन् या दोन्हीतील फरक ओळखण्याची बुद्धी दे!
बरेच काही सांगता येईल! तूर्त तुकारामांचा एक विचार सांगतो आणि थांबतो- ''मन करा रे प्रसन्न! सर्व सुखाचे साधन!''